Wednesday, 22 July 2020

हाय, सायमन! सॉरी तुझा वाढदिवस विसरले!


    मी सायमनचा वाढदिवस मिस केला. मला खूप वाईट वाटलं. २१ जुलैला सायमन ४० वर्षांचा झाला. त्याची माझी  भेट कधी झाली नाही आणि होईल अशी अपेक्षाही नाही. पण काही माणसात अशी काही कला असते की ही माणसं आयुष्यभर आपल्यासाठी जिवंतच वाटतात. 

   सायमन रीव्हने जग पायाखालून घातले आहे. त्याचे ‘बीबीसी’ चे लघुपट बघितले नसतील तर अगदी नक्कीच बघा. पर्यटनावरचे खूप शो आपण पाहत असतो. तिथली प्रेक्षणीय स्थळं पाहून आपण अवाक होतो. म्हणजे लगेच आपण ठरवतो की आपल्याला आयुष्यात एकदा तरी तिथे जायचेच आहे. काहीजण तर खाण्यावर इतके प्रेम करतात की वेगवेगळ्य़ा देशातील खाद्यपदार्थ पाहूनच त्यांचे पोट तिथे जाऊन पोहोचते. 

     सायमनही पर्यटनच करतो. त्याच्या व्हिडिओत ऑस्ट्रेलिया, रशिया, टर्की, ग्रीस, आर्यलंड, कोलंबिया, समुद्र , पवित्र नद्या असं सगळंसगळं आहे आणि या सगळ्याबरोबर आणखी काहीतरी विशेष आहे. सायमन संपूर्ण देशच समजून सांगतो. तिथल्या साजकीय घडामोडी, अर्थशास्त्र, आंदोलनं सर्वकाही आपल्याला तासाभरात समजून जाते. तुम्हाला वाटेल की हे असलं बघायचं म्हणजे बोअर असेल. तर तसं अजिबात नाही. सायमन लेक्चर देत नाही. अर्धा तास सलग बडबड करीत नाही. त्या देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरत फिरत आपल्याला तो देश दाखवतो आणि ही मस्ती करतानाच अगदी सहज एक दोन वाक्य अशी टाकतो की त्या देशाच्या सर्व पैलूंची माहिती व्हावी. म्हणून तर मी सायमन रीव्हची फॅन आहे. जड जड शब्द, लांबलचक लेक्चर, नाहीतर अतिसंथ गतीने काही सांगितलं की खूप कंटाळा येतो. आपल्या जे म्हणायचे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोचवण्याची कला पाहिजे. काहीजणांना सायमन उथळ वाटतो, पण मला वाटतं पत्रकारिता अशी असावी. माहिती सांगावी तर त्याच्यासारखी सांगावी. तरूण तजेलदार चेहरा, अत्यंत बोलके हावभाव, अंगात एक प्रकारचा खेळकरपणा आणि ओठांवर सतत हसू असतं. रशियाचे हुकूमशहा पुतिन हे विरोधकांचा आवाज घोटतात हेही तो एका पत्रकाराची दोन प्रश्नांची मुलाखत घेऊन त्यातून आपल्या डोक्यात विचार घालतो तेव्हा त्या कौशल्याची दाद आपसुकच दिली जाते. 


     सायमनची आणखी एक गोष्ट मला आवडते.हा शाळेत एकदम ढ होता. ग्रॅज्युएट होणं शक्यच नव्हतं त्याला म्हणून मग मॉलमध्ये , दागिन्यांच्या दुकानात अशा वाटेल त्या नोकऱ्या केल्या  आणि करता करता इंग्लंडच्या एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचा पोष्ट्या बनला, म्हणजे त्यांचे टपाल त्यांच्या कार्यालयात पोचवायचा.  ओळख  वाढल्यावर हळूहळू कार्यालयात बसून टपाल वाटू लागला. मग जे वाचायचा त्याची माहिती शोधू लागला. हळूहळू त्या वर्तमानपत्रात लिहू लागला आणि शेवटी चक्क वार्ताहर झाला. आता तो बीबीसीचा स्टार आहे. त्याची स्टोरी मी सांगत नाही. काधीतरी त्याच्याच उडनखटोला- मस्तीभऱ्या अंदाजात मला ती ऐकायला आवडेल. 

