Saturday, 30 November 2019

उद्धवजींच्या मस्तकी काटेरी मुकुट


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आजपासून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री नाहीत तर एका महत्त्वपूर्ण पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे यश/अपयश हे त्यांच्या सरकारचेच राहणार नसून शिवसेनेवर त्यांचा मोठा परिणाम होणार आहे. परिणामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारची आणि पक्षाची अशी दुहेरी जबाबदारी आहे. एखादा मुख्यमंत्री अपयशी ठरला तर ती व्यक्ती बदलता येते. पण उद्धवजींच्या बाबतीत हा पर्यायच असू शकत नाही. कारण ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख दोन्ही आहेत.
उद्धव ठाकरे यांना पूर्वी राजकारणात रस नव्हता. छायाचित्रीकरण हा त्यांचा आवडता विषय होता. यात त्यांचे कौशल्य आहे हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. ‘साहेब, बॅडमिंटन खेळत आहेत.’ हेही वाक्य त्यांना फोन करणार्‍यांनी कधी न कधी ऐकवलेच असणार आहे. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती जबाबदारी पेलली. अत्यंत टोकाची टीका सहन केली. आपले व्यक्तिमत्त्व आक्रमक नाही हे ओळखून हळूहळू शिवसेनेत बदल केला आणि त्यात धूर्तपणा आणला. एकेक चाल खेळत ते इथपर्यंत येऊन पोहचले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासह त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ इतर कुणाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत हे जाणून त्यांनी केवळ नाईलाजाने हे मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. ते अपयशी ठरले तर शिवसेनेचा शेवट होईल हा धोका त्यांना पत्करावा लागला आहे.
शिवसेनेने आजवर रांगडे राजकारण केले, भावनिक राजकारण केले, जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला साद घालून पक्षाची एकजूट आणि उत्साह कायम ठेवला. पण सरकारमध्ये बसल्यावर भावनेला साद घालून उपयोग नसतो. जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. कधी कधी या अपेक्षा अतिशय वाढतात. त्याला तारतम्यही राहत नाही. अशा वेळी निर्णय घ्यायचे आणि जनतेला ते समजावून सांगायचे हे अग्निदिव्य असते. रस्त्यावर उभे राहून घोषणा देणे वेगळे, जाहीरनाम्यात आश्‍वासने देणे वेगळे आणि प्रत्यक्ष आर्थिक आकडेवारी मांडून निर्णय घेणे हे वेगळेच असते. त्यातच देवेंद्र फडणवीसांसारखा दुखावलेला विरोधी पक्ष नेता आणि सणसणीत चपराक खाल्ल्याने संतप्त असलेला भाजपा यांनाही रोज तोंड द्यायचे आहे. शरद पवार आणि सोनियाजींचे हट्ट पुरवायचे, विरोधकांना झेलायचे, जनतेचे समाधान करायचे आणि त्याबरोबर शिवसेना वाढवून पाच वर्षांनंतरच्या निवडणुकीला सामोरे जायचे हा प्रवास धगधगत्या निखार्‍यावर चालण्यासारखा आहे. मनात जर विश्‍वास आणि आस्था असेल तर त्यावरून चालताना पाय पोळत नाहीत. नाहीतर प्रत्येक पावलाला चटका बसतो. आजवर उद्धवजींनी अनेकदा टोकाच्या भूमिका घेतल्या आणि नंतर त्या हव्या तशा वाकवल्या किंवा तोडूनही टाकल्या. आता असे चालणार नाही. कारण केवळ भूमिका घ्यायची नसून निर्णयही घ्यायचा आहे आणि या निर्णयाचा परिणाम त्यांच्या पक्षावरही होणार आहे. ही तारेवरची कसरत ते कशी पार पाडतात याची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला आहे.

