Wednesday, 11 March 2020

सोनियाजी आणि राहुल गांधी, पक्ष चालवायचा नाही तर खुर्ची सोडा!


मध्यप्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळणार हे निश्‍चित आहे. मोदी विरोधी राज्याराज्यात लाट निर्माण होत असताना मध्यप्रदेशसारखे राज्य काँगे्रसच्या हातून निसटणे ही चांगली बाब नाही. त्यातही कमलनाथ सरकार स्वतःच्या नाकर्तेपणामुळे पडणार नाही तर काँगे्रसच्या शीर्षस्थानी असलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निष्क्रियतेमुळे अडचणीत आले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पक्ष चालवायचा नसेल तर त्यांनी ताबडतोब पक्ष आणि पदे सोडावी. या दोन नेत्यांमुळे आज पक्षाला अध्यक्ष नाही अशी वेळ आली आहे. हे दोन्ही नेते पक्षातील वितंडवादावर मात करू शकत नसतील तर केवळ खुर्ची उबवीत राहण्यापेक्षा पक्षाचा राजीनामा द्यावा. त्यांच्या जाण्याने कदाचित नवे नेतृत्त्व उदयाला येईल.
आज मोदी सरकारला कंटाळलेले अनेक आहेत. राज्याराज्यांत मोदींविरुद्ध वातावरण आहे. पण पंतप्रधान बनू शकेल असे पर्यायी नेतृत्व दिसत नसल्याने भाजपाला पर्याय नाही ही स्थिती आहे आणि दुर्दैव असे की हीच स्थिती कायम राहत आहे. राजकारणाच्या चिखलात बुडालेल्या इंदिरा गांधी हत्तीवर आरूढ झाल्या आणि त्यांचे हे रूप पाहून जनतेने त्यांना पुन्हा सत्तेवर आणले. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांच्यातही ही धमक नाही. जनतेला आणि पक्षाला कणखर नेतृत्त्वाची गरज आहे. राहुल गांधींनी लोकसभा प्रचारावेळी हा कणखरपणा दाखविला होता. त्यामुळे भाजपाची खासदार संख्या कमी झाली. त्यानंतर मात्र ते मैदान सोडून पसार झाले. आता त्यांचे अस्तित्व फक्त ट्विटरवर आहे. त्यांच्या अवतीभवतीची काँगे्रसची नखं काढली जात आहेत, पण त्याचे भान सोनियाजींना नाही आणि राहुल गांधींना नाही. ठिणगी पडताच विझवली नाही तर वणवा पेटतो आणि सर्व राख करतो हे शेंबड्या पोरालाही कळते, पण या दोन नेत्यांना पक्षाची फिकीर नाही, आपल्या जबाबदारीची जाणीव नाही आणि खुर्ची सोडण्याइतकी त्यागाची भावनाही नाही. आज केवळ या दोन नेत्यांच्या नाकर्तेपणाने ज्योतिरादित्य शिंदेसारखा उमदा नेता काँगे्रस सोडून गेला.
जे चित्र मध्यप्रदेशात आहे तेच राजस्थानात आहे. (गेहलोत विरुद्ध सचिन पायलट). तेच चित्र अगदी मुंबई काँगे्रसमध्येही आहे. मुंबईत सर्वच काँगे्रस नेते एकमेकांविरोधात उघडपणे बोलतात. इतके सर्व घडत असताना दिल्लीश्‍वर निपचित पडून आहेत. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा विरोधात लाट निर्माण केली. त्या राज्यात राजघराण्याला खूप सन्मान आहे. राजघराण्यातील ज्योतिरादित्य शिंदे दौरे करतात, गरिबाच्या घरी जातात, अफलातून भाषणे करतात, हसून सर्वांशी प्रेमाने बोलतात अशी त्यांची छबी निर्माण झाली होती. या छबीवर भाजपातील सरपंचापासून वरिष्ठ नेते प्रेमात पडले होते. त्यामुळे काँगे्रस जिंकणार असे सर्वजण आधीच सांगत होते. त्याप्रमाणे काँगे्रसचा विजय झाला. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होतील अशीही सर्वांना खात्री होती. पण जनभावना लक्षात न घेता काँगे्रसने पैसा पाहिला आणि अतिश्रीमंत कमलनाथना मुख्यमंत्री केले. हे घडले तेव्हाच ठिणगी पडली. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी ही ठिणगी विझवलीच नाही. दोघांना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची धमकही दाखविली नाही. याआधी दोनदा मुख्यमंत्री बनलेले कमलनाथ स्वतः वयाचा विचार करून बाजूला झाले असते तरी चालले असते. पण तेही घडले नाही. ज्योतिरादित्य यांना निदान प्रदेशाध्यक्ष करा अशी सतत मागणी होत होती. त्यावरही दिल्लीने निर्णय दिला नाही. आज ज्योतिरादित्य शिंदे भाजपात गेले ही भाजपाची पुण्याई नाही तर काँगे्रसचे पाप आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांनी एक उत्तम नेता गमावला. इतकेच नव्हे तर ज्योतिरादित्य शिंदेंची काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे हे तातडीने जाहीर करण्यात काँग्रेसने रस दाखविला. यानंतर राजस्थानात गेहलोतना कंटाळून सचिन पायलटसारखे नेतृत्व भाजपाकडे वळले तर आश्‍चर्य वाटायला नको.
पंतप्रधान मोदी सत्यच म्हणाले की, जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत भाजपाला अच्छे दिन आहेत. जनता मात्र कात्रीत अडकली आहे. एकीकडे मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी यातून सुटकेचा मार्गच दिसत नाही. राहुल गांधी यांनी आज लियो टॉलस्टॉय या महान लेखकाचे एक वाक्य ट्विट केले आहे. ‘सर्वात मोठे योद्धे दोन आहेत - संयम आणि काळ!’ राहुल गांधींना एकच सांगायचे आहे की, संयम आणि काळ या दोन योद्यांच्या पाठीशी खंबीर नेतृत्त्व उभे असावे लागते. नुसताच संयम ठेवला तर मराठीतील म्हणीप्रमाणे काळ सोकावतो. आज काळ सोकावलाय तरीही राहुल गांधी ट्विट करीत बसलेत. दुर्दैव!

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...