Thursday, 6 August 2020

शिवसैनिकांवर घोर अन्याय



                आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गेले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्याची दानत भाजपने दाखवू नये हे दुर्दैवी आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात ही जाहिरात छापून आठवणींना उजाळा देण्यापलीकडे शिवसेना काही करू शकली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांची आठवण येते असे म्हटले पण आज शिवसेनेचे सर्वोच्च नेते असलेले उद्धव ठाकरे यांना आमंत्रण का नाही असा जाब भाजपकडे विचारला नाही. 

        सरसंघचालक मोहन भागवत आणि भैय्याजी जोशी यांनाही आमंत्रित केले, पण शिवसेनेला पूर्ण डावलले. प्रभू श्री रामाचे पूजन झाले पण त्यांची राजनीती अवलंबली नाही. बाबरी मशीद पडल्याचा खटला सुरू झाला तेव्हा भाजपचे सर्वच्या सर्व नेते दूर पळाले. बाबरी पाडण्यात आमचा हात नाही, असे प्रत्येक जण न्यायालयात सांगत राहिला. स्वतःची कातडी बचावली आणि जे कारसेवक हुतात्मा झाले त्यांना वार्‍यावर सोडून दिले. जय श्रीराम म्हणून प्राणाची आहुती देणारे एकटे पडले. त्या क्षणी एक व्यक्ती निडरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ही एकमेव व्यक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! ही एकच अशी व्यक्ती होती ज्यांनी शिक्षेची परवा केली नाही, खटल्याची परवा केली नाही. ही एकच अशी व्यक्ती होती जिने निडरपणे सांगितले की, होय, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली. होय हे कार्य आम्ही केले! ही गर्जना करण्याची छाती आज व्यासपीठावर बसलेल्या एकातही तेव्हा नव्हती आणि आजही नाही. अशा शिवसेनाप्रमुखांच्या एकाही प्रतिनिधीला आज व्यासपीठाचा सन्मान दिला नाही, साधं आमंत्रण दिलं नाही. अगदी कालदेखील वाटत होतं की आमंत्रण येईल. कुणीतरी शिवसेनेचा प्रतिनिधी व्यासपीठावर असेल पण तसं घडलं नाही. 


            रामाने भरताला प्रेम दिले आणि भरताने रामाचा आदर राखला. हे रामायणातच घडते हे आज दुर्दैवाने म्हणावे लागेल. अयोध्येला आमंत्रित केले नाहीच पण निदान मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करायला हवे होते. तेही केले नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी वैर आहे पण ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. या नात्याने त्यांना आमंत्रण आणि सन्मान झालाच पाहिजे होता. ते शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा सन्मान हा शिवसैनिकांचा सन्मान असतो. त्यांना डावलून तुम्ही बाबरी घटनेत आहुती दिलेल्या आणि जिगरबाजपणे आघाडीवर गेलेल्या प्रत्येक शिवसैनिकांचा अपमान केला. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात हे घडावे हे दुर्दैवी आहे. मंदिराचा कळस चढेपर्यंत तरी संबंधितांना प्रभू रामाची खरी ओळख होऊन सुबुद्धी येऊ दे.

Wednesday, 22 July 2020

हाय, सायमन! सॉरी तुझा वाढदिवस विसरले!


    मी सायमनचा वाढदिवस मिस केला. मला खूप वाईट वाटलं. २१ जुलैला सायमन ४० वर्षांचा झाला. त्याची माझी  भेट कधी झाली नाही आणि होईल अशी अपेक्षाही नाही. पण काही माणसात अशी काही कला असते की ही माणसं आयुष्यभर आपल्यासाठी जिवंतच वाटतात. 

   सायमन रीव्हने जग पायाखालून घातले आहे. त्याचे ‘बीबीसी’ चे लघुपट बघितले नसतील तर अगदी नक्कीच बघा. पर्यटनावरचे खूप शो आपण पाहत असतो. तिथली प्रेक्षणीय स्थळं पाहून आपण अवाक होतो. म्हणजे लगेच आपण ठरवतो की आपल्याला आयुष्यात एकदा तरी तिथे जायचेच आहे. काहीजण तर खाण्यावर इतके प्रेम करतात की वेगवेगळ्य़ा देशातील खाद्यपदार्थ पाहूनच त्यांचे पोट तिथे जाऊन पोहोचते. 

     सायमनही पर्यटनच करतो. त्याच्या व्हिडिओत ऑस्ट्रेलिया, रशिया, टर्की, ग्रीस, आर्यलंड, कोलंबिया, समुद्र , पवित्र नद्या असं सगळंसगळं आहे आणि या सगळ्याबरोबर आणखी काहीतरी विशेष आहे. सायमन संपूर्ण देशच समजून सांगतो. तिथल्या साजकीय घडामोडी, अर्थशास्त्र, आंदोलनं सर्वकाही आपल्याला तासाभरात समजून जाते. तुम्हाला वाटेल की हे असलं बघायचं म्हणजे बोअर असेल. तर तसं अजिबात नाही. सायमन लेक्चर देत नाही. अर्धा तास सलग बडबड करीत नाही. त्या देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरत फिरत आपल्याला तो देश दाखवतो आणि ही मस्ती करतानाच अगदी सहज एक दोन वाक्य अशी टाकतो की त्या देशाच्या सर्व पैलूंची माहिती व्हावी. म्हणून तर मी सायमन रीव्हची फॅन आहे. जड जड शब्द, लांबलचक लेक्चर, नाहीतर अतिसंथ गतीने काही सांगितलं की खूप कंटाळा येतो. आपल्या जे म्हणायचे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोचवण्याची कला पाहिजे. काहीजणांना सायमन उथळ वाटतो, पण मला वाटतं पत्रकारिता अशी असावी. माहिती सांगावी तर त्याच्यासारखी सांगावी. तरूण तजेलदार चेहरा, अत्यंत बोलके हावभाव, अंगात एक प्रकारचा खेळकरपणा आणि ओठांवर सतत हसू असतं. रशियाचे हुकूमशहा पुतिन हे विरोधकांचा आवाज घोटतात हेही तो एका पत्रकाराची दोन प्रश्नांची मुलाखत घेऊन त्यातून आपल्या डोक्यात विचार घालतो तेव्हा त्या कौशल्याची दाद आपसुकच दिली जाते. 


