Wednesday, 27 November 2019

अजित पवार अस्तनीतील निखारा


महाराष्ट्रात विविध काळात जेव्हा जेव्हा सत्तानाट्य घडले तेव्हा तेव्हा ते केवळ एका माणसाच्या महत्त्वाकांक्षेपोटी घडले याला इतिहास साक्ष आहे. महत्त्वाकांक्षा कधीही वाईट नसते, पण महत्त्वाकांक्षेच्या जोडीला संयम आणि सुजाणपणा नसेल तर ती महत्त्वाकांक्षा अस्तनीतील निखाऱ्याप्रमाणे चटके देत राहते. महाराष्ट्रात अजित पवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
अजित पवार उत्तम वक्ते आहेत, त्यांचा वेगळा करिष्मा आहे. ते सभा गाजवू शकतात, प्रचाराच्या काळात त्यांची भाषणे ऐकायला तुफान गर्दी उसळते. एखाद्या पक्षाची लोकप्रियता वाढवायला पक्षाचा विस्तार करायला अशा नेत्याची अत्यंत गरज असते. त्यामुळेच पक्षात त्यांना कायम मानाचे स्थान असते. योग अभ्यास रामदेवबाबांनीच सांगावा, डायलॉग शत्रुघ्न सिन्हानेच म्हणावेत, एखाद्याची चिरफाड राज ठाकरेंनीच करावी आणि रांगड्या भाषेत कुणाची टोपी उडवायची तर ते अजित पवारांचेच शब्द असावेत. हे सर्व गुणी नेते आहेत, पण त्यांच्या मर्यादा आहेत, या मर्यादांमुळेच पक्षाचे नेतृत्त्व करण्यास ते योग्य नाहीत.
शरद पवार हे अजित पवारांना मुख्यमंत्री पदावरून किंवा इतर महत्त्वाच्या पदावरून का डावलत असतील त्याचे कारण गेल्या 25 दिवसांत महाराष्ट्राने पाहिले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले त्यानंतरच्या काळात त्या सरकारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अद्याप विस्मरणात गेले नाहीत. धरणात पाणी नाही तर मुतू का? या अजित पवारांच्या एका वाक्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जितकी हानी केली तितकी इतर कशानेच झाली नसेल. आततायी, संतापी वागणे आणि परिणामांचा अंदाज न घेता बेछूट निर्णय घेणे या अजित पवारांच्या स्वभावाने पक्षाला अनेकदा अडचणीत आणले. पार्थ पवारला उमेदवारी द्यायचा हट्ट करायचा ही तर धक्कादायक घोडचूक होती. अजित पवार भविष्यात सरकारच्या उच्च पदावर जातीलही, पण ते त्यांचे कर्तृत्त्व नसेल. ते उच्चपद हे त्यांना सतत सावरणारे शरद पवार यांनी नाईलाजाने त्यांचा पुरवलेला हट्ट असेल. अजित पवार हे उत्तम नेते आहेत. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे नेतृत्त्व गुण त्यांच्यात नाहीत. वेळ, काळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची काकांची क्षमता त्यांच्यात नाही. आज त्यांचा पक्ष वाचवायला शरद पवार आहेत, पण भविष्यात अजित पवारांकडे धुरा गेली तर अस्तनीतील हा निखारा स्वतः जळेल आणि पक्षाचीही भरून न निघणारी हानी करील. अजित पवारांनी स्वतः चिंतन करून एक पायरी खाली उतरले तर पक्षाचे भले होईल.

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...