Wednesday, 17 July 2019

अरविंद केजरीवालांचा प्रवास ‘परिवर्तन’ ते मुख्यमंत्रिपद




दिल्लीचे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दोघेही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या दिल्लीत लोकपाल कायद्यासाठी आंदोलनाने वेग पकडला तेव्हा अरविंद केजरीवाल अधिकच झोतात आले. अरविंद केजरीवाल हे प्रथम डिसेंबर 2013 ते फेब्रुवारी 2014 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच राजीनामा दिला आणि 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणखी मोठा विजय मिळवून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2015 च्या निवडणुकीत त्यांनी 70 पैकी 67 जागा जिंकण्यासाठी इतिहास घडविला. पुढील वर्षी पुन्हा दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे आप सरकार कायम वादात राहिले. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीकडे एका बाजूनी टीका होत असताना त्यांनी सुधारलेल्या पालिका शाळा आणि मोहल्ला क्‍लिनिक सारख्या योजनांमुळे त्यांचे कौतुकही होत असते.
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील सिवानी शहरात झाला. वडील गोविंद राम केजरीवाल हे इलेक्ट्रीक इंजिनिअर होते. सोनिपत, गाझियाबाद, हिस्सार, दिल्ली अशा शहार हे कुटुंब फिरत राहिले. अरविंद केजरीवाल अभ्यासात हुशार होते. खडकपूरच्या आयआयटीत प्रवेश घेऊन ते मेकॅनिकल इंजिनिअर झाले आणि जमशेदपूरला टाटा स्टील कंपनीत नोकरीलाही लागले. पण तेव्हापासून अस्वस्थपणा हा त्यांच्या स्वभावात होताच. चांगल्या नोकरीचा तीन वर्षांत राजीनामा देऊन त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. यात उत्तीर्ण होऊन ते आयकर खात्यात सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू झाले. त्याच काळात त्यांची सुनिताशी भेट झाली. तीही ‘इंडियन रेव्हिन्यू सर्व्हिस’ उत्तीर्ण होऊन नोकरीला लागली. 1994 साली दोघांचा विवाह झाला. त्यांना हर्षिता आणि पुलकित ही दोन मुलं आहेत. पुढे दोघांनी सरकारी नोकरी सोडून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले.

आयकर खात्यात असतानाच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या सुंदरनगर भागात ‘परिवर्तन’ चळवळ सुरू केली. आयकर, वीज बिल, रेशनकार्ड, सरकारी योजना यात सामान्यांना येणार्‍या समस्यांची सोडवणूक ‘परिवर्तन’ च्या माध्यमातून सुरू झाली. पाच वर्षानंतर परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी ‘कबीर’ नावाच्या एनजीओची स्थापना केली ज्यामुळे त्यांना निधी मिळू लागला. दरम्यान ‘परिवर्तन’ मार्फत अनेक सरकारी खात्यांत धडाधड आरटीआय टाकून माहिती मिळविण्यास सुरुवात झाली. यातून सरकारी योजनांतील गैरकारभार उघड होऊ लागला. रेशन दुकानांतील भ्रष्टाचार पाण्याच्या खाजगीकरणाचे कारस्थान, खाजगी शाळांची दादागिरी अशा गौप्यस्फोटांमुळे परिवर्तनचे नांव सर्वदूर पोहचले. पण परिवर्तनचे कार्यक्षेत्र सुंदरनगरपर्यंतच सिमित होते. 2006 साली अरविंदकेजरीवालना त्यांच्या समाजकार्यासाठी मॅगसेसे पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची रक्कम हे भागभांडवल म्हणून देत केजरीवाल यांनी ‘पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली.केजरीवाल, मनिष सिसोदिया, अभिनंदन सिक्री, प्रशांत भूषण, किरण बेदी हे त्याचे संस्थापक होते. या संस्थेने परिवर्तन आणि कबीरचे काम आणखी मोठ्या प्रमाणात सुरू केले. कॉमनवेल्थ खेळातील नियोजनात झालेला भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. शेवटी 2011 साली हेच सर्वजण अण्णा हजारेंच्या आंदोलनात सामील झाले आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुपचे सदस्य बनले. पुढे आम आदमी पार्टीची स्थापना करून दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकत अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