Wednesday, 27 November 2019

अजित पवार अस्तनीतील निखारा


महाराष्ट्रात विविध काळात जेव्हा जेव्हा सत्तानाट्य घडले तेव्हा तेव्हा ते केवळ एका माणसाच्या महत्त्वाकांक्षेपोटी घडले याला इतिहास साक्ष आहे. महत्त्वाकांक्षा कधीही वाईट नसते, पण महत्त्वाकांक्षेच्या जोडीला संयम आणि सुजाणपणा नसेल तर ती महत्त्वाकांक्षा अस्तनीतील निखाऱ्याप्रमाणे चटके देत राहते. महाराष्ट्रात अजित पवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
अजित पवार उत्तम वक्ते आहेत, त्यांचा वेगळा करिष्मा आहे. ते सभा गाजवू शकतात, प्रचाराच्या काळात त्यांची भाषणे ऐकायला तुफान गर्दी उसळते. एखाद्या पक्षाची लोकप्रियता वाढवायला पक्षाचा विस्तार करायला अशा नेत्याची अत्यंत गरज असते. त्यामुळेच पक्षात त्यांना कायम मानाचे स्थान असते. योग अभ्यास रामदेवबाबांनीच सांगावा, डायलॉग शत्रुघ्न सिन्हानेच म्हणावेत, एखाद्याची चिरफाड राज ठाकरेंनीच करावी आणि रांगड्या भाषेत कुणाची टोपी उडवायची तर ते अजित पवारांचेच शब्द असावेत. हे सर्व गुणी नेते आहेत, पण त्यांच्या मर्यादा आहेत, या मर्यादांमुळेच पक्षाचे नेतृत्त्व करण्यास ते योग्य नाहीत.
शरद पवार हे अजित पवारांना मुख्यमंत्री पदावरून किंवा इतर महत्त्वाच्या पदावरून का डावलत असतील त्याचे कारण गेल्या 25 दिवसांत महाराष्ट्राने पाहिले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले त्यानंतरच्या काळात त्या सरकारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अद्याप विस्मरणात गेले नाहीत. धरणात पाणी नाही तर मुतू का? या अजित पवारांच्या एका वाक्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जितकी हानी केली तितकी इतर कशानेच झाली नसेल. आततायी, संतापी वागणे आणि परिणामांचा अंदाज न घेता बेछूट निर्णय घेणे या अजित पवारांच्या स्वभावाने पक्षाला अनेकदा अडचणीत आणले. पार्थ पवारला उमेदवारी द्यायचा हट्ट करायचा ही तर धक्कादायक घोडचूक होती. अजित पवार भविष्यात सरकारच्या उच्च पदावर जातीलही, पण ते त्यांचे कर्तृत्त्व नसेल. ते उच्चपद हे त्यांना सतत सावरणारे शरद पवार यांनी नाईलाजाने त्यांचा पुरवलेला हट्ट असेल. अजित पवार हे उत्तम नेते आहेत. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे नेतृत्त्व गुण त्यांच्यात नाहीत. वेळ, काळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची काकांची क्षमता त्यांच्यात नाही. आज त्यांचा पक्ष वाचवायला शरद पवार आहेत, पण भविष्यात अजित पवारांकडे धुरा गेली तर अस्तनीतील हा निखारा स्वतः जळेल आणि पक्षाचीही भरून न निघणारी हानी करील. अजित पवारांनी स्वतः चिंतन करून एक पायरी खाली उतरले तर पक्षाचे भले होईल.

Thursday, 14 November 2019

पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये


आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’ कडक शब्दांत निषेध करीत आहे. पत्रकार हे आपले गुलाम आहेत हे समजण्याचा माज नेत्यांनी करू नये. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नसल्याने शेतकर्‍यांपासून सर्वच हवालदिल आहेत, अशा स्थितीत सत्ता स्थापनेची प्रत्येक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार रात्रंदिवस करीत आहेत. हे काम करताना ऊन असो, पाऊस असो, पोटात सकाळपासून एक कण अन्‍नाचा नाही तरी पत्रकार माहिती मिळविण्यासाठी  धावाधाव करीत आहेत. गेले 21 दिवस जीवाचे रान करीत आहेत आणि आज त्यांना फसविण्यासाठी अजित पवार चेहर्‍यावर संताप आणून बाहेर येत बैठक रद्द झाल्याचे सांगतात. अजित पवार उद्या येतील असे शरद पवार सांगतात. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सर्वच बैठक रद्द झाल्याचे सांगतात आणि मग लपून अज्ञातस्थळी जाऊन बैठक घेतात आणि आम्ही पत्रकारांची चेष्ट केली असे सांगतात हा काय प्रकार आहे?
पत्रकारांना फसवून, खोटे बोलत त्यांची चेष्टा करून अज्ञातस्थळी बैठक घ्यायची हे सर्व कशासाठी  केले? तुमच्या एकाही बैठकीवेळी  पत्रकारांना आत प्रवेश नसतो. तुम्ही नेते पंचतारांकित हॉटेलात बसता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वातानुकूलित सभागृहात बसता, चहा पिता, जेवता तेव्हा पत्रकार उंबरठ्याबाहेर तासन्तास तुमची बैठका संपण्याची वाट पाहत बसतो. भररस्त्यात पत्रकार उभे असतात. त्यांना बसायलाही जागा नसते, डोक्यावर पंखा नसतो, जेवायला गेलो आणि बैठक संपली तर बाईट मिळणार नाही  म्हणून भुकेल्यापोटी हे पत्रकार तिथेच उभे राहतात. हे नेते त्यांना कधी पाणी विचारत नाहीत की चहा देत नाहीत की स्टूल देत नाहीत. बैठकीत खरे काय चालले हे पत्रकारांना कळतही नाही. मग पत्रकारांचे हंसे करून, नाटके करून अज्ञातस्थळी बैठक घेतली कशाला? शेवटी तुम्ही बैठकीतून बाहेर येऊन जे सांगता आणि जितके सांगता तितकेच आम्ही दाखवितो. तरीही आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिनय करून, खोटे बोलून पत्रकारांची चेष्टा केली. या नेत्यांच्या दिवसभर बैठका चालतात, पण अंगावरच्या पांढर्‍या झब्ब्याला सुरकुती पडत नाही इतकी सर्व सोय असते आणि या बैठकीतून जे निष्पन्‍न होणार आहे त्याचा मलिदाही या नेत्यांनाच मिळणार आहे. तरीही पत्रकारांवर माज करायचा. त्यांनाच लाथाडायचे. त्यांना फसवायचे. त्यांची चेष्टा करायची हे शोभते का? तुम्ही नेते शेतकर्‍यांच्या बांधावर जाता त्याच्या बातम्या दिल्या गेल्या नाहीत तर तुम्ही शेतकर्‍यांकडे फिरकणारही नाही हे सत्य अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा नेत्यांनो, जरा जपून आणि जितेंद्र आव्हाडजी, चेष्टा कुणाची आणि कधी करायची याचे भान नेत्यांना राखायला सांगा. आम्ही वर्तमानपत्राचे कर्मचारी आहोत, पत्रकार आहोत, तुमचे गुलाम नाही!

