Saturday, 30 November 2019

उद्धवजींच्या मस्तकी काटेरी मुकुट


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आजपासून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री नाहीत तर एका महत्त्वपूर्ण पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे यश/अपयश हे त्यांच्या सरकारचेच राहणार नसून शिवसेनेवर त्यांचा मोठा परिणाम होणार आहे. परिणामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारची आणि पक्षाची अशी दुहेरी जबाबदारी आहे. एखादा मुख्यमंत्री अपयशी ठरला तर ती व्यक्ती बदलता येते. पण उद्धवजींच्या बाबतीत हा पर्यायच असू शकत नाही. कारण ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख दोन्ही आहेत.
उद्धव ठाकरे यांना पूर्वी राजकारणात रस नव्हता. छायाचित्रीकरण हा त्यांचा आवडता विषय होता. यात त्यांचे कौशल्य आहे हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. ‘साहेब, बॅडमिंटन खेळत आहेत.’ हेही वाक्य त्यांना फोन करणार्‍यांनी कधी न कधी ऐकवलेच असणार आहे. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती जबाबदारी पेलली. अत्यंत टोकाची टीका सहन केली. आपले व्यक्तिमत्त्व आक्रमक नाही हे ओळखून हळूहळू शिवसेनेत बदल केला आणि त्यात धूर्तपणा आणला. एकेक चाल खेळत ते इथपर्यंत येऊन पोहचले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासह त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ इतर कुणाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत हे जाणून त्यांनी केवळ नाईलाजाने हे मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. ते अपयशी ठरले तर शिवसेनेचा शेवट होईल हा धोका त्यांना पत्करावा लागला आहे.
शिवसेनेने आजवर रांगडे राजकारण केले, भावनिक राजकारण केले, जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला साद घालून पक्षाची एकजूट आणि उत्साह कायम ठेवला. पण सरकारमध्ये बसल्यावर भावनेला साद घालून उपयोग नसतो. जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. कधी कधी या अपेक्षा अतिशय वाढतात. त्याला तारतम्यही राहत नाही. अशा वेळी निर्णय घ्यायचे आणि जनतेला ते समजावून सांगायचे हे अग्निदिव्य असते. रस्त्यावर उभे राहून घोषणा देणे वेगळे, जाहीरनाम्यात आश्‍वासने देणे वेगळे आणि प्रत्यक्ष आर्थिक आकडेवारी मांडून निर्णय घेणे हे वेगळेच असते. त्यातच देवेंद्र फडणवीसांसारखा दुखावलेला विरोधी पक्ष नेता आणि सणसणीत चपराक खाल्ल्याने संतप्त असलेला भाजपा यांनाही रोज तोंड द्यायचे आहे. शरद पवार आणि सोनियाजींचे हट्ट पुरवायचे, विरोधकांना झेलायचे, जनतेचे समाधान करायचे आणि त्याबरोबर शिवसेना वाढवून पाच वर्षांनंतरच्या निवडणुकीला सामोरे जायचे हा प्रवास धगधगत्या निखार्‍यावर चालण्यासारखा आहे. मनात जर विश्‍वास आणि आस्था असेल तर त्यावरून चालताना पाय पोळत नाहीत. नाहीतर प्रत्येक पावलाला चटका बसतो. आजवर उद्धवजींनी अनेकदा टोकाच्या भूमिका घेतल्या आणि नंतर त्या हव्या तशा वाकवल्या किंवा तोडूनही टाकल्या. आता असे चालणार नाही. कारण केवळ भूमिका घ्यायची नसून निर्णयही घ्यायचा आहे आणि या निर्णयाचा परिणाम त्यांच्या पक्षावरही होणार आहे. ही तारेवरची कसरत ते कशी पार पाडतात याची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला आहे.

