आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर रेड्डी या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या तरुण नेत्याने दणदणीत विजय मिळवित मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2014 ते 2019 ही पाच वर्षे विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी असलेल्या या नेत्याने चंद्राबाबू नायडू यांचा पार धुव्वा उडवून दिला.
येदुगिरी संदिन्ती जगनमोहन रेड्डी अर्थात वायएसआर रेड्डी हे केवळ 46 वर्षांचे आहेत. पत्नी भारथी आणि दोन कन्या असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांचे वडील वायएस राजशेखर रेड्डी हे काँग्रेसमध्ये होते. अत्यंत लोकप्रिय होते. 2004 आणि 2009 अशा दोन वेळा ते मुख्यमंत्री राहिले. त्यांच्यासाठी निवडणुकीवेळी प्रचार करीतच जगनमोहन रेड्डींचा राजकारणात प्रवेश झाला. दुर्दैवाने 2009 साली वडील राजशेखर रेड्डी यांचे अपघाती निधन झाले. त्यांची जागा त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांना दिली जाईल असे सर्वांना वाटत होते. पण काँग्रसने त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारले. 2010 साली जगमोहन रेड्डी यांनी ‘सहानुभूती दौरा’ आयोजित केला. त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक निधनाचा धक्का बसल्याने काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली होती. या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हा दौरा होता. पण खरे तर हा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना हा दौरा काढण्यास मनाई केली.
या सर्वाचा अपेक्षित परिणाम होऊन जगनमोहन रेड्डींनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि 2011 साली स्वतःचा वायएसआर काँग्रेस पक्ष काढला. या पक्षाने पहिल्याच संधीत सर्व पोटनिवडणुका जिंकल्या. जगनमोहन रेड्डीचा ताकद वाढत असतानाच सीबीआयने संपत्तीच्या भ्रष्टाचाराबाबत धाडी टाकल्या आणि जगमोहन रेड्डींना अटक करून न्यायालयीन कोठडीत टाकले. याविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल अपील फेटाळण्यात आले. जगनमोहन रेड्डी जेलमध्ये असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमात झळकू लागल्या. त्यांची प्रतिमा मलीन झाली.
अशा या विपरित परिस्थितीत त्यांना आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या विभाजनाच्या मुद्याने साथ दिली. तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करीत जगनमोहन रेड्डींनी कारागृहात बेमुदत उपोषण सुरू केली. त्यांची आई आमदार विजयाम्मा यांनी कारागृहाबाहेर उपोषण सुरू केले. अखेर जगनमोहन रेड्डींना कारागृहात सोडण्यात आले. पण या सर्वाचा चांगला परिणाम झाला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसचा दणकून पराभव झाला. यानंतर मात्र जगनमोहन रेड्डींनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली. त्यांनी 2017 साली तीन हजार किलोमीटरची संकल्प यात्रा काढून जवळजवळ प्रत्येक विधानसभा मतदारसंघ गाठला. ‘रावली जगन, कावली जगन’ (जगन यायला हवा, आम्हाला जगत हवा) ही घोषणा दुमदुमू लागली आणि पुन्हा जगनमोहन रेड्डी लोकप्रिय ठरू लागले. त्यांच्या या पदयात्रेचा परिणाम होऊन नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तेलगू देसम आणि चंद्राबाबू नायडूंना चितपट केले.