Friday, 1 November 2019

आरेतील वृक्षतोडी बाबत वृक्षतज्ज्ञांना समितीतून हाकला

मांजर दूध प्यायलं! सर्वांनी पाहिले!
पण या वृक्षतोडीला शिवसेनाच 100 टक्के जबाबदार


प्रदुषणाने घुसमटत चाललेल्या मुंबईला ऑक्सिजन भरभरून देणारे आरे परिसरातील जवळजवळ अडीच हजार वृक्ष मेट्रोच्या कारशेडसाठी कापले जाणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतील भाजपा आणि शिवसेनेने षडयंत्र करून ही कत्तल मंजूर केली. शिवसेना आता वृक्षतज्ज्ञांनी दीड कोटीची लाच घेतल्याचा आरोप करीत असली तरी स्वतः शिवसेनेने किती लाच घेतली या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे शिवसेनेने मांजरीप्रमाणे डोळे बंद करून दूध मटकावले, पण त्यांना जिभल्या चाटताना अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आहे.
भाजपाला आरे परिसरातच मेट्रो कारशेडसाठी जागा हवी होती आणि त्यांनी त्यासाठी शिवसेनेला पटविले हे उघड आहे. शिवसेनेचे 6 आणि उपस्थित वृक्षतज्ज्ञ (3) यांनी विरोधात मतदान केले असते तरी आरेतील झाडे वाचली असती. पण त्या दिवशी बैठकीत काय झाले? वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्त पाच वृक्षतज्ज्ञांपैकी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी डॉ. दीपक आपटे आणि मनोहर सावंत हे त्या दिवशी गैरहजर राहिले. हे दोघे का गैरहजर राहिले याची कारणे मुंबईकरांना द्यायला हवी. जे तीन वृक्षतज्ज्ञ बैठकीला उपस्थित होते त्यापैकी 15 वर्षे पॅनलवर असलेले सुभाष पाटणे, भाभा ऑटोमिक सेंटरचे डॉ. चंद्रकांत साळुंखे आणि डॉ. शशीरेखा सुरेशकुमार या तिघांनीही वृक्ष तोडण्यास परवानगी दिली. या तिघांनाही याबाबत जाब विचारला पाहिजे आणि जर त्यांचे उत्तर अमान्य झाले तर त्यांना तात्काळ समितीतून काढले पाहिजे.
वृक्षतज्ज्ञ म्हणून नेमलेल्या सुभाष पाटणे, चंद्रकांत साळुंखे आणि शशीरेखा सुरेशकुमार यांनी मेट्रो उभारणार्‍या ‘सॅम इंडिया’ कंपनीकडून प्रत्येकी 50 लाख रुपये लाच घेतली असा आरोप शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. यापैकी शशीरेखा सुरेशकुमार या मिठीबाई कॉलेजात वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्या म्हणतात की, जेव्हा मतदान झाले तेव्हा प्रचंड गोंधळ सुरू होता. मला वाटले की हा विषय पुढे ढकलण्यासाठी मतदान होत आहे. एका प्रसिद्ध कॉलेजच्या प्राध्यापिकेचा गोंधळ होत असेल तर सर्व गोंधळाचेच काम आहे. यासाठी मुंबईकरांनी या प्रत्येक वृक्षतज्ज्ञाला जाब विचारला पाहिजे.
पण हे वृक्षतज्ज्ञ जितके जबाबदार आहेत. त्याहून कितीतरी अधिकी पटीने आरेच्या वृक्षतोडीस शिवसेना जबाबदार आहे. वृक्षप्राधिकरण समितीची बैठक साधारणपणे दर 15 दिवसांनी घेतली जाते. पण यावेळी आरेसाठी अवाजवी घाई केली गेली. 15 दिवसांनी एक बैठक घेण्याऐवजी 15 दिवसांत 3 बैठका घेण्यात आल्या. इतकेच नव्हे तर दोन दिवसांत एक हजार पानांचा अहवाल तयार करण्यात आला. वृक्षप्राधिकरण समितीतील वृक्षतज्ज्ञ आणि भाजपावर आरोप करीत शिवसेनेचे यशवंत जाधव यांनीच ही माहिती दिली. मग इतक्या वेगवान घडामोडी घडत असताना शिवसेना झोपली होती की झोपेचे सोंग घेऊन पहुडली होती. आरेतील वृक्षतोडीला परवानगी देणारा प्रस्ताव मंजूर झालाच नसता कारण भाजपाचे या समितीत फक्त चार नगरसेवक आहेत. त्यांच्या विरोधात 5 वृक्षतज्ज्ञ, राष्ट्रवादीचा (राजकीय विरोधक) 1, काँग्रेसचे (राजकीय विरोधक) 2 आणि शिवसेनेचे तब्बल 6 नगरसेवक आहेत. म्हणजे समितीत भाजपा 4 विरुद्ध विरोधक 14 असे बलाबल आहे. तरीही भाजपाने जबड्यात हात घालून सर्व दात काढले. आता शिवसेना आणि काँग्रेस कोर्टात जाण्याची नाटकं करीत आहेत, पण लोक आता फसत नाहीत.
आरे वृक्षतोडीचा विषय निघाला त्या दिवशी 2 वृक्षतज्ज्ञ अनुपस्थित होते. त्यापैकी बीएनएचएसचे दीपक आपटे आहेत. जे सरकारविरोधात कोर्टात जाणार नाहीत कारण त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. जे उपस्थित होते त्यांना तर जायचेच नाही. काँग्रेसवाले सत्तेत राहून शहाणे झाले आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे सभात्याग करून वाट मोकळी करून दिली आणि आता ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणत रवी राजा वृक्षप्रेमाचा आव आणत आहेत. राष्ट्रवादीच्या एकाबद्दल बोलायला नको कारण हल्ली त्यांच्या नेत्यांचा संयम ढासळतो आहे.
उरली शिवसेना, त्यांचे सहापैकी सुवर्णा करंजे, प्रिती पाटणकर, रिद्धी खुरसुंगे आणि उमेश माने हे नगरसेवक आरे बाबत मतदान होईपर्यंत बैठकीला आलेच नाहीत. वृक्षतोडीचा निर्णय झाल्यावर बैठकीत पोहोचले. त्यांची म्हणे मातोश्रीला भेटून झाडाझडती घेणार आहेत. हे अधिकृत पक्षाचे वाक्य आहे. प्रत्यक्षात या चौघांना बहुदा ही टर्म संपल्यावर पुढल्या टर्मलाही वृक्षप्राधिकरण समितीवर घेण्याचे आश्वासन दिले जाईल. उशीर करून किती मोठे काम त्यांनी ‘करून दाखविले’ आहे. एकूण काय तर आरेतील झाडे गेली, ऑक्सिजन गेले. यानंतर नैसर्गिक आपत्ती ओढावणारच आहे. जेव्हा ओढवेल तेव्हा समिती नेमली जाईल. त्या समितीत हीच माणसे असतील. खरे सत्य हे आहे की, या पक्षांना आता जनतेचा धाक राहिला नाही. कारण कुटुंब फक्त स्वतःपुरती जगू लागली आहेत.

Tuesday, 15 October 2019

गणेश मिरवणुकीत जायचे आणि रस्त्यावर उकिरडा करायचा कचरा फेकायचा, थुंकायचे! हीच आपली ‘हिंदू संस्कृती’ का?