Wednesday, 27 November 2019

अजित पवार अस्तनीतील निखारा


महाराष्ट्रात विविध काळात जेव्हा जेव्हा सत्तानाट्य घडले तेव्हा तेव्हा ते केवळ एका माणसाच्या महत्त्वाकांक्षेपोटी घडले याला इतिहास साक्ष आहे. महत्त्वाकांक्षा कधीही वाईट नसते, पण महत्त्वाकांक्षेच्या जोडीला संयम आणि सुजाणपणा नसेल तर ती महत्त्वाकांक्षा अस्तनीतील निखाऱ्याप्रमाणे चटके देत राहते. महाराष्ट्रात अजित पवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
अजित पवार उत्तम वक्ते आहेत, त्यांचा वेगळा करिष्मा आहे. ते सभा गाजवू शकतात, प्रचाराच्या काळात त्यांची भाषणे ऐकायला तुफान गर्दी उसळते. एखाद्या पक्षाची लोकप्रियता वाढवायला पक्षाचा विस्तार करायला अशा नेत्याची अत्यंत गरज असते. त्यामुळेच पक्षात त्यांना कायम मानाचे स्थान असते. योग अभ्यास रामदेवबाबांनीच सांगावा, डायलॉग शत्रुघ्न सिन्हानेच म्हणावेत, एखाद्याची चिरफाड राज ठाकरेंनीच करावी आणि रांगड्या भाषेत कुणाची टोपी उडवायची तर ते अजित पवारांचेच शब्द असावेत. हे सर्व गुणी नेते आहेत, पण त्यांच्या मर्यादा आहेत, या मर्यादांमुळेच पक्षाचे नेतृत्त्व करण्यास ते योग्य नाहीत.
शरद पवार हे अजित पवारांना मुख्यमंत्री पदावरून किंवा इतर महत्त्वाच्या पदावरून का डावलत असतील त्याचे कारण गेल्या 25 दिवसांत महाराष्ट्राने पाहिले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले त्यानंतरच्या काळात त्या सरकारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अद्याप विस्मरणात गेले नाहीत. धरणात पाणी नाही तर मुतू का? या अजित पवारांच्या एका वाक्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जितकी हानी केली तितकी इतर कशानेच झाली नसेल. आततायी, संतापी वागणे आणि परिणामांचा अंदाज न घेता बेछूट निर्णय घेणे या अजित पवारांच्या स्वभावाने पक्षाला अनेकदा अडचणीत आणले. पार्थ पवारला उमेदवारी द्यायचा हट्ट करायचा ही तर धक्कादायक घोडचूक होती. अजित पवार भविष्यात सरकारच्या उच्च पदावर जातीलही, पण ते त्यांचे कर्तृत्त्व नसेल. ते उच्चपद हे त्यांना सतत सावरणारे शरद पवार यांनी नाईलाजाने त्यांचा पुरवलेला हट्ट असेल. अजित पवार हे उत्तम नेते आहेत. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे नेतृत्त्व गुण त्यांच्यात नाहीत. वेळ, काळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची काकांची क्षमता त्यांच्यात नाही. आज त्यांचा पक्ष वाचवायला शरद पवार आहेत, पण भविष्यात अजित पवारांकडे धुरा गेली तर अस्तनीतील हा निखारा स्वतः जळेल आणि पक्षाचीही भरून न निघणारी हानी करील. अजित पवारांनी स्वतः चिंतन करून एक पायरी खाली उतरले तर पक्षाचे भले होईल.