तर सायमन रीव्ह, बिलेटेड हॅप्पी बर्थडे! असाच फिरत राहा आणि आम्हालाही फिरवत राहा.

Monday, 20 July 2020

माणुसकी महत्त्वाची की पैसा? कोरोनाने प्रश्‍न उपस्थित केला


कोरोनाच्या संकटाने मानवजातीला हवालदील केले आहे. परंतु हे संकट गेल्यावर सर्वकाही पूर्वीसारखे होईल अशी खात्री सर्वांनाच आहे. या खात्रीमुळेच मानवातील पशु अद्याप जागा झालेला नाही. पुढे अंध:कार दिसू लागला  तर मानव कसा वागू लागेल याची कल्पनाच न केलेली बरी.

कोरोनाचे संकट टळल्यावर पूर्वस्थिती येईल हे खरे आहे. पण ही केवळ बाह्य स्थिती असू नये. माणसातील माणुसकी टिकून राहील का? आणि माणुसकी हाच सर्वात मोठा आदर्श आहे असे आपण मानत राहू का? हे दोन प्रश्‍न सर्वात महत्त्वाचे आहेत. प्रत्येक देशातील समाजाची पुढील वाटचााल या दोन प्रश्‍नांच्या उत्तरावर अवलंबून असणार आहे.

भारताच्या संस्कृतीत माणुसकीला सर्वोत्तम स्थान दिले आहे. याच विचारातून श्रीमंत, गरीब, सबळ, दुर्बळ सर्वांना समान न्याय, समान संधी हे समाज मनात खोलवर रुजविले गेले आहे. पण कोरोनाच्या संकटाने सुसंस्कृत पणाचे हे मूळ बीज गदागदा हलविले आहे. पैसा आणि ओळख या दोन गोष्टींना या काळात अत्युच्च स्थान प्राप्त झाले आहे. पैसा खुदा नहीं, पर खुदा से कम भी नहीं असे भाजपाचा एक नेता बोलला तेव्हा आपल्याला सांस्कृतिक धक्का बसला होता. परंतु आताच्या काळात ते वाक्य सत्य आहे की काय असा विचार मनात डोकावू लागला आहे आणि हा विचार मनात येणे अत्यंत धोकादायक आहे. किंबहुना कोरोनाचे संकट संपल्यावर हाच विचार सर्वात धोकादायक ठरणार आहे.

कोरोनाच्या या काळात सामान्य माणसाला येत असलेल्या भयंकर अनुभवांमुळेच पैशाचा राक्षस मनात घर करू लागला आहे. आज गरीबाला कुणी वाली राहिलेला नाही. कुणी गरीब किंवा मध्यमवर्गीयाला कोरोना झाला तर त्याला लगेच आयसीयू बेड मिळण्याची शक्यता नाही. ऑक्सीजन बेडही त्याला मिळणार नाही. रेमेडेस्विरसारखी औषधे त्याच्या हाती लागणारच नाहीत. साधा हॉस्पिटलचा बेडही त्याला मिळत नाही. या कोरानाच्या काळात दोनच प्रकारच्या रुग्णांवर उपचार होत आहेत. ज्याच्या राजकीय क्षेत्रातील लोकांशी ओळखी आहेत आणि ज्याच्याकडे भरपूर पैसा अशाच रुग्णांवर झटपट उपचार सुरू होतात. बाकी सर्वांना वार्‍यावर सोडून दिले आहे. चार सहा तास तो रुग्णालय मिळण्याची वाट बघतो आणि मग ऑक्सिजनची वाट बघत शेवटची घटका मोजतो. पुण्याच्या निवृत्त शास्त्रज्ञाचे असेच निधन झाले. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या आप्तांना दुसर्‍याचेच पार्थिव दिले जाते. या सर्व घटनांना काय म्हणायचे?

