Tuesday, 15 October 2019

गणेश मिरवणुकीत जायचे आणि रस्त्यावर उकिरडा करायचा कचरा फेकायचा, थुंकायचे! हीच आपली ‘हिंदू संस्कृती’ का?


भारतीयांना एक वाईट सवय लागली आहे. आपण घाण करायची आणि दुसर्‍याला ती घाण साफ करायला लावायची. त्यातही जो ती घाण साफ करतो त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी नसते आणि सहानुभूतीही नसते. मनातील घाण साफ करून स्वतःचे मन आणि शरीर सुदृढ ठेवणार्‍या बुवाबाजांना आपण भरभरून दान देऊन पुण्य विकत घेण्याचा भ्रष्टाचार तर करतोच, पण त्या बुवाबाजांच्या पायावर डोकेही ठेवतो. परंतु जे आपली घरं, आपले संडास, आपले रस्ते साफ ठेवून आपल्याला प्रदुषणापासून, रोगराईपासून वाचवितात त्यांच्याकडे आपले लक्षही नसते. काल आपल्या ‘लाडक्या बाप्पाला’ आपण मिरवणुकीने विसर्जनासाठी नेले आणि जाताना रस्त्यांवर उकिरड्याचे अक्षरशः ढीग करून ठेवले. रस्त्यांवर खड्डे इतके की चालता येत नाही हे वाक्य सर्वांच्या मुखी असते. गणेशविसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी समुद्रकिनारी मूर्तींची जी अवस्था दिसते ती पाहवत नाही हे वाक्यही दरवर्षी ऐकू येते. पण रस्त्यांवर आपण विसर्जनाच्या दिवशी किती प्रचंड कचरा करून ठेवला आहे हे वाक्य कुणी बोलतच नाही. कारण आपण घाण करायची आणि दुसर्‍याने साफ करायची ही आपली सवय आहे.
हिंदू संस्कृतीबद्दल अलीकडे खूप जास्त चर्चा सुरू आहे. मग कचरा करणे, घाण फेकणे, थुंकणे ही आपली संस्कृती आहे का? विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत नाचायचे, पुढल्या वर्षी लवकर या म्हणायचे ही आपली संस्कृती आहे असे म्हणतात. मग हे सर्व करताना आपण प्लास्टिकच्या ग्लासातून पाणी प्यायलो आणि ग्लास रस्त्यावर फेकून दिले, कागदी कपातून चहा प्यायलो आणि कप रस्त्यावर फेकून दिले, लेज खाऊन पाकिटे रस्त्यावर, चिवडा खाल्ला पाकिटे रस्त्यावर, आईस्क्रिमचे कप रस्त्यावर, इडली चटणी ज्या कागदी प्लेटमध्ये खाल्ली ती न गुंडाळता तशीच रस्त्यावर फेकून दिली. ज्या रस्त्यांनी मिरवणुका गेल्या त्या रस्त्यांवर अक्षरशः हा कचरा भरला होता. रस्त्यावरून चालणे शक्य नव्हते. समुद्रकिनारी आलेल्या मूर्ती दुसर्‍या दिवशी पाहवत नाही तसे हे समुद्रकिनार्‍याकडे जाणारे रस्ते पाहवत नव्हते.
पीओपीच्या मूर्ती आणू नका, कारण त्या विरघळत नाहीत आणि त्या मूर्तींमुळे नदी, विहिरी, समुद्र प्रदूषित होतात हे अनेक वेळा सांगून झाले. तरी शाडुची मूर्ती आणत नाहीत कारण ती महाग असते. थोडी सजावट कमी करा, थोडी मिठाई कमी करा म्हणजे परवडेल असे सांगितले तर आपल्यालाच दूषणे देतात. मूर्तीची नंतर काय अवस्था होते हे माहीत असूनही सजावट, मिठाई, बँड यासाठी पैसे वाचवायला पीओपीचीच मूर्ती आणतात. आता तर कृत्रिम तलावांचे थोतांड निघाले आहे. आम्ही प्रदूषण करीत नाही तर कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करतो असे नाक वर करून म्हणतात. पण या कृत्रिम तलावात रसायन टाकून मूर्ती विरघळवतात आणि ते पाणी पुन्हा नदीत आणि समुद्रातच फेकतात. मग प्रदूषण कमी कसे झाले? परंतु दृष्टीआड काहीही चालले तर आपला त्याच्याशी संबंध नसतो.
कचर्‍याचेही तसेच आहे. सफाई कामगार दुसर्‍या दिवशी कष्ट करून रस्ते चार-चार वेळा साफ करतात आणि आपण स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून रस्त्यावर पाऊल ठेवतो तोपर्यंत रस्ते स्वच्छ केलेले असतात. त्यामुळे आपण कचरा करतो आहोत याचे आपल्याला काहीच वाटत नाही, आपले घर फक्त आपले ही आपली मानसिकता आहे. त्यामुळे घरात आपण फरशीवर कचरा टाकत नाही. घरातल्या फरशीवर थुंकतही नाही. पण घराबाहेर पडलो की आपले काहीच नसते. तेव्हा आपण जे वागतो त्यात आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की, घराबाहेरचा कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण याचा आपल्या आरोग्यावर शेवटी परिणाम होतोच. घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपण खिशातले पैसे खर्च करतो त्याचप्रमाणे रस्ते बांधायला, रस्त्यावरील खड्डे बुजवायला, रस्त्यावरील कचरा साफ करायला आपणच खिशातले पैसे खर्च करतो. आपण कर भरतो त्यातून हा खर्च होतो. मग आपण घर आपले मानतो तसा रस्ता आपला का मानत नाही?
गंमत म्हणजे आपण आपल्या देशात अगदी बेफिकिरीने उकिरडा करतो, पण दुसर्‍यांच्या देशात जातो तेव्हा त्यांचे रस्ते मात्र साफ ठेवतो. परदेशातून कुणीही परतले की एक वाक्य ठरलेले असते. इतकी स्वच्छता होती आणि रस्त्यांवर एक खड्डाही नव्हता हे कौतुक प्रत्येक जण करतो. पण परदेशात आणि आपल्या देशात काय फरक आहे हा विचार कुणी करीत नाही. परदेशातील नागरिक आकाशातून धरणीवर आलेले नाहीत. ती आपल्यासारखी माणसे आहेत. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त विचारांचा फरक आहे. सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक शौचालये, उद्याने, पार्किंग अशा सुविधा आपल्यासाठी आहेत आणि आपण त्याची निगा राखली पाहिजे ही शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवली आहे. त्यामुळे परदेशी लोक कायदे कडकपणे पाळतात. आपल्याकडे कायदे मोडेल तो हिरो अशी मानसिकता असल्याने प्रत्येक कायदा मोडण्याकडे कल असतो. ही आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ती कोणत्याही वयात बदलता येते. आपण परदेशात गेलो की, रस्त्यावर कचरा टाकत नाही. कचराकुंडी शोधतो किंवा एका पिशवीत कचरा गोळा करून जिथे कचराकुंडी दिसते तिथे नेऊन टाकतो. हे करायला फार कष्ट पडत नाही. पण आपण जो एकत्रितपणे सार्वजनिक उकिरडा करून ठेवतो तो साफ करायला फार कष्ट पडतात.
आपण हा बदल घडविला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपुरता बदल केला तरी मार्ग स्वच्छ होईल. मनातील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला तर अवतीभोवतीही ऊर्जा निर्माण होते. हिंदू संस्कृती ही इतकी वर्षे टिकली कारण काळानुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य त्यात आहे. या संस्कृतीनुसार जे सण आपण पाळतो तेही आदर्श ठरावेत ही
तळमळ ठेवू या.