Wednesday, 10 July 2019

योगी आदित्यनाथांचे गणित विषयात ग्रॅज्युएशन


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अनेकांना कुतुहल आहे. भगव्या वेषातील योगी असे व्यक्तिमत्त्व असलेला माणूस राजकारणात येतो आणि एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो याचे बहुतेकांना आश्चर्य वाटते. पण योगी आदित्यनाथ यांचा जीवनप्रवास बघितला तर तरुण काळापासून मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात अध्यात्म आणि राजकारण यांची सांगड राहिली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील पंचूर गावी झाला. हे गाव आता उत्तराखंडात समाविष्ट आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हा अजय मोहन बिश्त हे त्यांचे नांव होते. त्यांचे वडील फॉरेस्ट रेंजर पदावर सरकारी नोकरीत होते. चार भाऊ आणि तीन बहिणी असे त्यांचे मोठे कुटुंब होते. पण इतके मोठे कुटुंब असूनही अजय बिश्तने उत्तम शिक्षण घेतले. उत्तराखंडात असलेल्या हेमवती नंदन बहुगुणा महाविद्यालयातून त्यांनी चक्क गणित विषय घेऊन ग्रॅज्युएशन केले. पण नोकरी, कुटुंब या सामान्य जीवनात त्यांना रस वाटत नव्हता. ते जेमतेम 18 वर्षांचे होते. तेव्हा अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आंदोलन सुरू झाले आणि अजय बिश्तने कुटुंबाला रामराम ठोकून आंदोलनात उडी घेतली. हा नवा प्रवास सुरू असतानाच गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. महंत अवैद्यनाथ हेही या शिष्यामुळे प्रभावित झाले. ते अजय बिश्तच्या आईवडिलांना भेटले आणि त्यांच्या मुलाला शिष्य म्हणून घेऊन जाण्याची परवानगी दिली. आईवडिलांनी आनंदाने परवानगी दिली. अजय बिश्त हे महंत अवैद्यनाथ यांचे शिष्य बनले. याच महंत अवैद्यनाथ यांनी अजय बिश्त यांचे नांव योगी आदित्यनाथ ठेवले. तेव्हा योगी 21 वर्षांचे होते.


गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ हे अध्यात्मिक गुरू असले तरी राजकारणात पूर्ण सक्रीय होते. महंत अवैद्यनाथ हे हिंदु महासभेचे नेते होते. 1991 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. ते स्वतः लोकसभेवर निवडून आले होते. पण राजकारणात असूनही हिंदू महासभा आणि भाजपा या दोन प्रवाहात स्वतःला पूर्ण झोकून न देता त्यांनी स्वतःचे स्वतंत्र स्थान राखले होते. त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा योगी आदित्यनाथ सांभाळत असत.
1994 साली महंत अवैद्यनाथ निवृत्त झाले आणि त्यांनी योगी आदित्यनाथ यांना आपले वारस नेमले. त्यानंतर गुरुच्या पावलावर पाऊल टाकत 1998 साली योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणूक लढले आणि निवडून आले. 26 व्या वर्षी ते खासदार झाले होते. ते लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होते. त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 अशी प्रत्येक लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली. लोकसभेत त्यांची 77 टक्के उपस्थिती असायची. आज ते उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विषयी रोज नवीन वाद निर्माण होतो. सध्याचे ते सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री आहेत.

Friday, 5 July 2019

आ. नितेश राणे, तुमची मस्ती, दादागिरी महाराष्ट्रात नको अधिकारी चुकतो! पण त्याला खांबाला बांधून चिखलाची आंघोळ घालता?