भारतीयांना एक वाईट सवय लागली आहे. आपण घाण करायची आणि दुसर्‍याला ती घाण साफ करायला लावायची. त्यातही जो ती घाण साफ करतो त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी नसते आणि सहानुभूतीही नसते. मनातील घाण साफ करून स्वतःचे मन आणि शरीर सुदृढ ठेवणार्‍या बुवाबाजांना आपण भरभरून दान देऊन पुण्य विकत घेण्याचा भ्रष्टाचार तर करतोच, पण त्या बुवाबाजांच्या पायावर डोकेही ठेवतो. परंतु जे आपली घरं, आपले संडास, आपले रस्ते साफ ठेवून आपल्याला प्रदुषणापासून, रोगराईपासून वाचवितात त्यांच्याकडे आपले लक्षही नसते. काल आपल्या ‘लाडक्या बाप्पाला’ आपण मिरवणुकीने विसर्जनासाठी नेले आणि जाताना रस्त्यांवर उकिरड्याचे अक्षरशः ढीग करून ठेवले. रस्त्यांवर खड्डे इतके की चालता येत नाही हे वाक्य सर्वांच्या मुखी असते. गणेशविसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी समुद्रकिनारी मूर्तींची जी अवस्था दिसते ती पाहवत नाही हे वाक्यही दरवर्षी ऐकू येते. पण रस्त्यांवर आपण विसर्जनाच्या दिवशी किती प्रचंड कचरा करून ठेवला आहे हे वाक्य कुणी बोलतच नाही. कारण आपण घाण करायची आणि दुसर्‍याने साफ करायची ही आपली सवय आहे.
हिंदू संस्कृतीबद्दल अलीकडे खूप जास्त चर्चा सुरू आहे. मग कचरा करणे, घाण फेकणे, थुंकणे ही आपली संस्कृती आहे का? विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत नाचायचे, पुढल्या वर्षी लवकर या म्हणायचे ही आपली संस्कृती आहे असे म्हणतात. मग हे सर्व करताना आपण प्लास्टिकच्या ग्लासातून पाणी प्यायलो आणि ग्लास रस्त्यावर फेकून दिले, कागदी कपातून चहा प्यायलो आणि कप रस्त्यावर फेकून दिले, लेज खाऊन पाकिटे रस्त्यावर, चिवडा खाल्ला पाकिटे रस्त्यावर, आईस्क्रिमचे कप रस्त्यावर, इडली चटणी ज्या कागदी प्लेटमध्ये खाल्ली ती न गुंडाळता तशीच रस्त्यावर फेकून दिली. ज्या रस्त्यांनी मिरवणुका गेल्या त्या रस्त्यांवर अक्षरशः हा कचरा भरला होता. रस्त्यावरून चालणे शक्य नव्हते. समुद्रकिनारी आलेल्या मूर्ती दुसर्‍या दिवशी पाहवत नाही तसे हे समुद्रकिनार्‍याकडे जाणारे रस्ते पाहवत नव्हते.
पीओपीच्या मूर्ती आणू नका, कारण त्या विरघळत नाहीत आणि त्या मूर्तींमुळे नदी, विहिरी, समुद्र प्रदूषित होतात हे अनेक वेळा सांगून झाले. तरी शाडुची मूर्ती आणत नाहीत कारण ती महाग असते. थोडी सजावट कमी करा, थोडी मिठाई कमी करा म्हणजे परवडेल असे सांगितले तर आपल्यालाच दूषणे देतात. मूर्तीची नंतर काय अवस्था होते हे माहीत असूनही सजावट, मिठाई, बँड यासाठी पैसे वाचवायला पीओपीचीच मूर्ती आणतात. आता तर कृत्रिम तलावांचे थोतांड निघाले आहे. आम्ही प्रदूषण करीत नाही तर कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करतो असे नाक वर करून म्हणतात. पण या कृत्रिम तलावात रसायन टाकून मूर्ती विरघळवतात आणि ते पाणी पुन्हा नदीत आणि समुद्रातच फेकतात. मग प्रदूषण कमी कसे झाले? परंतु दृष्टीआड काहीही चालले तर आपला त्याच्याशी संबंध नसतो.