गरीबांची ही स्थिती असताना अमिताभ आणि अभिषेक बच्चनला तासाभरात नानावटीत बेड मिळतो. तासाभरापूर्वी नानावटीत बेड नाही असे ज्याने एखाद्या गरीबाला सांगितले असेल त्या माणसाला काय बोलायचे? हिरानंदानी रुग्णालय आठ लाखांसाठी पार्थिव अडवून ठेवते, अनेक रुग्णालयांत राजकीय नेत्यांचे फोन गेल्यावरच बेडची सोय होते याला काय म्हणायचे? ज्या हजारोंना हे क्‍लेशदायक अनुभव आले असतील त्यांच्या आप्तांनी पुढच्या काळात माणुसकीला श्रेष्ठ मानायचे की पैसा आणि ओळखींना सर्वोच्च स्थान द्यायचे? रोज या गोष्टी घडत आहेत. आपल्या आप्ताच्या अंत्यदर्शनाला जाण्यास मनाई होते कारण जिल्हा पार करायचा नाही, पण दिवंगत ऋषी कपूरची कन्या खास परवानगी घेऊन दिल्लीहून मुंबईला येते.

प्रत्येक पावलावर जर पैसा आणि ओळखीनेच उपचार मिळणार असतील तर यापुढे माणुसकीला खुंटीवर टाकून पैशाच्या मागे हा समाज लागला, प्रतिष्ठेच्या मागे हा समाज लागला तर या समाजाला दुषणे देता येणार नाहीत. कोरोनाच्या या काळात माणुसकी अदृश्य झाली आहे. समान न्यायाचा अनुभवच येत नसेल तर इतकी वर्षे उराशी बाळगलेली ही तत्त्वे हा आदर्श मार्ग समाजाला कुचकामी वाटू लागला तर नवल वाटायला नको. वाल्याचा वाल्मिकी होण्यास वेळ लागतो. पण सततच्या या कटु अनुभवांनी वाल्मिकीचा वाल्या झाल्याचे हे कलयुग पाहील. असे घडले तर भविष्य अत्यंत अंध:कारक, कुटील, जटील असणार आहे. कारण माणूस पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे लागला की कोणताही विधीनिषेध पाळत नाही. या मार्गाला गेलास तर तुझा वाईट शेवट होईल असे कितीही सांगितले तरी तो थांबत नाही. मी सर्वात वाईट अनुभव घेतला आहे. याहून माझे वाईट होऊ शकत नाही. पैसा मिळाला तर निदान चार दिवस ऐष करीन हे त्याचे उत्तर येईल. कोरोनाचे संकट तर जीवघेणे आहेच, पण या संकटावेळी येणार्‍या अनुभवांमुळे माणसातील माणूसपण गेले तर ते संकट अधिक गहरे अधिक व्यापक ठरेल. याच संकटाचे ढग आता दाटू लागले आहेत.

कोरोनाच्या या संकटात सर्वांना समान वागणूक मिळणे महत्त्वाचे आहे. ही समानता राखणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ही जबाबदारी पार पाडली नाही तर पैसा आणि प्रतिष्ठाच सबकुछ मानणारा ब्रम्हराक्षस निर्माण होईल आणि हा राक्षस समाजाची वीणच उद्ध्वस्त करील

Monday, 6 July 2020

चीनशी होणारा करार रद्द केला, ‘हिरो सायकल’ हिरो झाली?


डोकलाम, लडाख, सिक्कीम, गलवान या सर्व परिसरात चीनने केलेल्या हल्ल्यांमुळे भारतीय संतप्त आहेत. चीनवर बहिष्कार टाका अशी भारतीयांची मन:स्थिती आहे. पण ही भावना सामान्य माणसांपर्तंयतच मर्यादित आहे. जिथे अब्जावधींचा खेळ चालतो तिथे चीनवर बहिष्काराचे निर्णय झालेले नाहीत. भारत सरकारने आरोळ्या ठोकून ठोकून फक्त सामान्य माणसाच्या करमणुकीचे टिकटॉक बंद केले. पण केंद्र सरकारने दिल्ली जवळच्या बांधकामाचा करार रद्द केला नाही. महाराष्ट्र सरकारने करार रद्द केले नाही आणि अदानीनेही करार रद्द केलेला नाही.