Monday, 7 October 2019

किल्ल्यांवर हॉटेल, लग्नाच्या पार्टीच्या वृत्ताने तुटक्या तलवारी झळकल्या

किल्ल्यांवर हॉटेल, लग्नाच्या पार्टीच्या वृत्ताने तुटक्या तलवारी झळकल्या
राष्ट्रवादीने अर्धवट माहितीवर भावना भडकवल्या आणि खा. संभाजीराजेंना धाप लागली


महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि लग्नसमारंभाला फडणवीस सरकारने परवानगी दिली आहे असा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नवे नेतृत्व डॉ. अमोल कोल्हे यांनी आज सकाळीच टाकला आणि या अर्धवट माहितीवर महाराष्ट्रात काही तासांत भावना भडकल्या. फडणवीस सरकारने कोणत्या 25 किल्ल्यांवर या उद्योगांना संमती दिली आहे हे डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांना तर माहीत नव्हतेच, पण भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनाही माहीत नव्हते. पण सर्वचजण नसा ताणून बोलू लागले आणि किल्ल्यांवरील प्रेमाचा कडेलोट झाला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, किल्ल्यांवर हॉटेल आणि लग्न समारंभ आम्ही होऊ देणार नाही. या किल्ल्यांवर सरकारने संग्रहालये बांधावी. परदेशातील किल्ल्यांवर अशी संग्रहालये आपण नेहमी बघतो. पण राज्यात सत्तेवर असताना राष्ट्रवादीने किल्ल्यांकडे बघितलेही नाही. कदाचित किल्ल्यांचा 7/12 होणार नाही हे लक्षात आल्याने किल्ल्यांची हेळसांड झाली असावी. आज मात्र विरोधी पक्षाची भूमिका वठवीत सुप्रिया सुळे सातत्याने बोलत होत्या. त्यात भर म्हणून कोणतीही पूर्व माहिती न घेता माधव भंडारी आले आणि आपल्या फुगलेल्या आवाजात नेहमीच्या बेफिकिरीने म्हणाले की, कोणते किल्ले आहेत ते माहीत नाही, पण जो निर्णय झाला तो खूप आधी व्हायला पाहिजे होता. म्हणजे एक नेता माहिती न घेता बोलतो आणि दुसरा नेता जनतेच्या भावनांना किंमत न देता बोलतो आणि हे सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा दाखविण्यासाठी ही बेताल बडबड करतात. दुर्दैवाने छत्रपतींच्या नखाचीही त्यांना सर नाही. सर्वात वाईट म्हणजे ज्यांनी मालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तबगारीचा अभ्यास केला असावा असे आपल्याला वाटते ते डॉ. अमोल कोल्हे हे गंगेत न्हाऊन कोरडेच राहिले आहेत हे आज उघड झाले. छत्रपतींप्रमाणे कपडे आणि मिशी ठेवून संयम येत नाही. आपण कोणत्या कारणासाठी तलवार उपसत आहोत, याची माहिती न घेता, शासन निर्णय न वाचता त्यांनी सरळ व्हिडिओ करून भावना भडकवल्या. जनतेला फसवून केलेले राजकारण यशस्वी होत नाही हा धडा त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रवासातून घेतला नाही आणि हा धडा राष्ट्रवादीत राहून त्यांना कधी मिळणारही नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आगपाखड, माधव भंडारींची दर्पोक्ती झाल्यावर सदैव बाबासाहेब पुरंदरेंच्या पायाशी बसलेले राज ठाकरे काही बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांचे व्हिडिओ निवडणूक प्रचारावेळीच लागतात. एरवी त्यांची तलवार कायम म्यानच असते. काँग्रेसबद्दल फारसे बोलावे असे त्यांच्याच नेत्यांना वाटत नाही. बाळासाहेब थोरातांना फक्त शिर्डी दिसते, त्यांना अख्खा महाराष्ट्र कधी दिसेल असे वाटत नाही. नेत्यांच्या वक्तव्यांनी पाणी गरम होऊन बुडबुडे आले. त्यानंतर काही तासांत सर्व शांतही झाले असते. पण गडकिल्ल्यांचे वृत्त व्हायरल झाल्याने गडकिल्ल्यांवर खरे प्रेम करणारे प्रचंड संतापले आणि सोशल मीडियावर आग ओकू लागले.