     सायमनची आणखी एक गोष्ट मला आवडते.हा शाळेत एकदम ढ होता. ग्रॅज्युएट होणं शक्यच नव्हतं त्याला म्हणून मग मॉलमध्ये , दागिन्यांच्या दुकानात अशा वाटेल त्या नोकऱ्या केल्या  आणि करता करता इंग्लंडच्या एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचा पोष्ट्या बनला, म्हणजे त्यांचे टपाल त्यांच्या कार्यालयात पोचवायचा.  ओळख  वाढल्यावर हळूहळू कार्यालयात बसून टपाल वाटू लागला. मग जे वाचायचा त्याची माहिती शोधू लागला. हळूहळू त्या वर्तमानपत्रात लिहू लागला आणि शेवटी चक्क वार्ताहर झाला. आता तो बीबीसीचा स्टार आहे. त्याची स्टोरी मी सांगत नाही. काधीतरी त्याच्याच उडनखटोला- मस्तीभऱ्या अंदाजात मला ती ऐकायला आवडेल. 

तर सायमन रीव्ह, बिलेटेड हॅप्पी बर्थडे! असाच फिरत राहा आणि आम्हालाही फिरवत राहा.

Monday, 20 July 2020

माणुसकी महत्त्वाची की पैसा? कोरोनाने प्रश्‍न उपस्थित केला


कोरोनाच्या संकटाने मानवजातीला हवालदील केले आहे. परंतु हे संकट गेल्यावर सर्वकाही पूर्वीसारखे होईल अशी खात्री सर्वांनाच आहे. या खात्रीमुळेच मानवातील पशु अद्याप जागा झालेला नाही. पुढे अंध:कार दिसू लागला  तर मानव कसा वागू लागेल याची कल्पनाच न केलेली बरी.

कोरोनाचे संकट टळल्यावर पूर्वस्थिती येईल हे खरे आहे. पण ही केवळ बाह्य स्थिती असू नये. माणसातील माणुसकी टिकून राहील का? आणि माणुसकी हाच सर्वात मोठा आदर्श आहे असे आपण मानत राहू का? हे दोन प्रश्‍न सर्वात महत्त्वाचे आहेत. प्रत्येक देशातील समाजाची पुढील वाटचााल या दोन प्रश्‍नांच्या उत्तरावर अवलंबून असणार आहे.

भारताच्या संस्कृतीत माणुसकीला सर्वोत्तम स्थान दिले आहे. याच विचारातून श्रीमंत, गरीब, सबळ, दुर्बळ सर्वांना समान न्याय, समान संधी हे समाज मनात खोलवर रुजविले गेले आहे. पण कोरोनाच्या संकटाने सुसंस्कृत पणाचे हे मूळ बीज गदागदा हलविले आहे. पैसा आणि ओळख या दोन गोष्टींना या काळात अत्युच्च स्थान प्राप्त झाले आहे. पैसा खुदा नहीं, पर खुदा से कम भी नहीं असे भाजपाचा एक नेता बोलला तेव्हा आपल्याला सांस्कृतिक धक्का बसला होता. परंतु आताच्या काळात ते वाक्य सत्य आहे की काय असा विचार मनात डोकावू लागला आहे आणि हा विचार मनात येणे अत्यंत धोकादायक आहे. किंबहुना कोरोनाचे संकट संपल्यावर हाच विचार सर्वात धोकादायक ठरणार आहे.

कोरोनाच्या या काळात सामान्य माणसाला येत असलेल्या भयंकर अनुभवांमुळेच पैशाचा राक्षस मनात घर करू लागला आहे. आज गरीबाला कुणी वाली राहिलेला नाही. कुणी गरीब किंवा मध्यमवर्गीयाला कोरोना झाला तर त्याला लगेच आयसीयू बेड मिळण्याची शक्यता नाही. ऑक्सीजन बेडही त्याला मिळणार नाही. रेमेडेस्विरसारखी औषधे त्याच्या हाती लागणारच नाहीत. साधा हॉस्पिटलचा बेडही त्याला मिळत नाही. या कोरानाच्या काळात दोनच प्रकारच्या रुग्णांवर उपचार होत आहेत. ज्याच्या राजकीय क्षेत्रातील लोकांशी ओळखी आहेत आणि ज्याच्याकडे भरपूर पैसा अशाच रुग्णांवर झटपट उपचार सुरू होतात. बाकी सर्वांना वार्‍यावर सोडून दिले आहे. चार सहा तास तो रुग्णालय मिळण्याची वाट बघतो आणि मग ऑक्सिजनची वाट बघत शेवटची घटका मोजतो. पुण्याच्या निवृत्त शास्त्रज्ञाचे असेच निधन झाले. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या आप्तांना दुसर्‍याचेच पार्थिव दिले जाते. या सर्व घटनांना काय म्हणायचे?