Thursday, 14 November 2019

पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये


आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’ कडक शब्दांत निषेध करीत आहे. पत्रकार हे आपले गुलाम आहेत हे समजण्याचा माज नेत्यांनी करू नये. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नसल्याने शेतकर्‍यांपासून सर्वच हवालदिल आहेत, अशा स्थितीत सत्ता स्थापनेची प्रत्येक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार रात्रंदिवस करीत आहेत. हे काम करताना ऊन असो, पाऊस असो, पोटात सकाळपासून एक कण अन्‍नाचा नाही तरी पत्रकार माहिती मिळविण्यासाठी  धावाधाव करीत आहेत. गेले 21 दिवस जीवाचे रान करीत आहेत आणि आज त्यांना फसविण्यासाठी अजित पवार चेहर्‍यावर संताप आणून बाहेर येत बैठक रद्द झाल्याचे सांगतात. अजित पवार उद्या येतील असे शरद पवार सांगतात. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सर्वच बैठक रद्द झाल्याचे सांगतात आणि मग लपून अज्ञातस्थळी जाऊन बैठक घेतात आणि आम्ही पत्रकारांची चेष्ट केली असे सांगतात हा काय प्रकार आहे?
पत्रकारांना फसवून, खोटे बोलत त्यांची चेष्टा करून अज्ञातस्थळी बैठक घ्यायची हे सर्व कशासाठी  केले? तुमच्या एकाही बैठकीवेळी  पत्रकारांना आत प्रवेश नसतो. तुम्ही नेते पंचतारांकित हॉटेलात बसता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वातानुकूलित सभागृहात बसता, चहा पिता, जेवता तेव्हा पत्रकार उंबरठ्याबाहेर तासन्तास तुमची बैठका संपण्याची वाट पाहत बसतो. भररस्त्यात पत्रकार उभे असतात. त्यांना बसायलाही जागा नसते, डोक्यावर पंखा नसतो, जेवायला गेलो आणि बैठक संपली तर बाईट मिळणार नाही  म्हणून भुकेल्यापोटी हे पत्रकार तिथेच उभे राहतात. हे नेते त्यांना कधी पाणी विचारत नाहीत की चहा देत नाहीत की स्टूल देत नाहीत. बैठकीत खरे काय चालले हे पत्रकारांना कळतही नाही. मग पत्रकारांचे हंसे करून, नाटके करून अज्ञातस्थळी बैठक घेतली कशाला? शेवटी तुम्ही बैठकीतून बाहेर येऊन जे सांगता आणि जितके सांगता तितकेच आम्ही दाखवितो. तरीही आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिनय करून, खोटे बोलून पत्रकारांची चेष्टा केली. या नेत्यांच्या दिवसभर बैठका चालतात, पण अंगावरच्या पांढर्‍या झब्ब्याला सुरकुती पडत नाही इतकी सर्व सोय असते आणि या बैठकीतून जे निष्पन्‍न होणार आहे त्याचा मलिदाही या नेत्यांनाच मिळणार आहे. तरीही पत्रकारांवर माज करायचा. त्यांनाच लाथाडायचे. त्यांना फसवायचे. त्यांची चेष्टा करायची हे शोभते का? तुम्ही नेते शेतकर्‍यांच्या बांधावर जाता त्याच्या बातम्या दिल्या गेल्या नाहीत तर तुम्ही शेतकर्‍यांकडे फिरकणारही नाही हे सत्य अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा नेत्यांनो, जरा जपून आणि जितेंद्र आव्हाडजी, चेष्टा कुणाची आणि कधी करायची याचे भान नेत्यांना राखायला सांगा. आम्ही वर्तमानपत्राचे कर्मचारी आहोत, पत्रकार आहोत, तुमचे गुलाम नाही!

