Sunday, 22 December 2019

व्रतस्थाचा सूर्यास्त


अखंड जीवन एखादा ध्यास घेऊन जगणार्‍या व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाचा अंत कधी होऊ शकत नाही. केवळ सूर्यास्त होतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनाने व्यापलेली एक संपूर्ण पिढी सूर्योदय बनून उगवते आणि आपल्या तेजाने जग व्यापून टाकते. माझे वडील नीलकंठ यशवंत खाडीलकर हे असेच व्रतस्थ व्यक्तिमत्त्व होते. आज त्यांचे शरीर इहलोकातून परलोकात गेले, पण त्यांचे विचार, त्यांचा प्रत्येक प्रहार, त्यांचा प्रत्येक शब्द हा मराठी माणसाच्या मनात धगधगता निखारा बनून जिवंत आहे आणि हा निखारा असाच सदैव लढत राहील. अयोग्य ते भस्म करीत राहील आणि योग्य त्याला दिशा दाखवित राहील, अशी व्यक्तिमत्त्वे दुर्लभ असतात, पण आमचे साताजन्माचे पुण्य म्हणून ते आम्हाला वडील म्हणून लाभले आणि लढवय्या मनात मराठी माणसांत अग्रलेखांचे बादशहा म्हणून प्रेमाच्या, आपुलकीच्या स्थानावर राहिले.
पत्रकारिता म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नीलकंठ खाडीलकर होते. चार हजार खप असताना ‘नवाकाळ’चे दुधारी शस्त्र त्यांनी हाती घेतले आणि जनतेशी एकनिष्ठ राहण्याचा काटेरी मुकूट मस्तकावर पेलवत हे शस्त्र केवळ आणि केवळ जनतेच्या भल्यासाठी वापरले. कधीही आयुष्यात त्यांनी एका शब्दानेही जनतेशी प्रतारणा केली नाही. ‘ताठ कणा आणि मराठी बाणा’ हे ‘नवाकाळ’चे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कणखरतेतून घडले. पत्रकारिता ही लेखनापुरती मर्यादित न ठेवता खिळे जुळवून पाने तयार करणे, मशीन चालविणे, पेपरच्या गठ्ठ्यावर बसून पार्सल बांधणे ते ‘नवाकाळ’चे आर्थिक नियोजन करणे हे त्यांनी एक हाती करून दाखविले. इतकेच नव्हे तर वर्तमानपत्रात अग्रलेख पहिल्या पानावर छापून त्याने जनतेच्या विचारांना दिशा देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. त्यांचे आठ कॉलमचे धगधगते मथळे, सरकारचे डोके ताळ्यावर आणणारे अग्रलेख आणि कधीही न डगमगता, लाचार न होता, संकटांपुढे न झुकता जे चुकले त्यांच्यावर आसूड ओढायचे धाडस दाखविणारे ते एकमेव होते. राजकारणी त्यांचे शत्रू नव्हते, पण कधी मित्रही नव्हते. कारण आपण चुकलो तर मैत्री असूनही ‘भाऊ’ आपल्याला सोडणार नाहीत हे प्रत्येकाला माहीत होते. त्यांचे लेखन वाचून एक अख्खी पिढी प्रगल्भ झाली, एका पिढीला जगायची दिशा मिळाली, लढायचे धाडस मिळाले. म्हणूनच त्यांना जनतेने ‘अग्रलेखांचे बादशहा’ हा किताब बहाल केला. यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही.


थरथरत्या हाताने खिशात मावतील अशी पुस्तके लिहिणे ही त्यांचीच कल्पना होती. त्या पुस्तकाचा प्रत्येक विषय हा जनतेला ज्ञानी करण्यासाठी होता. त्यात कधी ‘मी’ नव्हता आणि कधी ‘बात’ नव्हती. ते नेहमी म्हणायचे की, काहीही घडले तरी ‘द शो मस्ट गो ऑन!’ मला काही झाले तरी ‘नवाकाळ’चा अग्रलेख लिहिलाच गेला पाहिजे. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अजोड पत्रकारिता हे मैलाचे दगड कधीच गाठता येणार नाही. पण त्यांच्या विचारांचे आणि लेखनाचे अमृत पिऊन आज माझ्या या सदैव अमर पित्याला आणि जनतेच्या अग्रलेखांच्या बादशहाला हा अग्रलेख लिहून मानाचा मुजरा करते. या सूर्याचा आज सूर्यास्त झाला, पण जनतेच्या मनातून, भावनेतून, विचारातून तो लाखो सूर्यकिरणे बनून रोज नित्यनियमाने व्रतस्थपणे आपले जीवन उजळत राहणार याची खात्री आहे.

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...