Monday, 23 December 2019

देवेंद्रजी, जरा धीर धरा...


महाराष्ट्रात 2014 पूर्वीचा भाजपा आणि नंतरचा भाजपा हा अभ्यासाचा विषय ठरणार आहे. 2014 पूर्वी विरोधी पक्षाच्या बाकावरून एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस बोलायचे तेव्हा त्यांच्या प्रत्येक मुद्यावर विश्‍वास वाटायचा. देवेंद्र फडणवीस संपूर्ण माहिती घेऊन बोलतात अशी त्यांची प्रतिमा होती. पण 2014 साली कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकायची यासाठी घोडदौड सुरू झाली आणि भाजपाने कमाविलेला विश्‍वास घरंगळत रसातळाला गेला. गाडीभर पुराव्यांची रद्दी झाली आणि या रद्दीच्या गठ्ठ्यावर बसून फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला त्या दिवशी मुखवटेही टराटरा फाटले. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस या कोणत्याच पक्षावर जनतेचा काडीचा विश्‍वास राहिलेला नाही. इथे शब्दही प्रमाण नसतो आणि कृतीही शाश्‍वत नाही हे अवघ्या महाराष्ट्राने ओळखले आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आता थोडा धीर धरला पाहिजे. त्यांनी सत्तेत असताना सर्व पक्षातील विरोधकांचा असा नायनाट केला की भलेभले थक्क झाले. पण त्यांचे शेवटचे फासे चुकीचे पडले. त्यामुळे त्यांची पुन्हा येईनची सत्ता स्वप्न तर बुडालीच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची जनमानसातील व्यक्तिगत प्रतिमा डागाळली. देवेंद्र फडणवीस सत्य बोलतात असे जनमनात होते त्याला तडा गेला आहे. ती विश्‍वासार्हता परत मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी आता संयम राखला पाहिजे. नाही तर रोज उठून सरकारविरुद्ध बोलणारा बडबड नेता अशी त्यांची प्रतिमा होईल आणि ही प्रतिमा झाली तर मग कितीही व्हिडिओ टाका, ट्विट करा नाही तर पोस्ट करा लोक बडबडीकडे  दुर्लक्ष करतील.
हा सल्ला देवेंद्र फडणवीस यांना देण्याचे कारण  म्हणजे भाजपाची संपूर्ण आस या व्यक्तिमत्त्वावर आधारली आहे. अजून महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे देवेंद्र जे बोलतील आणि जसे वागतील त्याचा थेट परिणाम भाजपाच्या भवितव्यावर होणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांचे वर्तन पक्षासाठी घातक आहे. शिवसेनेने घेतलेली फारकत आणि अजित पवारांसह सत्ता स्थापनेचा फसलेला डाव या दोन्ही आघातांच्या वेदना देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक शब्दांतून घळाघळा वाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयांत ठेच खाल्लेल्या सद्गृहस्थाची अगतिकता आणि त्यातून निर्माण होणारा आक्रस्ताळेपणा दिसतो आहे. देवेंद्र फडणवीसांचे वागणे व्यक्ती म्हणून अपेक्षित असेच आहे. पण ते सर्वसाधारण व्यक्ती नव्हेत तर एका पक्षाचे नेतृत्त्व करीत आहेत. कदाचित त्यांचे हे पदही धोक्यात आले असावे. त्यातून आलेल्या अस्थिरतेत त्यांची मानसिकता बदलली असावी. पण आपले वागणे पक्षाला घातक ठरू शकते हे त्यांनी वेळीच ओळखले नाही तर त्यांचे पक्षातील स्थान आणि सन्मान काही काळात संपेल हेही शंभर टक्के सत्य आहे.
नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांचे वागणे हे अत्यंत बालिश होते आणि त्यांच्या मागे भाजपाला फरफटत जावे लागले. नवे सरकार सत्तेवर येऊन दोन आठवडेही झालेले नसताना फडणवीस कर्जमाफीची मागणी करताना दिसले. सर्वात दुर्दैवाचा क्षण म्हणजे अधिवेशनावेळी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकाचे बॅनर भाजपाने फडकविले आणि त्या दैनिकात जे प्रसिद्ध झाले त्यावरून रणकंदन माजविले. एका दैनिकाचा दाखला देऊन सरकारला जाब विचारणे हा आततायी निर्णय फडणवीसांनी का घेतला? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपाने अधिवेशनात तीन दिवस केला. हा विषय अधिवेशनात का आणला? दरवर्षी होणाऱ्या आमदारांच्या फोटोसेशनला फडणवीस उपस्थित राहिले नाही, धान उत्पादकांना सरकारने 200 रुपये वाढवून दिले तर फडणवीस म्हणतात की अवकाळीने धान उत्पादन झालेले नसल्याने धान विकत घ्यायचीच नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसाने ग्रस्त असलेल्यांना यापूर्वीच हेक्टरी आठ हजार रुपये राज्यपालांनी जाहीर केल्यावरही अवकाळीग्रस्तांना मदत जाहीर केली नाही अशी देवेंद्र बोंब ठोकत होते. महाआघडीला ‘तिघाडी’ सरकार म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे वाजपेयींच्या 13 पक्षांच्या सरकारला काय म्हणत असतील? सत्ता स्थापन होऊन दोन आठवडेही झाले नाहीत अशा सरकारने  लगेच विदर्भासाठी योजना जाहीर होणे शक्य नाही हे जाणूनही त्यावर देवेंद्रजी टीका करीत होते.
आता सात-बारा कोरा केला नाही यावर भाजपाने मोर्चे काढावे असा त्यांचा आदेश आहे. सरकसकट सर्वांना दोन लाख दिले याचे स्वागत नाही. याचे कारण काय? तर शिवसेनेने 7/12 कोरा करणार असा शब्द दिला होता. पण या शब्दावर शिवसेनेला मते देण्याइतका महाराष्ट्राचा मतदार खुळा नाही. शिवसेना काही करील इतकीच अपेक्षा या शब्दामुळे निर्माण झाली होती. प्रचारावेळी दिलेल्या शब्दांचा खेळ करायचा तर देवेंद्रजींनी घसा खरवडून डोंबिवलीकरांना 6 हजार कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते, 2014 च्या भाजपाच्या वचननाम्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करू, 24 तास पाणी, वीज पुरवू, कुशल कामगारांचा सतत पुरवठा करू, कृषीपंपांना दर दिवशी किमान 10 तास वीजपुरवठा करू अशी बरीच आश्‍वासने होती जी हवेत विरली. प्रचारातील शब्द प्रचारापुरते असतात हे जनतेला माहीत आहे. जनता केवळ पक्षाची साधारण विचारसणी काय आहे याचा अंदाज घेऊन मतदान करते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शब्दांच्या मागे लागून आततायीपणा करीत पक्षाचे हंसे करू नये तर सध्याच्या सरकारवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर पुराव्यांसह अंकुश ठेवावा ही भाजपाकडून अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण न करता केवळ आवाज चढवून आदळआपट करीत राहिलात तर पक्षाचे नुकसान होईल आणि पक्षाचे नुकसान होऊ लागले तर मोदींची छत्रछाया जाईल. तेव्हा देवेंद्रजी जरा धीर धरायला शिका...

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...