कचर्‍याचेही तसेच आहे. सफाई कामगार दुसर्‍या दिवशी कष्ट करून रस्ते चार-चार वेळा साफ करतात आणि आपण स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून रस्त्यावर पाऊल ठेवतो तोपर्यंत रस्ते स्वच्छ केलेले असतात. त्यामुळे आपण कचरा करतो आहोत याचे आपल्याला काहीच वाटत नाही, आपले घर फक्त आपले ही आपली मानसिकता आहे. त्यामुळे घरात आपण फरशीवर कचरा टाकत नाही. घरातल्या फरशीवर थुंकतही नाही. पण घराबाहेर पडलो की आपले काहीच नसते. तेव्हा आपण जे वागतो त्यात आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की, घराबाहेरचा कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण याचा आपल्या आरोग्यावर शेवटी परिणाम होतोच. घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपण खिशातले पैसे खर्च करतो त्याचप्रमाणे रस्ते बांधायला, रस्त्यावरील खड्डे बुजवायला, रस्त्यावरील कचरा साफ करायला आपणच खिशातले पैसे खर्च करतो. आपण कर भरतो त्यातून हा खर्च होतो. मग आपण घर आपले मानतो तसा रस्ता आपला का मानत नाही?
गंमत म्हणजे आपण आपल्या देशात अगदी बेफिकिरीने उकिरडा करतो, पण दुसर्‍यांच्या देशात जातो तेव्हा त्यांचे रस्ते मात्र साफ ठेवतो. परदेशातून कुणीही परतले की एक वाक्य ठरलेले असते. इतकी स्वच्छता होती आणि रस्त्यांवर एक खड्डाही नव्हता हे कौतुक प्रत्येक जण करतो. पण परदेशात आणि आपल्या देशात काय फरक आहे हा विचार कुणी करीत नाही. परदेशातील नागरिक आकाशातून धरणीवर आलेले नाहीत. ती आपल्यासारखी माणसे आहेत. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त विचारांचा फरक आहे. सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक शौचालये, उद्याने, पार्किंग अशा सुविधा आपल्यासाठी आहेत आणि आपण त्याची निगा राखली पाहिजे ही शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवली आहे. त्यामुळे परदेशी लोक कायदे कडकपणे पाळतात. आपल्याकडे कायदे मोडेल तो हिरो अशी मानसिकता असल्याने प्रत्येक कायदा मोडण्याकडे कल असतो. ही आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ती कोणत्याही वयात बदलता येते. आपण परदेशात गेलो की, रस्त्यावर कचरा टाकत नाही. कचराकुंडी शोधतो किंवा एका पिशवीत कचरा गोळा करून जिथे कचराकुंडी दिसते तिथे नेऊन टाकतो. हे करायला फार कष्ट पडत नाही. पण आपण जो एकत्रितपणे सार्वजनिक उकिरडा करून ठेवतो तो साफ करायला फार कष्ट पडतात.
आपण हा बदल घडविला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपुरता बदल केला तरी मार्ग स्वच्छ होईल. मनातील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला तर अवतीभोवतीही ऊर्जा निर्माण होते. हिंदू संस्कृती ही इतकी वर्षे टिकली कारण काळानुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य त्यात आहे. या संस्कृतीनुसार जे सण आपण पाळतो तेही आदर्श ठरावेत ही
तळमळ ठेवू या.