निवडणुकीच्या तोंडावर इतकी मते आपल्या विरुद्ध जातील हे पाहून खासदार छत्रपती संभाजीराजे खडबडून जागे झाले. त्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना गदागदा हलविले. सकाळपासून वातावरण पेटत चालले होते तेव्हा खासदार, मंत्री आणि पुरातत्व खाते आपापल्या खुर्चीत पेंगत होते. कुणीही कसलाही खुलासा करण्याची तसदी घेतली नाही. चार तासांनी केवळ वन व पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर खुलासा केला की, फडणवीस सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण मुनगंटीवारांच्या खुलाशाने वादळ शमले नाही. कारण त्यांनी जेव्हापासून 33 कोटी झाडे लावल्याचा दावा सुरू केला आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावरचा विश्वासच उडाला आहे. मुनगंटीवार दावा करतात की, वाघांची संख्या वाढली आहे तेव्हा जनतेला त्यांच्या फोटो मागचा भुसा भरलेला वाघच अधिक प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे मुनगंटीवार ‘ज’ चा ‘मा’ करतात अशी जनतेची ठाम भावना झाली आहे. म्हणजे झाडे आणि वाघ जगविण्याच्या ऐवजी मारली असे प्रत्येक जाहिरातीत वाचले जात आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशाने गडप्रेमींचा संताप थांबत नाही हे पाहून खासदार छत्रपती संभाजीराजेंना घाम फुटला. त्यांनी शेवटी दुपारनंतर शासन निर्णय वाचला आणि जयकुमार रावलना खुलासा करायला लावला की, ‘वर्ग 1’ श्रेणीतील 51 किल्ल्यांवर हॉटेल वा लग्न समारंभाची कोणतीही परवानगी सरकारने दिलेली नाही. ‘वर्ग 2’ श्रेणीतील असंरक्षित किल्ल्यांचा ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास केला जाणार आहे. हे किल्ले लग्न सोहळा वा इतर समारंभांसाठी दिले जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जयकुमार रावल यांनी सकाळीच हा खुलासा दिला असता तर दिवसभराचा अज्ञानाचा गोंधळ झालाच नसता. जयकुमार रावल यांच्या खुलाशाने मूळ वृत्तच चुकीचे होते हे उघड झाल्यासारखे वाटले. तेवढ्यात व्हॉटसअपवर निर्णयाची प्रत फिरू लागली. यात वर्ग2 श्रेणीतील स्थळांवरील मोकळी जागा अथवा विकसित जागा खासगी लोकांना 30 ते 60 वर्षे भाडेकराराने देण्यात येतील असे म्हटले आहे. त्यामुळे जयकुमार रावलांच्या खुलाशाने विषय थांबणार नाही. हे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या लक्षात आले. मग त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी मतांचे महत्त्व ओळखून फोन उचलला आणि कोणत्याही किल्ल्यावर खासगी समारंभ होणार नाही असे जाहीर केले. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी ही बाब तातडीने प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर केली आणि कपाळावरचा घाम पुसला. पण शेवटचा घामाचा थेंब पुसत असताना जयकुमार रावल म्हणाले की, सिंधुदुर्ग किल्ल्यावर यापूर्वीच हेरिटेज हॉटेलचे बांधकाम सुरू झाले आहे. या वाक्याचा खरे तर धमाका व्हायला हवा होता. पण तेव्हा निवडणुका नसल्याने आपण गप्प बसलो होतो हे लक्षात आल्यावर सर्वच पक्षाचे नेते थंड झाले आणि हा विषय संपला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे केवळ नाव घेऊन त्यांचे गुण येत नाहीत हे आजच्या घटनेतून महाराष्ट्रातील शिवप्रेमींना दिसले. दिल्लीतील लाल किल्ला केंद्र सरकारने भाडेकराराने एका खासगी कंपनीला दिला ही घटना अनेकांना आठवली. त्यामुळे आपण कुणावर आणि कशासाठी जीव ओवाळून टाकायचा याचा विचार क्षणभर थांबून मावळ्यांनी करायला हवा. ती वेळ आली आहे.