गरीबांची ही स्थिती असताना अमिताभ आणि अभिषेक बच्चनला तासाभरात नानावटीत बेड मिळतो. तासाभरापूर्वी नानावटीत बेड नाही असे ज्याने एखाद्या गरीबाला सांगितले असेल त्या माणसाला काय बोलायचे? हिरानंदानी रुग्णालय आठ लाखांसाठी पार्थिव अडवून ठेवते, अनेक रुग्णालयांत राजकीय नेत्यांचे फोन गेल्यावरच बेडची सोय होते याला काय म्हणायचे? ज्या हजारोंना हे क्‍लेशदायक अनुभव आले असतील त्यांच्या आप्तांनी पुढच्या काळात माणुसकीला श्रेष्ठ मानायचे की पैसा आणि ओळखींना सर्वोच्च स्थान द्यायचे? रोज या गोष्टी घडत आहेत. आपल्या आप्ताच्या अंत्यदर्शनाला जाण्यास मनाई होते कारण जिल्हा पार करायचा नाही, पण दिवंगत ऋषी कपूरची कन्या खास परवानगी घेऊन दिल्लीहून मुंबईला येते.

प्रत्येक पावलावर जर पैसा आणि ओळखीनेच उपचार मिळणार असतील तर यापुढे माणुसकीला खुंटीवर टाकून पैशाच्या मागे हा समाज लागला, प्रतिष्ठेच्या मागे हा समाज लागला तर या समाजाला दुषणे देता येणार नाहीत. कोरोनाच्या या काळात माणुसकी अदृश्य झाली आहे. समान न्यायाचा अनुभवच येत नसेल तर इतकी वर्षे उराशी बाळगलेली ही तत्त्वे हा आदर्श मार्ग समाजाला कुचकामी वाटू लागला तर नवल वाटायला नको. वाल्याचा वाल्मिकी होण्यास वेळ लागतो. पण सततच्या या कटु अनुभवांनी वाल्मिकीचा वाल्या झाल्याचे हे कलयुग पाहील. असे घडले तर भविष्य अत्यंत अंध:कारक, कुटील, जटील असणार आहे. कारण माणूस पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे लागला की कोणताही विधीनिषेध पाळत नाही. या मार्गाला गेलास तर तुझा वाईट शेवट होईल असे कितीही सांगितले तरी तो थांबत नाही. मी सर्वात वाईट अनुभव घेतला आहे. याहून माझे वाईट होऊ शकत नाही. पैसा मिळाला तर निदान चार दिवस ऐष करीन हे त्याचे उत्तर येईल. कोरोनाचे संकट तर जीवघेणे आहेच, पण या संकटावेळी येणार्‍या अनुभवांमुळे माणसातील माणूसपण गेले तर ते संकट अधिक गहरे अधिक व्यापक ठरेल. याच संकटाचे ढग आता दाटू लागले आहेत.

कोरोनाच्या या संकटात सर्वांना समान वागणूक मिळणे महत्त्वाचे आहे. ही समानता राखणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ही जबाबदारी पार पाडली नाही तर पैसा आणि प्रतिष्ठाच सबकुछ मानणारा ब्रम्हराक्षस निर्माण होईल आणि हा राक्षस समाजाची वीणच उद्ध्वस्त करील

Monday, 6 July 2020

चीनशी होणारा करार रद्द केला, ‘हिरो सायकल’ हिरो झाली?


डोकलाम, लडाख, सिक्कीम, गलवान या सर्व परिसरात चीनने केलेल्या हल्ल्यांमुळे भारतीय संतप्त आहेत. चीनवर बहिष्कार टाका अशी भारतीयांची मन:स्थिती आहे. पण ही भावना सामान्य माणसांपर्तंयतच मर्यादित आहे. जिथे अब्जावधींचा खेळ चालतो तिथे चीनवर बहिष्काराचे निर्णय झालेले नाहीत. भारत सरकारने आरोळ्या ठोकून ठोकून फक्त सामान्य माणसाच्या करमणुकीचे टिकटॉक बंद केले. पण केंद्र सरकारने दिल्ली जवळच्या बांधकामाचा करार रद्द केला नाही. महाराष्ट्र सरकारने करार रद्द केले नाही आणि अदानीनेही करार रद्द केलेला नाही.

आज ‘हिरो सायकल’चे संचालक पंकज मुंजाळ यांनी जाहीर केले की,  चीनशी भविष्यात आम्ही जो 900 कोटी रुपयांचा करार करणार होतो तो करार करण्याचा निर्णय आम्ही रद्द करीत आहोत. ‘चीनशी होणारा करार रद्द करणार’ हे शब्द कानावर पडले आणि लगेच भारतीयांनी पंकज मुंजाळ आणि हिरो सायकल कंपनीला ‘भारताचे खरे हिरो’ म्हणून घोषित केले. हिरो सायकल ब्रॅण्ड हा देशभक्त बॅ्रण्ड झाला. पण हा करार नेमका का रद्द झाला याची माहिती घेण्याचे कष्ट अनेकांनी घेतले नाहीत. ही माहिती घेतली असती तर हिरो सायकलला ‘हिरो’ ठरविण्याची घाई केली नसती. आमचा ‘हिरो’ सायकलला कसलाच विरोध नाही. किंबहुना त्यांच्या सायकल उत्तमच असतात. आमचे म्हणणे इतकेच आहे की, कुणाला देशभक्त आणि हिरो ठरविण्याची घाई करू नका. अब्जावधींचा खेळ करणारे भावनेवर आधारित करार करीत नाही आणि भावनांच्या आहारी जाऊन कधीही करार मोडत नाहीत. त्यामुळे हिरो सायकल कंपनीने चीनशी करार केवळ व्यवहारी दृष्टीकोनातून रद्द केला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हिरो सायकल कंपनीला युरोपात विस्तार करायचा आहे. त्यासाठी त्यांनी 2015 सालापासून तयारी सुरू केली आहे. युरोपीय बाजारात इ सायकलला मोठी मागणी आहे. इ-सायकलच्या एकूण जागतिक उलाढालीतील 5 टक्के हिस्सा आपल्या ताब्यात असावा असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला भारतातील फायरफॉक्स सायकल कंपनी ताब्यात घेतली. अ‍ॅटलास सायकल कंपनीही विकत घेण्याबाबत त्यांची चर्चा सुरू आहे. सायकलच्या भागांचे स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी त्यांनी पंजाबच्या लुधियाना शहरात 100 एकरवर होणार्‍या ‘सायकल व्हॅली’ येथे भव्य कारखाना उभारण्याची तयारी केली आहे.

