Friday, 27 December 2019

देव झाकणारा देश...


आज भारतातून सूर्यग्रहण पाहण्याचा अभूतपूर्व असा वैज्ञानिक योग आला. अनेकांनी या संधीचा फायदा घेतला, पण दुर्दैवाने बहुसंख्य भारतीय अंधश्रद्धेच्या बेड्या तोडू शकले नाहीत. सकाळी सूर्यग्रहणाच्या काळात एखादा परदेशी पाहुणा पत्रकार भारतात असता तर त्याने वैज्ञानिकरीत्या सूर्यग्रहण पाहणार्‍या एक टक्का डोळस भारतीयांवर लिहिले असते की, अंधश्रद्धा पाळणार्‍या बहुसंख्य भारतीयांबद्दल लिहिताना ‘देव झाकणारा देश...’ असे शीर्षक दिले असते, असा प्रश्‍न निर्माण झाला.
माणूस हा मुळात घाबरट, चंचल मनाचा, अस्थिर प्राणी आहे. त्यामुळे त्याने सर्व विश्‍व व्यापून टाकणार्‍या दैवी शक्तीच्या मूर्त स्वरुपाची निर्मिती केली आणि आपल्या आयुष्यातील सर्व बर्‍यावाईट घटना या त्या दैवी शक्तीमुळे घडतात, असे सांगून नामानिराळा झाला. आश्‍चर्य म्हणजे या चराचर व्यापून टाकणार्‍या दैवीशक्तीवरही माणसाने अमावास्या आणि ग्रहणाच्या काळात अविश्‍वास व्यक्त केला. या दैवीशक्तीची शक्ती अपार आहे हेही मान्य करण्यास माणूस तयार नाही. म्हणूनच ग्रह-तारे फिरताना पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यावर त्याचा दैवीशक्तींवरही वाईट परिणाम होईल, असे मानून भारतीयांनी अमावास्या आणि ग्रहण आहे, असे सांगत मंदिराची कवाडेच बंद केली. देवांनाच झाकून टाकले. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व घटना ज्याच्या इशार्‍यावर चालतात असे मानले जाते, त्या देवाला अमावास्या आणि ग्रहणापासून धोका निर्माण होतो? मग तो देव कसला आणि त्याची शक्ती कसली? देवाला सूतक लागू शकते का? जो आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवेल असे आपण मानतो तोच संकटात सापडू शकतो का? ग्रहणाच्या वेळी सूतक लागते म्हणून देव झाकून ठेवायचे आणि देवाचे दर्शन घ्यायचे नाही याचाच अर्थ आपण देवाची अपरंपार शक्ती मान्य करीत नाही. त्याच्या शक्तीबद्दल शंका घेतो आणि आपणच जर त्या शक्तीचे महात्म्य मानत नसलो तर मग आपण नेमके आस्तिक आहोत की नास्तिक आहोत?
देवाला झाकून ठेवता, गाभारे अंधारात ठेवता, मंदिराची दारे बंद करता, देवाला सूतक लागले म्हणता आणि त्याऊपर स्वतःला त्याचे भक्त म्हणवता? हा जगातील सर्वात उच्च पातळीचा विरोधाभास आहे. मंगळावर यान सोडताना शुभशकुन म्हणून आपण श्रीफळ वाढवितो त्याचाच हा पुढचा प्रकार आहे. त्याहून पुढची हद्द म्हणजे बीसीसीआयनी ट्विट करून रणजी सामने ग्रहणामुळे पुढे ढकलल्याचे जाहीर केले. श्रद्धा, सबुरी आणि विज्ञानाच्या मार्गावर पुढे जायचे आहे की अंधश्रद्धा आणि अशांततेच्या विळख्यात अडकून खितपत पडायचे आहे हे कधीतरी ठरविले पाहिजे.