Monday, 7 October 2019

किल्ल्यांवर हॉटेल, लग्नाच्या पार्टीच्या वृत्ताने तुटक्या तलवारी झळकल्या

किल्ल्यांवर हॉटेल, लग्नाच्या पार्टीच्या वृत्ताने तुटक्या तलवारी झळकल्या
राष्ट्रवादीने अर्धवट माहितीवर भावना भडकवल्या आणि खा. संभाजीराजेंना धाप लागली


महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि लग्नसमारंभाला फडणवीस सरकारने परवानगी दिली आहे असा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नवे नेतृत्व डॉ. अमोल कोल्हे यांनी आज सकाळीच टाकला आणि या अर्धवट माहितीवर महाराष्ट्रात काही तासांत भावना भडकल्या. फडणवीस सरकारने कोणत्या 25 किल्ल्यांवर या उद्योगांना संमती दिली आहे हे डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांना तर माहीत नव्हतेच, पण भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनाही माहीत नव्हते. पण सर्वचजण नसा ताणून बोलू लागले आणि किल्ल्यांवरील प्रेमाचा कडेलोट झाला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, किल्ल्यांवर हॉटेल आणि लग्न समारंभ आम्ही होऊ देणार नाही. या किल्ल्यांवर सरकारने संग्रहालये बांधावी. परदेशातील किल्ल्यांवर अशी संग्रहालये आपण नेहमी बघतो. पण राज्यात सत्तेवर असताना राष्ट्रवादीने किल्ल्यांकडे बघितलेही नाही. कदाचित किल्ल्यांचा 7/12 होणार नाही हे लक्षात आल्याने किल्ल्यांची हेळसांड झाली असावी. आज मात्र विरोधी पक्षाची भूमिका वठवीत सुप्रिया सुळे सातत्याने बोलत होत्या. त्यात भर म्हणून कोणतीही पूर्व माहिती न घेता माधव भंडारी आले आणि आपल्या फुगलेल्या आवाजात नेहमीच्या बेफिकिरीने म्हणाले की, कोणते किल्ले आहेत ते माहीत नाही, पण जो निर्णय झाला तो खूप आधी व्हायला पाहिजे होता. म्हणजे एक नेता माहिती न घेता बोलतो आणि दुसरा नेता जनतेच्या भावनांना किंमत न देता बोलतो आणि हे सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा दाखविण्यासाठी ही बेताल बडबड करतात. दुर्दैवाने छत्रपतींच्या नखाचीही त्यांना सर नाही. सर्वात वाईट म्हणजे ज्यांनी मालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तबगारीचा अभ्यास केला असावा असे आपल्याला वाटते ते डॉ. अमोल कोल्हे हे गंगेत न्हाऊन कोरडेच राहिले आहेत हे आज उघड झाले. छत्रपतींप्रमाणे कपडे आणि मिशी ठेवून संयम येत नाही. आपण कोणत्या कारणासाठी तलवार उपसत आहोत, याची माहिती न घेता, शासन निर्णय न वाचता त्यांनी सरळ व्हिडिओ करून भावना भडकवल्या. जनतेला फसवून केलेले राजकारण यशस्वी होत नाही हा धडा त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रवासातून घेतला नाही आणि हा धडा राष्ट्रवादीत राहून त्यांना कधी मिळणारही नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आगपाखड, माधव भंडारींची दर्पोक्ती झाल्यावर सदैव बाबासाहेब पुरंदरेंच्या पायाशी बसलेले राज ठाकरे काही बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांचे व्हिडिओ निवडणूक प्रचारावेळीच लागतात. एरवी त्यांची तलवार कायम म्यानच असते. काँग्रेसबद्दल फारसे बोलावे असे त्यांच्याच नेत्यांना वाटत नाही. बाळासाहेब थोरातांना फक्त शिर्डी दिसते, त्यांना अख्खा महाराष्ट्र कधी दिसेल असे वाटत नाही. नेत्यांच्या वक्तव्यांनी पाणी गरम होऊन बुडबुडे आले. त्यानंतर काही तासांत सर्व शांतही झाले असते. पण गडकिल्ल्यांचे वृत्त व्हायरल झाल्याने गडकिल्ल्यांवर खरे प्रेम करणारे प्रचंड संतापले आणि सोशल मीडियावर आग ओकू लागले.