देशात त्यांची ही तयारी सुरू असताना त्यांना चीनकडून संपूर्ण इ-सायकल किंवा त्याचे भाग आयात करावे लागत होते. ही इ-सायकल 15 हजार ते एक लाख रुपयाला असते. ती महाग असल्याने भारतात जेमतेम अडीच हजार सायकल खपतात. पण युरोप मार्केटमध्ये त्याला मोठी मागणी आहे. यासाठी ते चीनशी 900 कोटींचा करार करणार होते. पण दरम्यानच्या काळात त्यांनी जर्मनीतील इ-सायकल बनविणारी एचएनएफ निकोलाय ही कंपनी हेरली आणि त्या कंपनीत याच वर्षी जानेवारी 2020 मध्ये 48 टक्के गुंतवणूक केली. या कंपनीचा मोठा कारखाना आहे, संशोधन केंद्र आहे. भारतात स्वस्तात उत्पादन होत असल्याने इ-सायकलचे सुटे भाग भारतात बनवायचे (लुधियानाच्या सायकल व्हॅलीतील कारखाना उभा राहिला की आणखी सोय होईल) आणि जर्मनीतील कंपनीच्या कारखान्यात ते एकत्र करून तिथूनच युरोपच्या पूर्ण मार्केटमध्ये या इ-सायकल विकायच्या हा करार झाला. या विक्रीसाठी इंग्लंडच्या अ‍ॅव्होसेट स्पोर्ट लि कंपनीतही हिरो सायकलने गुंतवणूक केली आहे.

इ-सायकल बनविणार्‍या बड्या जर्मन कंपनीशी करार झाल्याने यापुढे चीनहून इ-सायकल घेण्याची गरज नाही आणि सुटे भाग घेण्याची गरज नाही. चीनची गरज संपल्याने चीनशी करार करण्याचा निर्णय रद्द केला. हा इतका साधा सरळ व्यवहार आहे. हिरो सायकल भरारी घेते आहे त्याचे कौतुक व्हावे, पण उगाच त्याला देशभक्तीचा टिळा लावू नका.

Wednesday, 18 March 2020

सामान्यांच्या ठेवी बुडाल्या तेव्हा रिझर्व्ह बँक कुठे होती?