Wednesday, 17 July 2019

अरविंद केजरीवालांचा प्रवास ‘परिवर्तन’ ते मुख्यमंत्रिपद




दिल्लीचे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दोघेही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या दिल्लीत लोकपाल कायद्यासाठी आंदोलनाने वेग पकडला तेव्हा अरविंद केजरीवाल अधिकच झोतात आले. अरविंद केजरीवाल हे प्रथम डिसेंबर 2013 ते फेब्रुवारी 2014 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच राजीनामा दिला आणि 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणखी मोठा विजय मिळवून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2015 च्या निवडणुकीत त्यांनी 70 पैकी 67 जागा जिंकण्यासाठी इतिहास घडविला. पुढील वर्षी पुन्हा दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे आप सरकार कायम वादात राहिले. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीकडे एका बाजूनी टीका होत असताना त्यांनी सुधारलेल्या पालिका शाळा आणि मोहल्ला क्‍लिनिक सारख्या योजनांमुळे त्यांचे कौतुकही होत असते.
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील सिवानी शहरात झाला. वडील गोविंद राम केजरीवाल हे इलेक्ट्रीक इंजिनिअर होते. सोनिपत, गाझियाबाद, हिस्सार, दिल्ली अशा शहार हे कुटुंब फिरत राहिले. अरविंद केजरीवाल अभ्यासात हुशार होते. खडकपूरच्या आयआयटीत प्रवेश घेऊन ते मेकॅनिकल इंजिनिअर झाले आणि जमशेदपूरला टाटा स्टील कंपनीत नोकरीलाही लागले. पण तेव्हापासून अस्वस्थपणा हा त्यांच्या स्वभावात होताच. चांगल्या नोकरीचा तीन वर्षांत राजीनामा देऊन त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. यात उत्तीर्ण होऊन ते आयकर खात्यात सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू झाले. त्याच काळात त्यांची सुनिताशी भेट झाली. तीही ‘इंडियन रेव्हिन्यू सर्व्हिस’ उत्तीर्ण होऊन नोकरीला लागली. 1994 साली दोघांचा विवाह झाला. त्यांना हर्षिता आणि पुलकित ही दोन मुलं आहेत. पुढे दोघांनी सरकारी नोकरी सोडून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले.

