Thursday, 23 January 2020

साईबाबांच्या या मूठभर वारसदारांना’ आता गप्प करा

श्री साईबाबांचे जन्मस्थळ, प्रकटस्थळ, कर्मस्थळ असे जे वाद सुरू आहेत, त्यामुळे खरा साईभक्त दुखावला गेला आहे. हे वाद ऐकून श्री साईबाबा जिथे असतील तिथे नक्कीच दुःखी होऊन अश्रू ढाळत असतील. संपूर्ण आयुष्य आचरणातून, वाणीतून समाजाला जो संदेश दिला तो संदेशच विस्मरणात गेला आहे, हे पाहून साईंना काय वाटले असेल? श्रद्धा, सबुरी, वैराग्य आणि सेवा ही साईंची शिकवण विसरून मूठभरांनी वादंग निर्माण केला आहे. या मूठभरांना चूप करून त्यांच्या पायरीवर त्यांना आणण्याचे काम आता साईभक्तांनी करणे आवश्यक आहे. साईबाबांवर 100कोटींची बोली लावणार्‍यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे. श्री साईबाबांच्या विचारांची आणखी अवहेलना होऊ न देता महाराष्ट्रातील साईभक्तांनी एकत्र येऊन हा ‘वारसाहक्काचा’ तमाशा ताबडतोब थांबवावा. हे आताच केले नाही तर हा वादंग वाढत जाईल आणि या झुंडशाहीत श्री साईबाबा आपल्या अंतःकरणातून कायमचे हरपून जातील.
श्री साईबाबांनी शिर्डीला समाधी घेतली, म्हणून शिर्डीला लाखो भक्त येतात. हा इतिहास इथेच थांबला पाहिजे. कारण समाधीचे सत्य आपल्यासमोर आहे. पण श्री साईबाबा शिर्डीत येण्यापूर्वी कोण होते, कुठे होते हे स्वतःच साईबाबांनी कधी सांगितले नाही आणि ते सांगण्यास तयारही नव्हते. ‘सबका मालिक एक’ म्हटल्यावर हे प्रश्‍नच उपस्थित होत नाहीत. नदीचे मूळ आणि संताचे कूळ विचारू नये ही म्हण आहे. याचे कारण संताच्या कुळापेक्षा त्यांचा संदेश महत्त्वाचा आहे असे मानले गेले आहे. असे असूनही पाथरीकरांनी दावा केला आहे की, श्री साईबाबांचा जन्म पाथरीत झाला. मग पैठण जिल्ह्यातील धूपखेडा गावकर्‍यांनी म्हटले की, साई प्रथम धूपखेड्यात प्रकटले म्हणून ही त्यांची प्रकटभूमी आहे. तिसर्‍या दिवशी बीडच्या काहींनी सांगितले की, साई बीडमध्ये नोकरी करीत होते. त्यामुळे ही त्यांची कर्मभूमी घोषित करून विकासासाठी 100 कोटी द्या. इतके अगाध संशोधन झाल्यावर श्री साईबाबा हे हिंदू होते की मुसलमान आणि हिंदू असतील तर ब्राह्मण होते का याचेही दावे सुरू होतील आणि यावरही न संपणारा वाद सुरू होईल. त्यामुळेच हे थांबले पाहिजे. सरकारला मतांची चिंता असते. त्यामुळे सरकार यात पडणार नाही. विरोधकांना नेमकी कुणाची बाजू घ्यायची हे कळत नसल्याने ते गप्प आहेत. पण आणखी काळ गप्प राहिले तर हा वाद नको त्या वळणावर जाईल आणि ‘सबका मालिक एक’ म्हणणारे श्री साई यांची अक्षरशः वाटणी करतील.
हा सर्व प्रकार मुळात शिर्डीचे वाढलेले महत्त्व आणि 100 कोटी व मान्यतेतून भविष्यात येऊ शकणार्‍या आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनातून निर्माण होऊन वाढत चालला आहे. पाथरीकरांना जर पाथरी हे जन्मगाव वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या आर्थिक नियोजनातून त्याचा प्रचार व प्रसार करावा. पाथरीला आजही अनेक भक्‍त येतात. पण त्यांची संख्या शिर्डीच्या तुलनेने कमी आहे. ही संख्या वाढून भक्‍तांनी पाथरीला यावे, असे वाटत असेल तर पाथरी हे जन्मगाव आहे, असे सरकारने शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही. सरकारने पाथरीकरांना 100 कोटींचा निधी दिला आहे, त्यांतून पाथरी हे जन्मगाव आहे, हे जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोचवता येईल. त्यासाठी वाद कशाला घालायचा? पाथरीकरांना अधिकृत घोषणा हवी असेल तर संशोधनासाठी समिती नेमावी लागेल. या समितीने पाथरीकरांच्या बाजूने निर्णय दिला तरी खुद्द श्री साईबाबांच्या इच्छेचे काय? त्यांना आपला जन्म, कुटुंब आणि धर्म याबद्दल कधीच काही सांगायचे नव्हते.
श्री साईबाबा हे देवाचे सगुण रूप होते. पण ते खरे तर निर्गुण, निराकार होते. ते सांगायचे की, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेला असेल तर भाकर द्या, नंग्याला कापड द्या, निराधाराला घराच्या ओसरीत आश्रय द्या. ते मानवधर्म शिकवीत राहिले. मुसलमान आला तर ते कुराण वाचायला सांगायचे आणि हिंदू आला तर गीता वाचायला सांगायचे. अनेकांनी त्यांच्याकडे आग्रह केला की, तुमचा वारस घोषित करा, पण त्यांनी कधी कुणाला दीक्षाही दिली नाही. वारस नाही आणि आश्रमही नाही. ते आयुष्यभर वैरागी राहिले. तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम असे कुणी विचारले तर ते म्हणायचे की, तू माझ्यासह इतका काळ राहिलास, पण अजूनही साई म्हणजे हे शरीर असेच तुला वाटते.
सत्य हे आहे की, श्री साईबाबांची शिकवण आपल्या जीवनात अंगिकृत करण्यास आपण कमी पडतो. म्हणूनच मग आपली भक्‍ती सिद्ध करण्यासाठी आपण भौतिक दावे करीत राहतो. जन्मस्थळ, समाधीस्थळ, कर्मस्थळ, पदयात्रा, नववर्षाला दर्शन, काकडआरती, दान, सोन्याचा मुकुट हे सर्व त्या वैराग्याने कधीच त्याग करीत ‘सबका मालिक एक’ म्हटले आणि आपण श्री साईबाबांनी त्याग केलेल्या गोष्टीतच रममाण होऊन स्वतःला भक्‍त म्हणून घेत आहोत. श्री साईबाबांना खरोखर याचे दुःख होत असेल.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...