‘येस’ बँक ही श्रीमंतांची बँक आहे आणि श्रीमंतांनीच बुडविलेली बँक आहे. ज्यांना कोट्यवधी बुडले आणि बुडविले तरी आत्महत्या करावीशी वाटत नाही आणि तोंड लपवून फिरण्याचीही वेळ येत नाही अशा धेंडांनी ही बँक बुडविली. तरीही रिझर्व्ह बँकेने ही बँक वाचवायला कमालीची धावाधाव केली. सोमवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी छाती फुगवून सांगितले की, रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारने वेगाने काम करून रेकॉर्ड वेळेत येस बँक जीवित केली आहे. आमचा सवाल आहे की, ज्या बँकांमध्ये सामान्य माणसांची खाती होती अशा रूपी बँक, पेण अर्बन बँक, पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बँक, पतसंस्था सहकारी बँका मोडीत गेल्या तेव्हा रिझर्व्ह बँक आणि सरकारने या आर्थिक संस्था वाचविण्यासाठी वेगाने पावले का उचलली नाहीत? स्टेट बँक एक आठवड्यात येस बँकेत 700 कोटी रुपये टाकून कर्जबुडव्यांचा तोटा भरू शकते तर ही सरकारी स्टेट बँक सामान्यांच्या ठेवी वाचविण्यासाठी छोट्या बँकांना आधार का देत नाही? सर्व मदत ही कायम श्रीमंतांनाच का मिळते? उद्योगपती आणि कारखानदारांसाठीच सरकारी यंत्रणा धावाधाव कशी करते?
‘येस’ बँकेचे सीईओ राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबाच्या उद्योगात कोट्यवधी पैसे गुंतवणुकीची लाच भरत दहा मोठ्या उद्योगसमुहांनी मिळून 30 हजार कोंटीची कर्ज घेऊन ती बुडविली. हे सर्व घडत असताना रिझर्व्ह बँकेने दुर्लक्ष करून कर्जबुडव्यांना मदत केली आणि कर्ज बुडवून झाल्यावर सरकारी स्टेट बँकेला 49 टक्के गुंतवणूक करून ही बँक वाचवायला लावली. सरकारी स्टेट बँक एका खासगी बँकेला जिवंत करण्यासाठी इतकी लगबग करते हे अनाकलनीय आहे. आताही पुनर्जीवित झालेल्या येस बँकेत स्टेट बँकेची 49 टक्केच गुंतवणूक आहे म्हणजे तितकाच अधिकार आहे. उर्वरित गुंतवणूक पुन्हा खासगी बँकांची आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा घोटाळा होऊच शकतो. तेव्हाही या धनिकांना वाचवायला सरकार धावेलच.
येस बँकेचे 12 हजार 808 कोटी रुपये अनिल अंबानीच्या दहा कंपन्यांनी बुडविले. म्हणजे अनिल अंबानी त्याच्या एकेका कंपनीच्या नावे कर्ज काढत गेला आणि बुडवत गेला. त्यानंतर सुभाष चंद्रा यांच्या एस्सेल समूहाने 8415 कोटी
बुडविले. इथेही एस्सेल समुहाच्या अंतर्गत 16 कंपन्या कर्ज काढत राहिल्या, बँक त्यांना कर्ज देत गेली आणि त्यांनी कर्ज बुडविले. दिवाण हौसिंग (डीएचएफएल), आयएल ॲण्ड एफएस, इंडिया बुल्स, खैतान कॉक्स ॲण्ड किंग्ज हे सर्व कर्जबुडवे आहेत. या कंपन्यांचेच सूटबुटातील उद्योगपती तोऱ्यात फिरत असतात. याच उद्योगपतींच्या यशोगाथा आपल्या कानीकपाळी मारल्या जातात. मोठमोठ्या समारंभात अर्थमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिके दिली जातात. या धनदांडग्यांनी कर्ज बुडविली तर धंदा बसला हे कारण सांगतात, आर्थिक मंदीचे कारण सांगतात. तो उद्योगपती चांगला आहे, पण धंदा बसला म्हणून कर्ज बुडले असे गोंजारणे सुरू असते. प्रत्यक्षात बँक अधिकाऱ्यांना लाच देऊन आवश्‍यक तितके तारण न घेता बुडविण्यासाठी घेतलेली ही कर्ज आहेत. इथे देणारा लुटारू आहे आणि घेणाराही लुटारू आहे. अशा लुटारूंना मोठे का मानायचे? सरकार आणि रिझर्व्ह बँकेने त्यांच्यासाठी का धावायचे? अशा बँकांना मरू का देत नाहीत? स्टेट बँक त्यात पैसे का ओतते?
शेतकरी हवामानामुळे खरोखर कोसळतो तेव्हा कर्जफेडीसाठी बँका इतक्या मागे लागतात की बिचारा शेवटी झाडाला गळफास घेऊन यातून मुक्त होतो. एखाद्या होतकरू तरुण/तरुणीचा धंदा चालत नाही तेव्हा काही लाखांच्या कर्जासाठी त्यांचे घर जप्त करून त्याचा लिलाव होतो, मुलाच्या उच्चशिक्षणासाठी आई-बाप कर्ज काढतात आणि मग मुलाला नोकरी मिळाली नाही तर बाप दिवसभर ओव्हरटाईम करूनकरून खंगून जातो. या बिचाऱ्यांना कधीच कर्ज बुडवायचे नसते, पण परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्यांचे कर्ज थकीत राहते. त्यांना बँका कधी सोडतच नाहीत. त्यांच्या घराबाहेर थाळीनाद करतात, त्यांची नांवे जाहीर करतात, त्यांच्या घरी एजंट पाठवतात, त्यांना धमकीचे फोन केले जातात. कर्जाचा एक हप्ता भरला नाही की त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या आयुष्याची वाट लावतात आणि हे येस बँकेचे कर्जबुडवे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. एकालाही अटक झालेली नाही. एकाच्याही महालाबाहेर थाळीनाद झालेला नाही. समाजात वावरायला त्यांना लाज वाटेल असे सरकारने काही केले नाही आणि रिझर्व्ह बँकेनेही काही केले नाही. हे कर्जबुडवे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या कर्जाचे सर्व पैसे पचवून मजेत राहणार आहेत. लोकल खाली जीव देतो तो सामान्य माणूस, झाडाला लटकतो तो सामान्य माणूस, तणावाने हृद्यविकाराचा झटका येऊन मरतो तो सामान्य माणूस, तो साधासरळ असतो. त्याला कर्ज फेडायचे असते म्हणून तो जीवाला घोर लावून घेतो. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर अशांसाठी धावाधाव करीत नाही. सामान्यांनी आयुष्याची कमाई एखाद्या छोट्या बँकेत ठेवली आणि ती बँक बुडाली तर सरकार ती बँक वाचवायला जात नाही.
‘येस’ बँकेचा हा जो तमाशा सुरू आहे तो असाच वेगवेगळ्या रूपात सुरू राहणार आहे. कारण सिस्टिमच भ्रष्टाचाराने पोखरली आहे वरपासून खालपर्यंत. मग आपणही या श्रीमंत कर्जबुडव्यांसारखे बनायचे का? तर नाही. कारण हे कर्जबुडवे काळ्या धनाचे गुलाम आहेत. आपण नाही. आपण देवापुढे रोज मनोमन हात जोडतो, सद्बुद्धी मागतो. देवापुढे उभे राहण्याची ताकद आपल्या चांगल्या कर्मांमुळेच मिळते. ही ताकद आपण गमवायची नाही. त्या कर्जबुडव्यांना सरकार तारेल, रिझर्व्ह बँक तारेल, स्टेट बँक तारेल, पण खात्री ठेवा की, देवाची लाठी आवाज न करता त्यांच्यावर बरसणार आहे. आज ना उद्या त्याचे दृश्‍य परिणाम आपल्याला दिसतीलच.कुटुंबच काय, देश सोडणेही धोक्याचे आहे.

Wednesday, 11 March 2020

सोनियाजी आणि राहुल गांधी, पक्ष चालवायचा नाही तर खुर्ची सोडा!