निवडणुकीच्या तोंडावर इतकी मते आपल्या विरुद्ध जातील हे पाहून खासदार छत्रपती संभाजीराजे खडबडून जागे झाले. त्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना गदागदा हलविले. सकाळपासून वातावरण पेटत चालले होते तेव्हा खासदार, मंत्री आणि पुरातत्व खाते आपापल्या खुर्चीत पेंगत होते. कुणीही कसलाही खुलासा करण्याची तसदी घेतली नाही. चार तासांनी केवळ वन व पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर खुलासा केला की, फडणवीस सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण मुनगंटीवारांच्या खुलाशाने वादळ शमले नाही. कारण त्यांनी जेव्हापासून 33 कोटी झाडे लावल्याचा दावा सुरू केला आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावरचा विश्वासच उडाला आहे. मुनगंटीवार दावा करतात की, वाघांची संख्या वाढली आहे तेव्हा जनतेला त्यांच्या फोटो मागचा भुसा भरलेला वाघच अधिक प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे मुनगंटीवार ‘ज’ चा ‘मा’ करतात अशी जनतेची ठाम भावना झाली आहे. म्हणजे झाडे आणि वाघ जगविण्याच्या ऐवजी मारली असे प्रत्येक जाहिरातीत वाचले जात आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशाने गडप्रेमींचा संताप थांबत नाही हे पाहून खासदार छत्रपती संभाजीराजेंना घाम फुटला. त्यांनी शेवटी दुपारनंतर शासन निर्णय वाचला आणि जयकुमार रावलना खुलासा करायला लावला की, ‘वर्ग 1’ श्रेणीतील 51 किल्ल्यांवर हॉटेल वा लग्न समारंभाची कोणतीही परवानगी सरकारने दिलेली नाही. ‘वर्ग 2’ श्रेणीतील असंरक्षित किल्ल्यांचा ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास केला जाणार आहे. हे किल्ले लग्न सोहळा वा इतर समारंभांसाठी दिले जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जयकुमार रावल यांनी सकाळीच हा खुलासा दिला असता तर दिवसभराचा अज्ञानाचा गोंधळ झालाच नसता. जयकुमार रावल यांच्या खुलाशाने मूळ वृत्तच चुकीचे होते हे उघड झाल्यासारखे वाटले. तेवढ्यात व्हॉटसअपवर निर्णयाची प्रत फिरू लागली. यात वर्ग2 श्रेणीतील स्थळांवरील मोकळी जागा अथवा विकसित जागा खासगी लोकांना 30 ते 60 वर्षे भाडेकराराने देण्यात येतील असे म्हटले आहे. त्यामुळे जयकुमार रावलांच्या खुलाशाने विषय थांबणार नाही. हे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या लक्षात आले. मग त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी मतांचे महत्त्व ओळखून फोन उचलला आणि कोणत्याही किल्ल्यावर खासगी समारंभ होणार नाही असे जाहीर केले. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी ही बाब तातडीने प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर केली आणि कपाळावरचा घाम पुसला. पण शेवटचा घामाचा थेंब पुसत असताना जयकुमार रावल म्हणाले की, सिंधुदुर्ग किल्ल्यावर यापूर्वीच हेरिटेज हॉटेलचे बांधकाम सुरू झाले आहे. या वाक्याचा खरे तर धमाका व्हायला हवा होता. पण तेव्हा निवडणुका नसल्याने आपण गप्प बसलो होतो हे लक्षात आल्यावर सर्वच पक्षाचे नेते थंड झाले आणि हा विषय संपला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे केवळ नाव घेऊन त्यांचे गुण येत नाहीत हे आजच्या घटनेतून महाराष्ट्रातील शिवप्रेमींना दिसले. दिल्लीतील लाल किल्ला केंद्र सरकारने भाडेकराराने एका खासगी कंपनीला दिला ही घटना अनेकांना आठवली. त्यामुळे आपण कुणावर आणि कशासाठी जीव ओवाळून टाकायचा याचा विचार क्षणभर थांबून मावळ्यांनी करायला हवा. ती वेळ आली आहे.