ग्रहणावेळी इन्फ्रारेड व अल्ट्राव्हायोलेट किरणे प्रखरपणे बाहेर पडतात हे धांदात खोटे आहे, असे दा.कृ.सोमण म्हणतात. ते सांगतात की, सूर्यापुढे चंद्र येण्याला ग्रहण म्हणतात. त्यावेळी सूर्यात काहीच बदल होत नाही. त्याच्या किरणात काहीच बदल होत नाही. त्यामुळे एरवी दुपारच्या उन्हात चालून त्रास होतो, तितकाच त्रास होऊ शकतो. गर्भार महिलांवर काहीही दुष्परिणाम होत नाही, जेवल्याने, अन्न शिजवल्याने कोणताही अपाय होत नाही. आपण ग्रहणात फक्त सूर्याकडे बघताना काळजी घेतो. याचे कारण एरवी सूर्याच्या प्रखरतेमुळे आपण सूर्याकडे थेट बघत नाही. पण ग्रहणावेळी सूर्यावर सावली पडल्याने सूर्याकडे पाहणे सुसहय्य होते. परिणामी सूर्याकडे पाहत राहतात आणि मग डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. हा परिणाम होऊ नये इतकीच काळजी ग्रहणात घ्यायची असते. पण आज भारतातल्या अनेक भागात अन्न शिजले नाही, सकाळचे नाश्त्याचे स्टॉल लागले नाहीत, रस्त्यावर नेहमीची गर्दी दिसली नाही. तीन चतुर्थांश भारत जणू ग्रहण संपेपर्यंत स्तब्ध झाला होता. शौचासही जायचे नाही असे मानणारे अनेक आहेत. पाणी प्यायचे नसते असेही सांगतात. म्हणजे आजारीच पडायचे आणि ग्रहणाच्या अशुभ काळामुळे आजारी पडलो असे सांगत फिरायचे. गंमत अशी आहे की, हे सर्व अंधश्रद्धेचे नियम घालणारे कोणतेही आजारपण स्वतःच्या माथी मारून घ्यायला तयार नाहीत. म्हणून हे नियम सांगणारे असेही सांगतात की, ग्रहणातील सुतकात असलेले निर्बंध हे वृद्ध, बालके, रुग्ण, गर्भार महिला यांना लागू नाहीत.
हिंदू धर्म हा बदलत्या काळानुसार नवनवीन संकल्पना स्वीकारणारा धर्म आहे आणि म्हणूनच सतत आक्रमणे होऊनही या धर्माचा पाया कधीही दुभंगला नाही. आपण हा धर्म मानत असू तर त्यातील त्रासदायक ठरणार्‍या अंधश्रद्धा उखडून फेकल्या पाहिजेत. आपल्या ऋग्वेदात ग्रहणाचे वर्णन आहे. ग्रहणातील सूर्याच्या वेगवेगळ्या रूपांचे वर्णन आहे. त्यात राहूने सूर्य खाल्ला आणि मग सूर्य त्याच्या तोंडातून सुटला असे म्हटले आहे. तेव्हा वैज्ञानिक ज्ञान कमी होते म्हणून हा युक्तिवाद झाला, पण आता ग्रह-तार्‍यांचे इतके ज्ञान वाढल्यावरही तोच पूर्वीचा युक्तिवाद ग्राह्य मानायचा का? उलट आपण अभिमानाने म्हटले पाहिजे की, आपल्या ऋग्वेदात ग्रहणाचे वर्णन केले आहे इतका प्राचीन आपला अभ्यास आहे. इसवी सन 499 मध्ये आर्यभट्ट यांनी ग्रहणाचा अभ्यास करून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या स्थितीमुळे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण दिसते हे लिहून ठेवले आहे. अशा या महान आर्यभट्टाच्या कुळात आपण जन्माला आलो आहोत. त्यांचा अभ्यास पुढे न्यायचा की ग्रहणात देव झाकायचे? हा प्रश्‍न प्रत्येकाने विचारला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक सुताचा फरक असतो. या सुतावरून भविष्याचा मार्ग ठरतो.