मध्यप्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळणार हे निश्‍चित आहे. मोदी विरोधी राज्याराज्यात लाट निर्माण होत असताना मध्यप्रदेशसारखे राज्य काँगे्रसच्या हातून निसटणे ही चांगली बाब नाही. त्यातही कमलनाथ सरकार स्वतःच्या नाकर्तेपणामुळे पडणार नाही तर काँगे्रसच्या शीर्षस्थानी असलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निष्क्रियतेमुळे अडचणीत आले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पक्ष चालवायचा नसेल तर त्यांनी ताबडतोब पक्ष आणि पदे सोडावी. या दोन नेत्यांमुळे आज पक्षाला अध्यक्ष नाही अशी वेळ आली आहे. हे दोन्ही नेते पक्षातील वितंडवादावर मात करू शकत नसतील तर केवळ खुर्ची उबवीत राहण्यापेक्षा पक्षाचा राजीनामा द्यावा. त्यांच्या जाण्याने कदाचित नवे नेतृत्त्व उदयाला येईल.
आज मोदी सरकारला कंटाळलेले अनेक आहेत. राज्याराज्यांत मोदींविरुद्ध वातावरण आहे. पण पंतप्रधान बनू शकेल असे पर्यायी नेतृत्व दिसत नसल्याने भाजपाला पर्याय नाही ही स्थिती आहे आणि दुर्दैव असे की हीच स्थिती कायम राहत आहे. राजकारणाच्या चिखलात बुडालेल्या इंदिरा गांधी हत्तीवर आरूढ झाल्या आणि त्यांचे हे रूप पाहून जनतेने त्यांना पुन्हा सत्तेवर आणले. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांच्यातही ही धमक नाही. जनतेला आणि पक्षाला कणखर नेतृत्त्वाची गरज आहे. राहुल गांधींनी लोकसभा प्रचारावेळी हा कणखरपणा दाखविला होता. त्यामुळे भाजपाची खासदार संख्या कमी झाली. त्यानंतर मात्र ते मैदान सोडून पसार झाले. आता त्यांचे अस्तित्व फक्त ट्विटरवर आहे. त्यांच्या अवतीभवतीची काँगे्रसची नखं काढली जात आहेत, पण त्याचे भान सोनियाजींना नाही आणि राहुल गांधींना नाही. ठिणगी पडताच विझवली नाही तर वणवा पेटतो आणि सर्व राख करतो हे शेंबड्या पोरालाही कळते, पण या दोन नेत्यांना पक्षाची फिकीर नाही, आपल्या जबाबदारीची जाणीव नाही आणि खुर्ची सोडण्याइतकी त्यागाची भावनाही नाही. आज केवळ या दोन नेत्यांच्या नाकर्तेपणाने ज्योतिरादित्य शिंदेसारखा उमदा नेता काँगे्रस सोडून गेला.
जे चित्र मध्यप्रदेशात आहे तेच राजस्थानात आहे. (गेहलोत विरुद्ध सचिन पायलट). तेच चित्र अगदी मुंबई काँगे्रसमध्येही आहे. मुंबईत सर्वच काँगे्रस नेते एकमेकांविरोधात उघडपणे बोलतात. इतके सर्व घडत असताना दिल्लीश्‍वर निपचित पडून आहेत. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा विरोधात लाट निर्माण केली. त्या राज्यात राजघराण्याला खूप सन्मान आहे. राजघराण्यातील ज्योतिरादित्य शिंदे दौरे करतात, गरिबाच्या घरी जातात, अफलातून भाषणे करतात, हसून सर्वांशी प्रेमाने बोलतात अशी त्यांची छबी निर्माण झाली होती. या छबीवर भाजपातील सरपंचापासून वरिष्ठ नेते प्रेमात पडले होते. त्यामुळे काँगे्रस जिंकणार असे सर्वजण आधीच सांगत होते. त्याप्रमाणे काँगे्रसचा विजय झाला. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होतील अशीही सर्वांना खात्री होती. पण जनभावना लक्षात न घेता काँगे्रसने पैसा पाहिला आणि अतिश्रीमंत कमलनाथना मुख्यमंत्री केले. हे घडले तेव्हाच ठिणगी पडली. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी ही ठिणगी विझवलीच नाही. दोघांना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची धमकही दाखविली नाही. याआधी दोनदा मुख्यमंत्री बनलेले कमलनाथ स्वतः वयाचा विचार करून बाजूला झाले असते तरी चालले असते. पण तेही घडले नाही. ज्योतिरादित्य यांना निदान प्रदेशाध्यक्ष करा अशी सतत मागणी होत होती. त्यावरही दिल्लीने निर्णय दिला नाही. आज ज्योतिरादित्य शिंदे भाजपात गेले ही भाजपाची पुण्याई नाही तर काँगे्रसचे पाप आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांनी एक उत्तम नेता गमावला. इतकेच नव्हे तर ज्योतिरादित्य शिंदेंची काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे हे तातडीने जाहीर करण्यात काँग्रेसने रस दाखविला. यानंतर राजस्थानात गेहलोतना कंटाळून सचिन पायलटसारखे नेतृत्व भाजपाकडे वळले तर आश्‍चर्य वाटायला नको.
पंतप्रधान मोदी सत्यच म्हणाले की, जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत भाजपाला अच्छे दिन आहेत. जनता मात्र कात्रीत अडकली आहे. एकीकडे मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी यातून सुटकेचा मार्गच दिसत नाही. राहुल गांधी यांनी आज लियो टॉलस्टॉय या महान लेखकाचे एक वाक्य ट्विट केले आहे. ‘सर्वात मोठे योद्धे दोन आहेत - संयम आणि काळ!’ राहुल गांधींना एकच सांगायचे आहे की, संयम आणि काळ या दोन योद्यांच्या पाठीशी खंबीर नेतृत्त्व उभे असावे लागते. नुसताच संयम ठेवला तर मराठीतील म्हणीप्रमाणे काळ सोकावतो. आज काळ सोकावलाय तरीही राहुल गांधी ट्विट करीत बसलेत. दुर्दैव!