Wednesday, 17 July 2019

अरविंद केजरीवालांचा प्रवास ‘परिवर्तन’ ते मुख्यमंत्रिपद




दिल्लीचे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दोघेही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या दिल्लीत लोकपाल कायद्यासाठी आंदोलनाने वेग पकडला तेव्हा अरविंद केजरीवाल अधिकच झोतात आले. अरविंद केजरीवाल हे प्रथम डिसेंबर 2013 ते फेब्रुवारी 2014 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच राजीनामा दिला आणि 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणखी मोठा विजय मिळवून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2015 च्या निवडणुकीत त्यांनी 70 पैकी 67 जागा जिंकण्यासाठी इतिहास घडविला. पुढील वर्षी पुन्हा दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे आप सरकार कायम वादात राहिले. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीकडे एका बाजूनी टीका होत असताना त्यांनी सुधारलेल्या पालिका शाळा आणि मोहल्ला क्‍लिनिक सारख्या योजनांमुळे त्यांचे कौतुकही होत असते.
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील सिवानी शहरात झाला. वडील गोविंद राम केजरीवाल हे इलेक्ट्रीक इंजिनिअर होते. सोनिपत, गाझियाबाद, हिस्सार, दिल्ली अशा शहार हे कुटुंब फिरत राहिले. अरविंद केजरीवाल अभ्यासात हुशार होते. खडकपूरच्या आयआयटीत प्रवेश घेऊन ते मेकॅनिकल इंजिनिअर झाले आणि जमशेदपूरला टाटा स्टील कंपनीत नोकरीलाही लागले. पण तेव्हापासून अस्वस्थपणा हा त्यांच्या स्वभावात होताच. चांगल्या नोकरीचा तीन वर्षांत राजीनामा देऊन त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. यात उत्तीर्ण होऊन ते आयकर खात्यात सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू झाले. त्याच काळात त्यांची सुनिताशी भेट झाली. तीही ‘इंडियन रेव्हिन्यू सर्व्हिस’ उत्तीर्ण होऊन नोकरीला लागली. 1994 साली दोघांचा विवाह झाला. त्यांना हर्षिता आणि पुलकित ही दोन मुलं आहेत. पुढे दोघांनी सरकारी नोकरी सोडून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले.

आयकर खात्यात असतानाच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या सुंदरनगर भागात ‘परिवर्तन’ चळवळ सुरू केली. आयकर, वीज बिल, रेशनकार्ड, सरकारी योजना यात सामान्यांना येणार्‍या समस्यांची सोडवणूक ‘परिवर्तन’ च्या माध्यमातून सुरू झाली. पाच वर्षानंतर परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी ‘कबीर’ नावाच्या एनजीओची स्थापना केली ज्यामुळे त्यांना निधी मिळू लागला. दरम्यान ‘परिवर्तन’ मार्फत अनेक सरकारी खात्यांत धडाधड आरटीआय टाकून माहिती मिळविण्यास सुरुवात झाली. यातून सरकारी योजनांतील गैरकारभार उघड होऊ लागला. रेशन दुकानांतील भ्रष्टाचार पाण्याच्या खाजगीकरणाचे कारस्थान, खाजगी शाळांची दादागिरी अशा गौप्यस्फोटांमुळे परिवर्तनचे नांव सर्वदूर पोहचले. पण परिवर्तनचे कार्यक्षेत्र सुंदरनगरपर्यंतच सिमित होते. 2006 साली अरविंदकेजरीवालना त्यांच्या समाजकार्यासाठी मॅगसेसे पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची रक्कम हे भागभांडवल म्हणून देत केजरीवाल यांनी ‘पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली.केजरीवाल, मनिष सिसोदिया, अभिनंदन सिक्री, प्रशांत भूषण, किरण बेदी हे त्याचे संस्थापक होते. या संस्थेने परिवर्तन आणि कबीरचे काम आणखी मोठ्या प्रमाणात सुरू केले. कॉमनवेल्थ खेळातील नियोजनात झालेला भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. शेवटी 2011 साली हेच सर्वजण अण्णा हजारेंच्या आंदोलनात सामील झाले आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुपचे सदस्य बनले. पुढे आम आदमी पार्टीची स्थापना करून दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकत अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...