आज ‘हिरो सायकल’चे संचालक पंकज मुंजाळ यांनी जाहीर केले की,  चीनशी भविष्यात आम्ही जो 900 कोटी रुपयांचा करार करणार होतो तो करार करण्याचा निर्णय आम्ही रद्द करीत आहोत. ‘चीनशी होणारा करार रद्द करणार’ हे शब्द कानावर पडले आणि लगेच भारतीयांनी पंकज मुंजाळ आणि हिरो सायकल कंपनीला ‘भारताचे खरे हिरो’ म्हणून घोषित केले. हिरो सायकल ब्रॅण्ड हा देशभक्त बॅ्रण्ड झाला. पण हा करार नेमका का रद्द झाला याची माहिती घेण्याचे कष्ट अनेकांनी घेतले नाहीत. ही माहिती घेतली असती तर हिरो सायकलला ‘हिरो’ ठरविण्याची घाई केली नसती. आमचा ‘हिरो’ सायकलला कसलाच विरोध नाही. किंबहुना त्यांच्या सायकल उत्तमच असतात. आमचे म्हणणे इतकेच आहे की, कुणाला देशभक्त आणि हिरो ठरविण्याची घाई करू नका. अब्जावधींचा खेळ करणारे भावनेवर आधारित करार करीत नाही आणि भावनांच्या आहारी जाऊन कधीही करार मोडत नाहीत. त्यामुळे हिरो सायकल कंपनीने चीनशी करार केवळ व्यवहारी दृष्टीकोनातून रद्द केला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हिरो सायकल कंपनीला युरोपात विस्तार करायचा आहे. त्यासाठी त्यांनी 2015 सालापासून तयारी सुरू केली आहे. युरोपीय बाजारात इ सायकलला मोठी मागणी आहे. इ-सायकलच्या एकूण जागतिक उलाढालीतील 5 टक्के हिस्सा आपल्या ताब्यात असावा असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला भारतातील फायरफॉक्स सायकल कंपनी ताब्यात घेतली. अ‍ॅटलास सायकल कंपनीही विकत घेण्याबाबत त्यांची चर्चा सुरू आहे. सायकलच्या भागांचे स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी त्यांनी पंजाबच्या लुधियाना शहरात 100 एकरवर होणार्‍या ‘सायकल व्हॅली’ येथे भव्य कारखाना उभारण्याची तयारी केली आहे.

देशात त्यांची ही तयारी सुरू असताना त्यांना चीनकडून संपूर्ण इ-सायकल किंवा त्याचे भाग आयात करावे लागत होते. ही इ-सायकल 15 हजार ते एक लाख रुपयाला असते. ती महाग असल्याने भारतात जेमतेम अडीच हजार सायकल खपतात. पण युरोप मार्केटमध्ये त्याला मोठी मागणी आहे. यासाठी ते चीनशी 900 कोटींचा करार करणार होते. पण दरम्यानच्या काळात त्यांनी जर्मनीतील इ-सायकल बनविणारी एचएनएफ निकोलाय ही कंपनी हेरली आणि त्या कंपनीत याच वर्षी जानेवारी 2020 मध्ये 48 टक्के गुंतवणूक केली. या कंपनीचा मोठा कारखाना आहे, संशोधन केंद्र आहे. भारतात स्वस्तात उत्पादन होत असल्याने इ-सायकलचे सुटे भाग भारतात बनवायचे (लुधियानाच्या सायकल व्हॅलीतील कारखाना उभा राहिला की आणखी सोय होईल) आणि जर्मनीतील कंपनीच्या कारखान्यात ते एकत्र करून तिथूनच युरोपच्या पूर्ण मार्केटमध्ये या इ-सायकल विकायच्या हा करार झाला. या विक्रीसाठी इंग्लंडच्या अ‍ॅव्होसेट स्पोर्ट लि कंपनीतही हिरो सायकलने गुंतवणूक केली आहे.

इ-सायकल बनविणार्‍या बड्या जर्मन कंपनीशी करार झाल्याने यापुढे चीनहून इ-सायकल घेण्याची गरज नाही आणि सुटे भाग घेण्याची गरज नाही. चीनची गरज संपल्याने चीनशी करार करण्याचा निर्णय रद्द केला. हा इतका साधा सरळ व्यवहार आहे. हिरो सायकल भरारी घेते आहे त्याचे कौतुक व्हावे, पण उगाच त्याला देशभक्तीचा टिळा लावू नका.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...