Friday, 1 November 2019

आरेतील वृक्षतोडी बाबत वृक्षतज्ज्ञांना समितीतून हाकला

मांजर दूध प्यायलं! सर्वांनी पाहिले!
पण या वृक्षतोडीला शिवसेनाच 100 टक्के जबाबदार


प्रदुषणाने घुसमटत चाललेल्या मुंबईला ऑक्सिजन भरभरून देणारे आरे परिसरातील जवळजवळ अडीच हजार वृक्ष मेट्रोच्या कारशेडसाठी कापले जाणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतील भाजपा आणि शिवसेनेने षडयंत्र करून ही कत्तल मंजूर केली. शिवसेना आता वृक्षतज्ज्ञांनी दीड कोटीची लाच घेतल्याचा आरोप करीत असली तरी स्वतः शिवसेनेने किती लाच घेतली या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे शिवसेनेने मांजरीप्रमाणे डोळे बंद करून दूध मटकावले, पण त्यांना जिभल्या चाटताना अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आहे.
भाजपाला आरे परिसरातच मेट्रो कारशेडसाठी जागा हवी होती आणि त्यांनी त्यासाठी शिवसेनेला पटविले हे उघड आहे. शिवसेनेचे 6 आणि उपस्थित वृक्षतज्ज्ञ (3) यांनी विरोधात मतदान केले असते तरी आरेतील झाडे वाचली असती. पण त्या दिवशी बैठकीत काय झाले? वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्त पाच वृक्षतज्ज्ञांपैकी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी डॉ. दीपक आपटे आणि मनोहर सावंत हे त्या दिवशी गैरहजर राहिले. हे दोघे का गैरहजर राहिले याची कारणे मुंबईकरांना द्यायला हवी. जे तीन वृक्षतज्ज्ञ बैठकीला उपस्थित होते त्यापैकी 15 वर्षे पॅनलवर असलेले सुभाष पाटणे, भाभा ऑटोमिक सेंटरचे डॉ. चंद्रकांत साळुंखे आणि डॉ. शशीरेखा सुरेशकुमार या तिघांनीही वृक्ष तोडण्यास परवानगी दिली. या तिघांनाही याबाबत जाब विचारला पाहिजे आणि जर त्यांचे उत्तर अमान्य झाले तर त्यांना तात्काळ समितीतून काढले पाहिजे.
वृक्षतज्ज्ञ म्हणून नेमलेल्या सुभाष पाटणे, चंद्रकांत साळुंखे आणि शशीरेखा सुरेशकुमार यांनी मेट्रो उभारणार्‍या ‘सॅम इंडिया’ कंपनीकडून प्रत्येकी 50 लाख रुपये लाच घेतली असा आरोप शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. यापैकी शशीरेखा सुरेशकुमार या मिठीबाई कॉलेजात वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्या म्हणतात की, जेव्हा मतदान झाले तेव्हा प्रचंड गोंधळ सुरू होता. मला वाटले की हा विषय पुढे ढकलण्यासाठी मतदान होत आहे. एका प्रसिद्ध कॉलेजच्या प्राध्यापिकेचा गोंधळ होत असेल तर सर्व गोंधळाचेच काम आहे. यासाठी मुंबईकरांनी या प्रत्येक वृक्षतज्ज्ञाला जाब विचारला पाहिजे.
पण हे वृक्षतज्ज्ञ जितके जबाबदार आहेत. त्याहून कितीतरी अधिकी पटीने आरेच्या वृक्षतोडीस शिवसेना जबाबदार आहे. वृक्षप्राधिकरण समितीची बैठक साधारणपणे दर 15 दिवसांनी घेतली जाते. पण यावेळी आरेसाठी अवाजवी घाई केली गेली. 15 दिवसांनी एक बैठक घेण्याऐवजी 15 दिवसांत 3 बैठका घेण्यात आल्या. इतकेच नव्हे तर दोन दिवसांत एक हजार पानांचा अहवाल तयार करण्यात आला. वृक्षप्राधिकरण समितीतील वृक्षतज्ज्ञ आणि भाजपावर आरोप करीत शिवसेनेचे यशवंत जाधव यांनीच ही माहिती दिली. मग इतक्या वेगवान घडामोडी घडत असताना शिवसेना झोपली होती की झोपेचे सोंग घेऊन पहुडली होती. आरेतील वृक्षतोडीला परवानगी देणारा प्रस्ताव मंजूर झालाच नसता कारण भाजपाचे या समितीत फक्त चार नगरसेवक आहेत. त्यांच्या विरोधात 5 वृक्षतज्ज्ञ, राष्ट्रवादीचा (राजकीय विरोधक) 1, काँग्रेसचे (राजकीय विरोधक) 2 आणि शिवसेनेचे तब्बल 6 नगरसेवक आहेत. म्हणजे समितीत भाजपा 4 विरुद्ध विरोधक 14 असे बलाबल आहे. तरीही भाजपाने जबड्यात हात घालून सर्व दात काढले. आता शिवसेना आणि काँग्रेस कोर्टात जाण्याची नाटकं करीत आहेत, पण लोक आता फसत नाहीत.
आरे वृक्षतोडीचा विषय निघाला त्या दिवशी 2 वृक्षतज्ज्ञ अनुपस्थित होते. त्यापैकी बीएनएचएसचे दीपक आपटे आहेत. जे सरकारविरोधात कोर्टात जाणार नाहीत कारण त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. जे उपस्थित होते त्यांना तर जायचेच नाही. काँग्रेसवाले सत्तेत राहून शहाणे झाले आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे सभात्याग करून वाट मोकळी करून दिली आणि आता ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणत रवी राजा वृक्षप्रेमाचा आव आणत आहेत. राष्ट्रवादीच्या एकाबद्दल बोलायला नको कारण हल्ली त्यांच्या नेत्यांचा संयम ढासळतो आहे.
उरली शिवसेना, त्यांचे सहापैकी सुवर्णा करंजे, प्रिती पाटणकर, रिद्धी खुरसुंगे आणि उमेश माने हे नगरसेवक आरे बाबत मतदान होईपर्यंत बैठकीला आलेच नाहीत. वृक्षतोडीचा निर्णय झाल्यावर बैठकीत पोहोचले. त्यांची म्हणे मातोश्रीला भेटून झाडाझडती घेणार आहेत. हे अधिकृत पक्षाचे वाक्य आहे. प्रत्यक्षात या चौघांना बहुदा ही टर्म संपल्यावर पुढल्या टर्मलाही वृक्षप्राधिकरण समितीवर घेण्याचे आश्वासन दिले जाईल. उशीर करून किती मोठे काम त्यांनी ‘करून दाखविले’ आहे. एकूण काय तर आरेतील झाडे गेली, ऑक्सिजन गेले. यानंतर नैसर्गिक आपत्ती ओढावणारच आहे. जेव्हा ओढवेल तेव्हा समिती नेमली जाईल. त्या समितीत हीच माणसे असतील. खरे सत्य हे आहे की, या पक्षांना आता जनतेचा धाक राहिला नाही. कारण कुटुंब फक्त स्वतःपुरती जगू लागली आहेत.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...