Sunday, 1 March 2020

धर्माच्या आधारे मुस्लिमांना आरक्षण मान्य तर धर्माच्या आधारे नागरिकत्वही स्वीकारा


महाराष्ट्रात मुस्लीम धर्मियांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला जाईल अथवा तसा कायदा केला जाईल, असे अल्पसंख्यांक मंत्री राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अधिवेशनात जाहीर केले. भारताच्या घटनेनुसार या देशात धर्म हा घरापुरता व्यक्तिगत श्रद्धेचा विषय असावा, असे स्पष्ट संकेत आहेत. तरीही धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर ‘धर्मनिरपेक्ष भारत’ हा देशाचा पायाच डळमळीत होईल आणि हे सर्वच देशवासियांसाठी जितके धोक्याचे आहे तितकेच मुस्लिमांसाठीही आहे. कारण जर धर्माचा आधार स्वीकारला तर तो सर्वच बाबतीत लागू होईल. शिक्षणात धर्माच्या आधारे जर आरक्षण स्वीकारणार असाल तर मुस्लिमांना नागरिकत्व कायद्यात (सीएए) केलेली धर्माबाबतची सुधारणाही मान्य करावी लागेल.
सीएए कायद्यात परराष्ट्रातील पीडित मुस्लिमांना भारतात आश्रय न देण्याचा एकतर्फी, अन्यायी, भेदाभेद करणारा निर्णय घेतल्याचे म्हणत दिल्लीत शाहीनबागपासून मुंबईत नागपाडापर्यंत आंदोलने सुरू आहेत. ही सर्व आंदोलने बंद करावी लागतील. कारण जर धर्माच्या आधारावर मुस्लीम समाज आरक्षणाचा फायदा घेणार असेल तर याचा अर्थ असा की, या धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या आधारावर निर्णय घेण्यास मुस्लिमांनी परवानगी दिली आहे. अशी परवानगी एकदा दिली की, ती सर्वकाळ आणि सर्वक्षेत्रात लागू होणार आहे. त्यामुळे धर्माच्या नावाने आरक्षण घेणार असाल तर धर्माच्या नावाने नागरिकत्व ही संकल्पनाही स्वीकारावी लागेल. पाकिस्तान हे मुस्लीम राष्ट्र आणि भारत हे हिंदू राष्ट्र बनूनच याचा शेवट होईल. भारतासाठी आणि भारतातील मुस्लीम बांधवांसाठी ही अधोगतीकडे जाणारी वाटचाल आहे. धर्माच्या नावाने आणि धर्माच्या बंधनात राहून निर्णय घेणारी राष्ट्रे प्रगती करीत नाहीत. याला इतिहास साक्ष आहे. राष्ट्राचे निर्णय हे विज्ञान आणि अर्थकारणावरच असायला हवे आणि राष्ट्राचे नागरिक म्हणून जगताना सहजीवन, संयम आणि समर्पणाचा मार्ग आपापल्या श्रद्धेनुसार असायला हवा ज्याला आपण धर्म म्हणतो. या दोन्हीत गफलत केली तर अधोगती निश्‍चित आहे. नेपाळसारख्या पारंपरिक हिंदू राष्ट्रानेही लोकशाही स्वीकारली. त्या छोट्या देशाचा अनुभव प्रदीर्घ आहे. ‘नेपाळ’चा अभ्यास न करता आपण ‘पाकिस्तान’च्या मार्गाने जाणार असू तर त्याहून मोठे दुर्दैव नाही. या देशात जोपर्यंत धर्माच्या नावाने निर्णय होत नाहीत तोपर्यंत या देशातील अल्पसंख्य धर्मिय सुखरुप आहेत. मुस्लीम, ख्रिश्‍चन, पारशी, शीख या सर्वांनी ही बाब समजून घेतली पाहिजे. एकदा धर्माचा आधार मान्य करून निर्णय घेतला की, धर्मनिरपेक्ष भारतात राहण्याचे संरक्षण कायमचे हटेल आणि धर्माच्या आधारे भविष्यात जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील.
मुस्लिमांना शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस आतूर आहे. कारण सर्व ओबीसी मतांवर या पक्षाने लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार सांभाळताच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा विषय सर्वप्रथम घेऊन इंदू मिलला भेट दिली तेव्हाच राष्ट्रवादीची पुढील दिशा स्पष्ट झाली. काँग्रेस पक्षाला तर वंचित आघाडी आणि एमआयएम, समाजवादी पक्षाकडे गेलेली मुस्लीम मते स्वतःकडे खेचण्याची ही सुवर्णसंधी दिसते आहे. राजकीय पक्ष त्यांचे राजकारण करीत असतात. पण मुस्लीम बांधवांनी विचार करायला हवा. धर्माच्या नावावर निर्णय होऊ लागले आणि त्याचा स्वीकार केलात की, मुस्लिमांना धर्मनिरपेक्ष भारताचे संरक्षण गेले. मग हिंदू धर्माचा भगवा आणि हिंदुराष्ट्र या दोन्हीचा मार्ग सुकर होतो. त्यातून जे घडेल ते पाहत बसण्यावाचून मुस्लीम बांधवांच्या हाती काहीच राहणार नाही. शिक्षणात आरक्षण हे आर्थिक दुर्बलांसाठी असू शकते. त्यात आर्थिक दुर्बल मुस्लीम बांधवांच्या मुलांना निश्‍चित फायदा होईल. त्यामुळे आर्थिक निकषांवरील आरक्षणाची मागणी करणे हाच सुज्ञपणा ठरेल.