मुंबई-गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाले, अशी ओरड ठोकत काँगे्रसचे आमदार (नारायण राणे पुत्र) नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकरना फरफटत गडनदीच्या पुलावर नेले. तिथे त्यांना खांबाला बांधले आणि त्यांना चिखलाची आंघोळ घातली! नितेश राणेंनी दोन महिन्यांनी येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी फडफड सुरू केली आहे. त्यासाठी मोठे नाट्य उभे करीत त्यांनी शासकीय अधिकार्‍याला अत्यंत हीन प्रकारची वागणूक दिली. अधिकारी चुकत असतील, पण आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. इथे चढ्या आवाजात जाब विचारण्याची मर्यादा पाळतात. एखाद्या असहाय अधिकार्‍याला अशा तर्‍हेने मस्ती दाखवत, दादागिरी करीत वागवणे महाराष्ट्रात शोभत नाही आणि महाराष्ट्रात स्वीकारलेही जाणार नाही. आमदार नितेश राणेंनी, असहाय
अधिकार्‍यापुढे ताकद दाखविली. पण केेंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींपुढे नितेश राणेंच्या मुखातून शब्द निघणार नाही. या चिखलफेकीनंतर रात्री आमदार नितेश राणे यांना गुंडा गर्दी आणि मारहाणप्रकरणी अटक करण्यात आली. कणकवली पोलिसांनी ही अटक केली.
आज सकाळी 11 वाजता हे चिखलकांड घडले. यामध्ये आमदार नितेश राणे यांच्याप्रमाणेच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे देखील उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालण्यात आघाडीवर होते. आज सकाळी रस्त्यातील खड्डे आणि चिखल दाखविण्याच्या बहाण्याने उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांनी कणकवलीला बोलविले. त्यानंतर त्यांना खड्डे दाखवत चालत चालत जानवलीच्या गडनदीवरील पुलावर नेण्यात आले.
यावेळी नितेश राणे यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे व 50 ते 60 स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही होते. हे कार्यकर्ते उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्‍काबुक्‍कीही करत होते. गडनदीच्या पुलावर येताच आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेर्‍यासमोरच प्रकाश शेडेकर यांना खडसावयाला सुरुवात केली. सामान्य जनता दर दिवशी जो चिखल मारा सहन करते तो तुम्ही पण अनुभवा, असे नितेश राणे यांनी शब्द उच्चारताच चिखलाची बादली भरून तयार असलेल्या कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावरून अंगावर चिखल ओतला. त्यानंतर अगोदरच दोर घेऊन तयार असलेले कार्यकर्ते पुढे आले व त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधले आणि त्यांच्या अंगावर लागोपाठ चिखलाच्या बादल्या ओतून त्यांना चिखलाने आंघोळ घातली. गेल्या चार दिवसाच्या अतिवृष्टीमुळे चिखल झाला आहे असे शेडेकर गयावया करून सांगत होते, तरीही त्यांच्यावर
हल्ले सुरू राहिले. नितेश राणे यांच्या या दादागिरीमुळे बांधकाम विभागातील सर्व कर्मचारी भेदरले आहेत. यापूर्वीही नितेश राणे यांनी अनेक अधिकार्‍यांना असेच धमकावले आहे. पोलीस अधिकार्‍यांनाही दम भरला आहे. या सर्व घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांमध्ये व कामगारांमध्ये राणे यांच्याबद्दल संताप आहे, पण सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याने अधिकारी तक्रार करीत नाहीत. मात्र उप अभियंता प्रकाश शेडेकर यांनी चिखल फेकीनंतर केलेली याचना आणि गयावया पाहता आपल्याला कोणी वाली नाही, हेच त्यांना कळून चुकले आहे, असे स्पष्ट दिसत होते.
दरमान, अभियंता प्रकाश शेडेकर चिखलफेक- मारहाणप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर सहा जणांची नावे शेडेकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर नितेश राणे हे कणकवली पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे या अटकेदरम्यान पोलीस ठाण्यासमोर राणे समर्थकांनी गर्दी केली होती. उद्या शुक्रवारी नितेश राणेंना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कणकवली महामार्गावर आज दुपारी शेडेकर यांना झालेल्या मारहाणीनंतर ते पोलीस बंदोबस्तात कुडाळ येथे आपल्या निवासस्थानी आले. तेथून कपडे बदलल्यावर कुडाळ पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत कुडाळ पोलिसात प्रकाश शेडेकर ( 52) यांनी फिर्याद दिली की, त्यांनी मला गडनदीच्या पुलावर थांबायला सांगितले होते.त्याप्रमाणे ते थांबले असताना 10: 40 वाजण्याच्या सुमारास नितेश राणे कणकवलीच्या दिशेकडून पुलावर चालत आले. त्यावेळी त्यांचे सोबत पत्रकार, नागरिक, कार्यकर्ते असे 40 ते 50 लोक होते. यावेळी त्यांनी त्यांना काहीही बोलायला न देता तु पीलर बांधायची घाई का केली? गटार कोण बांधणार तु का मी, तु का एवढा निगर गठ्ठ झालेला आहेस का? तुला दाखवू काय कसे असत चिखलातून जाणे, तुला चिखलातच लोळवतो, सर्व्हीस रोड अजुन का नाही बांधलास? गोव्यात कसा बांधलास, माती कशी उडते अंगावर दाखवू का तुला असे राणे हे बोलू लागले आणि यावेळी माझ्या मागून दोन व्यक्ती येत त्यांनी अगोदरच नियोजन करून ठेवलेल्या चिखल बादल्या घेवून बादल्यातून आपल्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. तसेच त्यावेळी मी पळून जावू नये म्हणून राणे यांनी माझा हात पकडून ठेवला. यावेळी चिखल ओतणार्‍या दोघापैकी मिलिंद मेस्त्री (रा. कलमठ) यांना त्यांनी ओळखले. त्यानंतर आम. राणे यांनी आपल्याला ढकलुन पुलाच्या कडेस नेले व त्यांच्या कार्यकर्त्यांना याला बांधा रे असे म्हणून मला बांधून ठेवण्याची चिथावणी दिली. तसेच तुला चिखलात नेवून टाकतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते मामा हळदिवे, निखिल आचरेकर, संदीप सावंत यांनी महामार्गावर बांधलेली पांढरी पट्टी तोडून काढत त्या पट्टीने मला बांधून ठेवले आणि त्यानंतर हाताला धरून ढकलत चालत नेले आणि अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या घरासमोरील साचलेल्या पाण्यातुन चालत नेले. यावेळी तेथे उभे असताना नगरसेविका मेघा गांगण यांनी पाठीवर हाताच्या थापटाने धक्काबुक्की केली. यावेळी तेथे आलेल्या पोलिसांनी गर्दीतून आपल्याला बाजूला नेले. झालेल्या मानहानीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून आपण कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती फिर्यादीत शेडेकर यांनी दिली. दरम्यान, अटकेनंतर नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
नारायण राणेंचा माफीनामा
पण मुलाला वाचविण्याचा प्रयत्न
कणकवलीच्या गडनदीच्या पुलाला बांधून उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या चिखलफेकीबद्दल त्यांचे वडील व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर माफी मागितली आहे. मात्र त्यांनी नितेश राणे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे म्हणाले की, अभियंत्यांवर चिखलफेक नितेश राणेंनी नव्हे तर त्यांच्या समर्थकांनी केली.