आयकर खात्यात असतानाच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या सुंदरनगर भागात ‘परिवर्तन’ चळवळ सुरू केली. आयकर, वीज बिल, रेशनकार्ड, सरकारी योजना यात सामान्यांना येणार्‍या समस्यांची सोडवणूक ‘परिवर्तन’ च्या माध्यमातून सुरू झाली. पाच वर्षानंतर परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी ‘कबीर’ नावाच्या एनजीओची स्थापना केली ज्यामुळे त्यांना निधी मिळू लागला. दरम्यान ‘परिवर्तन’ मार्फत अनेक सरकारी खात्यांत धडाधड आरटीआय टाकून माहिती मिळविण्यास सुरुवात झाली. यातून सरकारी योजनांतील गैरकारभार उघड होऊ लागला. रेशन दुकानांतील भ्रष्टाचार पाण्याच्या खाजगीकरणाचे कारस्थान, खाजगी शाळांची दादागिरी अशा गौप्यस्फोटांमुळे परिवर्तनचे नांव सर्वदूर पोहचले. पण परिवर्तनचे कार्यक्षेत्र सुंदरनगरपर्यंतच सिमित होते. 2006 साली अरविंदकेजरीवालना त्यांच्या समाजकार्यासाठी मॅगसेसे पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची रक्कम हे भागभांडवल म्हणून देत केजरीवाल यांनी ‘पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली.केजरीवाल, मनिष सिसोदिया, अभिनंदन सिक्री, प्रशांत भूषण, किरण बेदी हे त्याचे संस्थापक होते. या संस्थेने परिवर्तन आणि कबीरचे काम आणखी मोठ्या प्रमाणात सुरू केले. कॉमनवेल्थ खेळातील नियोजनात झालेला भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. शेवटी 2011 साली हेच सर्वजण अण्णा हजारेंच्या आंदोलनात सामील झाले आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुपचे सदस्य बनले. पुढे आम आदमी पार्टीची स्थापना करून दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकत अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

Wednesday, 10 July 2019

योगी आदित्यनाथांचे गणित विषयात ग्रॅज्युएशन


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अनेकांना कुतुहल आहे. भगव्या वेषातील योगी असे व्यक्तिमत्त्व असलेला माणूस राजकारणात येतो आणि एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो याचे बहुतेकांना आश्चर्य वाटते. पण योगी आदित्यनाथ यांचा जीवनप्रवास बघितला तर तरुण काळापासून मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात अध्यात्म आणि राजकारण यांची सांगड राहिली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील पंचूर गावी झाला. हे गाव आता उत्तराखंडात समाविष्ट आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हा अजय मोहन बिश्त हे त्यांचे नांव होते. त्यांचे वडील फॉरेस्ट रेंजर पदावर सरकारी नोकरीत होते. चार भाऊ आणि तीन बहिणी असे त्यांचे मोठे कुटुंब होते. पण इतके मोठे कुटुंब असूनही अजय बिश्तने उत्तम शिक्षण घेतले. उत्तराखंडात असलेल्या हेमवती नंदन बहुगुणा महाविद्यालयातून त्यांनी चक्क गणित विषय घेऊन ग्रॅज्युएशन केले. पण नोकरी, कुटुंब या सामान्य जीवनात त्यांना रस वाटत नव्हता. ते जेमतेम 18 वर्षांचे होते. तेव्हा अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आंदोलन सुरू झाले आणि अजय बिश्तने कुटुंबाला रामराम ठोकून आंदोलनात उडी घेतली. हा नवा प्रवास सुरू असतानाच गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. महंत अवैद्यनाथ हेही या शिष्यामुळे प्रभावित झाले. ते अजय बिश्तच्या आईवडिलांना भेटले आणि त्यांच्या मुलाला शिष्य म्हणून घेऊन जाण्याची परवानगी दिली. आईवडिलांनी आनंदाने परवानगी दिली. अजय बिश्त हे महंत अवैद्यनाथ यांचे शिष्य बनले. याच महंत अवैद्यनाथ यांनी अजय बिश्त यांचे नांव योगी आदित्यनाथ ठेवले. तेव्हा योगी 21 वर्षांचे होते.


गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ हे अध्यात्मिक गुरू असले तरी राजकारणात पूर्ण सक्रीय होते. महंत अवैद्यनाथ हे हिंदु महासभेचे नेते होते. 1991 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. ते स्वतः लोकसभेवर निवडून आले होते. पण राजकारणात असूनही हिंदू महासभा आणि भाजपा या दोन प्रवाहात स्वतःला पूर्ण झोकून न देता त्यांनी स्वतःचे स्वतंत्र स्थान राखले होते. त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा योगी आदित्यनाथ सांभाळत असत.
1994 साली महंत अवैद्यनाथ निवृत्त झाले आणि त्यांनी योगी आदित्यनाथ यांना आपले वारस नेमले. त्यानंतर गुरुच्या पावलावर पाऊल टाकत 1998 साली योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणूक लढले आणि निवडून आले. 26 व्या वर्षी ते खासदार झाले होते. ते लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होते. त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 अशी प्रत्येक लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली. लोकसभेत त्यांची 77 टक्के उपस्थिती असायची. आज ते उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विषयी रोज नवीन वाद निर्माण होतो. सध्याचे ते सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री आहेत.

Friday, 5 July 2019

आ. नितेश राणे, तुमची मस्ती, दादागिरी महाराष्ट्रात नको अधिकारी चुकतो! पण त्याला खांबाला बांधून चिखलाची आंघोळ घालता?