Monday, 23 December 2019

देवेंद्रजी, जरा धीर धरा...


महाराष्ट्रात 2014 पूर्वीचा भाजपा आणि नंतरचा भाजपा हा अभ्यासाचा विषय ठरणार आहे. 2014 पूर्वी विरोधी पक्षाच्या बाकावरून एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस बोलायचे तेव्हा त्यांच्या प्रत्येक मुद्यावर विश्‍वास वाटायचा. देवेंद्र फडणवीस संपूर्ण माहिती घेऊन बोलतात अशी त्यांची प्रतिमा होती. पण 2014 साली कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकायची यासाठी घोडदौड सुरू झाली आणि भाजपाने कमाविलेला विश्‍वास घरंगळत रसातळाला गेला. गाडीभर पुराव्यांची रद्दी झाली आणि या रद्दीच्या गठ्ठ्यावर बसून फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला त्या दिवशी मुखवटेही टराटरा फाटले. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस या कोणत्याच पक्षावर जनतेचा काडीचा विश्‍वास राहिलेला नाही. इथे शब्दही प्रमाण नसतो आणि कृतीही शाश्‍वत नाही हे अवघ्या महाराष्ट्राने ओळखले आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आता थोडा धीर धरला पाहिजे. त्यांनी सत्तेत असताना सर्व पक्षातील विरोधकांचा असा नायनाट केला की भलेभले थक्क झाले. पण त्यांचे शेवटचे फासे चुकीचे पडले. त्यामुळे त्यांची पुन्हा येईनची सत्ता स्वप्न तर बुडालीच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची जनमानसातील व्यक्तिगत प्रतिमा डागाळली. देवेंद्र फडणवीस सत्य बोलतात असे जनमनात होते त्याला तडा गेला आहे. ती विश्‍वासार्हता परत मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी आता संयम राखला पाहिजे. नाही तर रोज उठून सरकारविरुद्ध बोलणारा बडबड नेता अशी त्यांची प्रतिमा होईल आणि ही प्रतिमा झाली तर मग कितीही व्हिडिओ टाका, ट्विट करा नाही तर पोस्ट करा लोक बडबडीकडे  दुर्लक्ष करतील.
हा सल्ला देवेंद्र फडणवीस यांना देण्याचे कारण  म्हणजे भाजपाची संपूर्ण आस या व्यक्तिमत्त्वावर आधारली आहे. अजून महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे देवेंद्र जे बोलतील आणि जसे वागतील त्याचा थेट परिणाम भाजपाच्या भवितव्यावर होणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांचे वर्तन पक्षासाठी घातक आहे. शिवसेनेने घेतलेली फारकत आणि अजित पवारांसह सत्ता स्थापनेचा फसलेला डाव या दोन्ही आघातांच्या वेदना देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक शब्दांतून घळाघळा वाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयांत ठेच खाल्लेल्या सद्गृहस्थाची अगतिकता आणि त्यातून निर्माण होणारा आक्रस्ताळेपणा दिसतो आहे. देवेंद्र फडणवीसांचे वागणे व्यक्ती म्हणून अपेक्षित असेच आहे. पण ते सर्वसाधारण व्यक्ती नव्हेत तर एका पक्षाचे नेतृत्त्व करीत आहेत. कदाचित त्यांचे हे पदही धोक्यात आले असावे. त्यातून आलेल्या अस्थिरतेत त्यांची मानसिकता बदलली असावी. पण आपले वागणे पक्षाला घातक ठरू शकते हे त्यांनी वेळीच ओळखले नाही तर त्यांचे पक्षातील स्थान आणि सन्मान काही काळात संपेल हेही शंभर टक्के सत्य आहे.
नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांचे वागणे हे अत्यंत बालिश होते आणि त्यांच्या मागे भाजपाला फरफटत जावे लागले. नवे सरकार सत्तेवर येऊन दोन आठवडेही झालेले नसताना फडणवीस कर्जमाफीची मागणी करताना दिसले. सर्वात दुर्दैवाचा क्षण म्हणजे अधिवेशनावेळी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकाचे बॅनर भाजपाने फडकविले आणि त्या दैनिकात जे प्रसिद्ध झाले त्यावरून रणकंदन माजविले. एका दैनिकाचा दाखला देऊन सरकारला जाब विचारणे हा आततायी निर्णय फडणवीसांनी का घेतला? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपाने अधिवेशनात तीन दिवस केला. हा विषय अधिवेशनात का आणला? दरवर्षी होणाऱ्या आमदारांच्या फोटोसेशनला फडणवीस उपस्थित राहिले नाही, धान उत्पादकांना सरकारने 200 रुपये वाढवून दिले तर फडणवीस म्हणतात की अवकाळीने धान उत्पादन झालेले नसल्याने धान विकत घ्यायचीच नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसाने ग्रस्त असलेल्यांना यापूर्वीच हेक्टरी आठ हजार रुपये राज्यपालांनी जाहीर केल्यावरही अवकाळीग्रस्तांना मदत जाहीर केली नाही अशी देवेंद्र बोंब ठोकत होते. महाआघडीला ‘तिघाडी’ सरकार म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे वाजपेयींच्या 13 पक्षांच्या सरकारला काय म्हणत असतील? सत्ता स्थापन होऊन दोन आठवडेही झाले नाहीत अशा सरकारने  लगेच विदर्भासाठी योजना जाहीर होणे शक्य नाही हे जाणूनही त्यावर देवेंद्रजी टीका करीत होते.
आता सात-बारा कोरा केला नाही यावर भाजपाने मोर्चे काढावे असा त्यांचा आदेश आहे. सरकसकट सर्वांना दोन लाख दिले याचे स्वागत नाही. याचे कारण काय? तर शिवसेनेने 7/12 कोरा करणार असा शब्द दिला होता. पण या शब्दावर शिवसेनेला मते देण्याइतका महाराष्ट्राचा मतदार खुळा नाही. शिवसेना काही करील इतकीच अपेक्षा या शब्दामुळे निर्माण झाली होती. प्रचारावेळी दिलेल्या शब्दांचा खेळ करायचा तर देवेंद्रजींनी घसा खरवडून डोंबिवलीकरांना 6 हजार कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते, 2014 च्या भाजपाच्या वचननाम्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करू, 24 तास पाणी, वीज पुरवू, कुशल कामगारांचा सतत पुरवठा करू, कृषीपंपांना दर दिवशी किमान 10 तास वीजपुरवठा करू अशी बरीच आश्‍वासने होती जी हवेत विरली. प्रचारातील शब्द प्रचारापुरते असतात हे जनतेला माहीत आहे. जनता केवळ पक्षाची साधारण विचारसणी काय आहे याचा अंदाज घेऊन मतदान करते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शब्दांच्या मागे लागून आततायीपणा करीत पक्षाचे हंसे करू नये तर सध्याच्या सरकारवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर पुराव्यांसह अंकुश ठेवावा ही भाजपाकडून अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण न करता केवळ आवाज चढवून आदळआपट करीत राहिलात तर पक्षाचे नुकसान होईल आणि पक्षाचे नुकसान होऊ लागले तर मोदींची छत्रछाया जाईल. तेव्हा देवेंद्रजी जरा धीर धरायला शिका...