Wednesday, 3 July 2019

बर्माच्या रंगून शहरात जन्म गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी


गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा जोर वाढल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना बाजूला सारून राजकोटचे भाजपा नेते विजय रुपानी यांनी 22 डिसेंबर 2017 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बर्माच्या रंगून शहरात (आता म्यानमारचे यांगॉन शहर) जन्मलेले 62 वर्षांचे रुपानी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. अभाविपचे कार्यकर्ते, जनसंघ, आणीबाणी काळात कैद, महापौर, आमदार, खासदार अशी त्यांची प्रदीर्घ वाटचाल असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपाशी कायम एकनिष्ठ राहिल्याचे फळ त्यांना मिळाले.
विजय रुपानींचा जन्म जैन बनिया कुटुंबात झाला. त्यांचे आईवडील मायाबेन आणि रमणीकलाल रुपानी यांची रसिकलाल अ‍ॅण्ड सन्स नावाची कंपनी आहे. उसाचा रस, बर्फाचा गोळा बनविणार्‍या यंत्रापासून विविध प्रकारचे पाईप कंपनी बनविते. त्यांना सात अपत्य होती. विजय रुपानी सर्वात धाकटे आहेत. म्यानमारमध्ये अशांतता निर्माण झाल्यानंतर 1960 साली हे कुटुंब गुजरातच्या राजकोट शहरात स्थायिक झाले. विजय रुपानी यांची पत्नी अंजली रुपानी याही भाजपात सक्रीय आहेत. त्यांना दोन मुलगे ऋषभ, पुजित व कन्या राधिका आहे. पुजितचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. त्याच्या नावाने राजकोट शहरात ट्रस्ट चालविला जातो.


विजय रुपानी यांच्यावर 2011 साली शेअरच्या किंमती आणि स्टॉक्समध्ये गैरप्रकारे उलाढाल केल्याचा आरोप आहे. सेबीने त्यांच्यावर दंडही लादला होता. मात्र नंतर हा दंड रद्द करून फेरसुनावणीचा आदेश देण्यात आला. 2017 साली
सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल आहे. राजकोटच्या श्री छोटू नगर गृहनिर्माण सोसायटीत राहणार्‍या मानसिंह भाई या वॉचमनला सोसायटीतून हद्दपार करण्याच्या बदल्यात विजय रुपानींच्या पुजित धर्मादाय ट्रस्टला सोसायटीची जागा देण्याचा सौदा होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी मानसिंह भाई यांचा स्थानिक पालिकेकडून प्रचंड छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून या कुटुंबाने 2013 साली पालिकेसमोर स्वतःला जाळून घेतले. यात कुटुंबातील 7 जणांपैकी मधुरा आणि गौरीबेन या दोनच महिला जिवीत राहिल्या. भरत, गिरीश, आशा, रेखा, बासमती यांचे निधन झाले. या कुटुंबातील एकमेव जिवित पुरुष महेंद्रभाई सध्या न्यायालयात लढा देत आहेत.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...