मुंबई-गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाले, अशी ओरड ठोकत काँगे्रसचे आमदार (नारायण राणे पुत्र) नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकरना फरफटत गडनदीच्या पुलावर नेले. तिथे त्यांना खांबाला बांधले आणि त्यांना चिखलाची आंघोळ घातली! नितेश राणेंनी दोन महिन्यांनी येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी फडफड सुरू केली आहे. त्यासाठी मोठे नाट्य उभे करीत त्यांनी शासकीय अधिकार्‍याला अत्यंत हीन प्रकारची वागणूक दिली. अधिकारी चुकत असतील, पण आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. इथे चढ्या आवाजात जाब विचारण्याची मर्यादा पाळतात. एखाद्या असहाय अधिकार्‍याला अशा तर्‍हेने मस्ती दाखवत, दादागिरी करीत वागवणे महाराष्ट्रात शोभत नाही आणि महाराष्ट्रात स्वीकारलेही जाणार नाही. आमदार नितेश राणेंनी, असहाय
अधिकार्‍यापुढे ताकद दाखविली. पण केेंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींपुढे नितेश राणेंच्या मुखातून शब्द निघणार नाही. या चिखलफेकीनंतर रात्री आमदार नितेश राणे यांना गुंडा गर्दी आणि मारहाणप्रकरणी अटक करण्यात आली. कणकवली पोलिसांनी ही अटक केली.
आज सकाळी 11 वाजता हे चिखलकांड घडले. यामध्ये आमदार नितेश राणे यांच्याप्रमाणेच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे देखील उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालण्यात आघाडीवर होते. आज सकाळी रस्त्यातील खड्डे आणि चिखल दाखविण्याच्या बहाण्याने उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांनी कणकवलीला बोलविले. त्यानंतर त्यांना खड्डे दाखवत चालत चालत जानवलीच्या गडनदीवरील पुलावर नेण्यात आले.
यावेळी नितेश राणे यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे व 50 ते 60 स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही होते. हे कार्यकर्ते उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्‍काबुक्‍कीही करत होते. गडनदीच्या पुलावर येताच आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेर्‍यासमोरच प्रकाश शेडेकर यांना खडसावयाला सुरुवात केली. सामान्य जनता दर दिवशी जो चिखल मारा सहन करते तो तुम्ही पण अनुभवा, असे नितेश राणे यांनी शब्द उच्चारताच चिखलाची बादली भरून तयार असलेल्या कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावरून अंगावर चिखल ओतला. त्यानंतर अगोदरच दोर घेऊन तयार असलेले कार्यकर्ते पुढे आले व त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधले आणि त्यांच्या अंगावर लागोपाठ चिखलाच्या बादल्या ओतून त्यांना चिखलाने आंघोळ घातली. गेल्या चार दिवसाच्या अतिवृष्टीमुळे चिखल झाला आहे असे शेडेकर गयावया करून सांगत होते, तरीही त्यांच्यावर
हल्ले सुरू राहिले. नितेश राणे यांच्या या दादागिरीमुळे बांधकाम विभागातील सर्व कर्मचारी भेदरले आहेत. यापूर्वीही नितेश राणे यांनी अनेक अधिकार्‍यांना असेच धमकावले आहे. पोलीस अधिकार्‍यांनाही दम भरला आहे. या सर्व घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांमध्ये व कामगारांमध्ये राणे यांच्याबद्दल संताप आहे, पण सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याने अधिकारी तक्रार करीत नाहीत. मात्र उप अभियंता प्रकाश शेडेकर यांनी चिखल फेकीनंतर केलेली याचना आणि गयावया पाहता आपल्याला कोणी वाली नाही, हेच त्यांना कळून चुकले आहे, असे स्पष्ट दिसत होते.
दरमान, अभियंता प्रकाश शेडेकर चिखलफेक- मारहाणप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर सहा जणांची नावे शेडेकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर नितेश राणे हे कणकवली पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे या अटकेदरम्यान पोलीस ठाण्यासमोर राणे समर्थकांनी गर्दी केली होती. उद्या शुक्रवारी नितेश राणेंना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कणकवली महामार्गावर आज दुपारी शेडेकर यांना झालेल्या मारहाणीनंतर ते पोलीस बंदोबस्तात कुडाळ येथे आपल्या निवासस्थानी आले. तेथून कपडे बदलल्यावर कुडाळ पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत कुडाळ पोलिसात प्रकाश शेडेकर ( 52) यांनी फिर्याद दिली की, त्यांनी मला गडनदीच्या पुलावर थांबायला सांगितले होते.त्याप्रमाणे ते थांबले असताना 10: 40 वाजण्याच्या सुमारास नितेश राणे कणकवलीच्या दिशेकडून पुलावर चालत आले. त्यावेळी त्यांचे सोबत पत्रकार, नागरिक, कार्यकर्ते असे 40 ते 50 लोक होते. यावेळी त्यांनी त्यांना काहीही बोलायला न देता तु पीलर बांधायची घाई का केली? गटार कोण बांधणार तु का मी, तु का एवढा निगर गठ्ठ झालेला आहेस का? तुला दाखवू काय कसे असत चिखलातून जाणे, तुला चिखलातच लोळवतो, सर्व्हीस रोड अजुन का नाही बांधलास? गोव्यात कसा बांधलास, माती कशी उडते अंगावर दाखवू का तुला असे राणे हे बोलू लागले आणि यावेळी माझ्या मागून दोन व्यक्ती येत त्यांनी अगोदरच नियोजन करून ठेवलेल्या चिखल बादल्या घेवून बादल्यातून आपल्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. तसेच त्यावेळी मी पळून जावू नये म्हणून राणे यांनी माझा हात पकडून ठेवला. यावेळी चिखल ओतणार्‍या दोघापैकी मिलिंद मेस्त्री (रा. कलमठ) यांना त्यांनी ओळखले. त्यानंतर आम. राणे यांनी आपल्याला ढकलुन पुलाच्या कडेस नेले व त्यांच्या कार्यकर्त्यांना याला बांधा रे असे म्हणून मला बांधून ठेवण्याची चिथावणी दिली. तसेच तुला चिखलात नेवून टाकतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते मामा हळदिवे, निखिल आचरेकर, संदीप सावंत यांनी महामार्गावर बांधलेली पांढरी पट्टी तोडून काढत त्या पट्टीने मला बांधून ठेवले आणि त्यानंतर हाताला धरून ढकलत चालत नेले आणि अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या घरासमोरील साचलेल्या पाण्यातुन चालत नेले. यावेळी तेथे उभे असताना नगरसेविका मेघा गांगण यांनी पाठीवर हाताच्या थापटाने धक्काबुक्की केली. यावेळी तेथे आलेल्या पोलिसांनी गर्दीतून आपल्याला बाजूला नेले. झालेल्या मानहानीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून आपण कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती फिर्यादीत शेडेकर यांनी दिली. दरम्यान, अटकेनंतर नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
नारायण राणेंचा माफीनामा
पण मुलाला वाचविण्याचा प्रयत्न
कणकवलीच्या गडनदीच्या पुलाला बांधून उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या चिखलफेकीबद्दल त्यांचे वडील व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर माफी मागितली आहे. मात्र त्यांनी नितेश राणे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे म्हणाले की, अभियंत्यांवर चिखलफेक नितेश राणेंनी नव्हे तर त्यांच्या समर्थकांनी केली.