Sunday, 22 December 2019

व्रतस्थाचा सूर्यास्त


अखंड जीवन एखादा ध्यास घेऊन जगणार्‍या व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाचा अंत कधी होऊ शकत नाही. केवळ सूर्यास्त होतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनाने व्यापलेली एक संपूर्ण पिढी सूर्योदय बनून उगवते आणि आपल्या तेजाने जग व्यापून टाकते. माझे वडील नीलकंठ यशवंत खाडीलकर हे असेच व्रतस्थ व्यक्तिमत्त्व होते. आज त्यांचे शरीर इहलोकातून परलोकात गेले, पण त्यांचे विचार, त्यांचा प्रत्येक प्रहार, त्यांचा प्रत्येक शब्द हा मराठी माणसाच्या मनात धगधगता निखारा बनून जिवंत आहे आणि हा निखारा असाच सदैव लढत राहील. अयोग्य ते भस्म करीत राहील आणि योग्य त्याला दिशा दाखवित राहील, अशी व्यक्तिमत्त्वे दुर्लभ असतात, पण आमचे साताजन्माचे पुण्य म्हणून ते आम्हाला वडील म्हणून लाभले आणि लढवय्या मनात मराठी माणसांत अग्रलेखांचे बादशहा म्हणून प्रेमाच्या, आपुलकीच्या स्थानावर राहिले.
पत्रकारिता म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नीलकंठ खाडीलकर होते. चार हजार खप असताना ‘नवाकाळ’चे दुधारी शस्त्र त्यांनी हाती घेतले आणि जनतेशी एकनिष्ठ राहण्याचा काटेरी मुकूट मस्तकावर पेलवत हे शस्त्र केवळ आणि केवळ जनतेच्या भल्यासाठी वापरले. कधीही आयुष्यात त्यांनी एका शब्दानेही जनतेशी प्रतारणा केली नाही. ‘ताठ कणा आणि मराठी बाणा’ हे ‘नवाकाळ’चे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कणखरतेतून घडले. पत्रकारिता ही लेखनापुरती मर्यादित न ठेवता खिळे जुळवून पाने तयार करणे, मशीन चालविणे, पेपरच्या गठ्ठ्यावर बसून पार्सल बांधणे ते ‘नवाकाळ’चे आर्थिक नियोजन करणे हे त्यांनी एक हाती करून दाखविले. इतकेच नव्हे तर वर्तमानपत्रात अग्रलेख पहिल्या पानावर छापून त्याने जनतेच्या विचारांना दिशा देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. त्यांचे आठ कॉलमचे धगधगते मथळे, सरकारचे डोके ताळ्यावर आणणारे अग्रलेख आणि कधीही न डगमगता, लाचार न होता, संकटांपुढे न झुकता जे चुकले त्यांच्यावर आसूड ओढायचे धाडस दाखविणारे ते एकमेव होते. राजकारणी त्यांचे शत्रू नव्हते, पण कधी मित्रही नव्हते. कारण आपण चुकलो तर मैत्री असूनही ‘भाऊ’ आपल्याला सोडणार नाहीत हे प्रत्येकाला माहीत होते. त्यांचे लेखन वाचून एक अख्खी पिढी प्रगल्भ झाली, एका पिढीला जगायची दिशा मिळाली, लढायचे धाडस मिळाले. म्हणूनच त्यांना जनतेने ‘अग्रलेखांचे बादशहा’ हा किताब बहाल केला. यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही.


थरथरत्या हाताने खिशात मावतील अशी पुस्तके लिहिणे ही त्यांचीच कल्पना होती. त्या पुस्तकाचा प्रत्येक विषय हा जनतेला ज्ञानी करण्यासाठी होता. त्यात कधी ‘मी’ नव्हता आणि कधी ‘बात’ नव्हती. ते नेहमी म्हणायचे की, काहीही घडले तरी ‘द शो मस्ट गो ऑन!’ मला काही झाले तरी ‘नवाकाळ’चा अग्रलेख लिहिलाच गेला पाहिजे. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अजोड पत्रकारिता हे मैलाचे दगड कधीच गाठता येणार नाही. पण त्यांच्या विचारांचे आणि लेखनाचे अमृत पिऊन आज माझ्या या सदैव अमर पित्याला आणि जनतेच्या अग्रलेखांच्या बादशहाला हा अग्रलेख लिहून मानाचा मुजरा करते. या सूर्याचा आज सूर्यास्त झाला, पण जनतेच्या मनातून, भावनेतून, विचारातून तो लाखो सूर्यकिरणे बनून रोज नित्यनियमाने व्रतस्थपणे आपले जीवन उजळत राहणार याची खात्री आहे.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...