Thursday, 23 January 2020

साईबाबांच्या या मूठभर वारसदारांना’ आता गप्प करा

श्री साईबाबांचे जन्मस्थळ, प्रकटस्थळ, कर्मस्थळ असे जे वाद सुरू आहेत, त्यामुळे खरा साईभक्त दुखावला गेला आहे. हे वाद ऐकून श्री साईबाबा जिथे असतील तिथे नक्कीच दुःखी होऊन अश्रू ढाळत असतील. संपूर्ण आयुष्य आचरणातून, वाणीतून समाजाला जो संदेश दिला तो संदेशच विस्मरणात गेला आहे, हे पाहून साईंना काय वाटले असेल? श्रद्धा, सबुरी, वैराग्य आणि सेवा ही साईंची शिकवण विसरून मूठभरांनी वादंग निर्माण केला आहे. या मूठभरांना चूप करून त्यांच्या पायरीवर त्यांना आणण्याचे काम आता साईभक्तांनी करणे आवश्यक आहे. साईबाबांवर 100कोटींची बोली लावणार्‍यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे. श्री साईबाबांच्या विचारांची आणखी अवहेलना होऊ न देता महाराष्ट्रातील साईभक्तांनी एकत्र येऊन हा ‘वारसाहक्काचा’ तमाशा ताबडतोब थांबवावा. हे आताच केले नाही तर हा वादंग वाढत जाईल आणि या झुंडशाहीत श्री साईबाबा आपल्या अंतःकरणातून कायमचे हरपून जातील.
श्री साईबाबांनी शिर्डीला समाधी घेतली, म्हणून शिर्डीला लाखो भक्त येतात. हा इतिहास इथेच थांबला पाहिजे. कारण समाधीचे सत्य आपल्यासमोर आहे. पण श्री साईबाबा शिर्डीत येण्यापूर्वी कोण होते, कुठे होते हे स्वतःच साईबाबांनी कधी सांगितले नाही आणि ते सांगण्यास तयारही नव्हते. ‘सबका मालिक एक’ म्हटल्यावर हे प्रश्‍नच उपस्थित होत नाहीत. नदीचे मूळ आणि संताचे कूळ विचारू नये ही म्हण आहे. याचे कारण संताच्या कुळापेक्षा त्यांचा संदेश महत्त्वाचा आहे असे मानले गेले आहे. असे असूनही पाथरीकरांनी दावा केला आहे की, श्री साईबाबांचा जन्म पाथरीत झाला. मग पैठण जिल्ह्यातील धूपखेडा गावकर्‍यांनी म्हटले की, साई प्रथम धूपखेड्यात प्रकटले म्हणून ही त्यांची प्रकटभूमी आहे. तिसर्‍या दिवशी बीडच्या काहींनी सांगितले की, साई बीडमध्ये नोकरी करीत होते. त्यामुळे ही त्यांची कर्मभूमी घोषित करून विकासासाठी 100 कोटी द्या. इतके अगाध संशोधन झाल्यावर श्री साईबाबा हे हिंदू होते की मुसलमान आणि हिंदू असतील तर ब्राह्मण होते का याचेही दावे सुरू होतील आणि यावरही न संपणारा वाद सुरू होईल. त्यामुळेच हे थांबले पाहिजे. सरकारला मतांची चिंता असते. त्यामुळे सरकार यात पडणार नाही. विरोधकांना नेमकी कुणाची बाजू घ्यायची हे कळत नसल्याने ते गप्प आहेत. पण आणखी काळ गप्प राहिले तर हा वाद नको त्या वळणावर जाईल आणि ‘सबका मालिक एक’ म्हणणारे श्री साई यांची अक्षरशः वाटणी करतील.
हा सर्व प्रकार मुळात शिर्डीचे वाढलेले महत्त्व आणि 100 कोटी व मान्यतेतून भविष्यात येऊ शकणार्‍या आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनातून निर्माण होऊन वाढत चालला आहे. पाथरीकरांना जर पाथरी हे जन्मगाव वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या आर्थिक नियोजनातून त्याचा प्रचार व प्रसार करावा. पाथरीला आजही अनेक भक्‍त येतात. पण त्यांची संख्या शिर्डीच्या तुलनेने कमी आहे. ही संख्या वाढून भक्‍तांनी पाथरीला यावे, असे वाटत असेल तर पाथरी हे जन्मगाव आहे, असे सरकारने शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही. सरकारने पाथरीकरांना 100 कोटींचा निधी दिला आहे, त्यांतून पाथरी हे जन्मगाव आहे, हे जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोचवता येईल. त्यासाठी वाद कशाला घालायचा? पाथरीकरांना अधिकृत घोषणा हवी असेल तर संशोधनासाठी समिती नेमावी लागेल. या समितीने पाथरीकरांच्या बाजूने निर्णय दिला तरी खुद्द श्री साईबाबांच्या इच्छेचे काय? त्यांना आपला जन्म, कुटुंब आणि धर्म याबद्दल कधीच काही सांगायचे नव्हते.
श्री साईबाबा हे देवाचे सगुण रूप होते. पण ते खरे तर निर्गुण, निराकार होते. ते सांगायचे की, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेला असेल तर भाकर द्या, नंग्याला कापड द्या, निराधाराला घराच्या ओसरीत आश्रय द्या. ते मानवधर्म शिकवीत राहिले. मुसलमान आला तर ते कुराण वाचायला सांगायचे आणि हिंदू आला तर गीता वाचायला सांगायचे. अनेकांनी त्यांच्याकडे आग्रह केला की, तुमचा वारस घोषित करा, पण त्यांनी कधी कुणाला दीक्षाही दिली नाही. वारस नाही आणि आश्रमही नाही. ते आयुष्यभर वैरागी राहिले. तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम असे कुणी विचारले तर ते म्हणायचे की, तू माझ्यासह इतका काळ राहिलास, पण अजूनही साई म्हणजे हे शरीर असेच तुला वाटते.
सत्य हे आहे की, श्री साईबाबांची शिकवण आपल्या जीवनात अंगिकृत करण्यास आपण कमी पडतो. म्हणूनच मग आपली भक्‍ती सिद्ध करण्यासाठी आपण भौतिक दावे करीत राहतो. जन्मस्थळ, समाधीस्थळ, कर्मस्थळ, पदयात्रा, नववर्षाला दर्शन, काकडआरती, दान, सोन्याचा मुकुट हे सर्व त्या वैराग्याने कधीच त्याग करीत ‘सबका मालिक एक’ म्हटले आणि आपण श्री साईबाबांनी त्याग केलेल्या गोष्टीतच रममाण होऊन स्वतःला भक्‍त म्हणून घेत आहोत. श्री साईबाबांना खरोखर याचे दुःख होत असेल.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...