Wednesday, 3 July 2019

बर्माच्या रंगून शहरात जन्म गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी


गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा जोर वाढल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना बाजूला सारून राजकोटचे भाजपा नेते विजय रुपानी यांनी 22 डिसेंबर 2017 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बर्माच्या रंगून शहरात (आता म्यानमारचे यांगॉन शहर) जन्मलेले 62 वर्षांचे रुपानी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. अभाविपचे कार्यकर्ते, जनसंघ, आणीबाणी काळात कैद, महापौर, आमदार, खासदार अशी त्यांची प्रदीर्घ वाटचाल असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपाशी कायम एकनिष्ठ राहिल्याचे फळ त्यांना मिळाले.
विजय रुपानींचा जन्म जैन बनिया कुटुंबात झाला. त्यांचे आईवडील मायाबेन आणि रमणीकलाल रुपानी यांची रसिकलाल अ‍ॅण्ड सन्स नावाची कंपनी आहे. उसाचा रस, बर्फाचा गोळा बनविणार्‍या यंत्रापासून विविध प्रकारचे पाईप कंपनी बनविते. त्यांना सात अपत्य होती. विजय रुपानी सर्वात धाकटे आहेत. म्यानमारमध्ये अशांतता निर्माण झाल्यानंतर 1960 साली हे कुटुंब गुजरातच्या राजकोट शहरात स्थायिक झाले. विजय रुपानी यांची पत्नी अंजली रुपानी याही भाजपात सक्रीय आहेत. त्यांना दोन मुलगे ऋषभ, पुजित व कन्या राधिका आहे. पुजितचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. त्याच्या नावाने राजकोट शहरात ट्रस्ट चालविला जातो.


विजय रुपानी यांच्यावर 2011 साली शेअरच्या किंमती आणि स्टॉक्समध्ये गैरप्रकारे उलाढाल केल्याचा आरोप आहे. सेबीने त्यांच्यावर दंडही लादला होता. मात्र नंतर हा दंड रद्द करून फेरसुनावणीचा आदेश देण्यात आला. 2017 साली
सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल आहे. राजकोटच्या श्री छोटू नगर गृहनिर्माण सोसायटीत राहणार्‍या मानसिंह भाई या वॉचमनला सोसायटीतून हद्दपार करण्याच्या बदल्यात विजय रुपानींच्या पुजित धर्मादाय ट्रस्टला सोसायटीची जागा देण्याचा सौदा होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी मानसिंह भाई यांचा स्थानिक पालिकेकडून प्रचंड छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून या कुटुंबाने 2013 साली पालिकेसमोर स्वतःला जाळून घेतले. यात कुटुंबातील 7 जणांपैकी मधुरा आणि गौरीबेन या दोनच महिला जिवीत राहिल्या. भरत, गिरीश, आशा, रेखा, बासमती यांचे निधन झाले. या कुटुंबातील एकमेव जिवित पुरुष महेंद्रभाई सध्या न्यायालयात लढा देत आहेत.

Wednesday, 26 June 2019

रावली जगन, कावली जगन आंध्रचे नवे मुख्यमंत्री


आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर रेड्डी या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या तरुण नेत्याने दणदणीत विजय मिळवित मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2014 ते 2019 ही पाच वर्षे विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी असलेल्या या नेत्याने चंद्राबाबू नायडू यांचा पार धुव्वा उडवून दिला.
येदुगिरी संदिन्ती जगनमोहन रेड्डी अर्थात वायएसआर रेड्डी हे केवळ 46 वर्षांचे आहेत. पत्नी भारथी आणि दोन कन्या असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांचे वडील वायएस राजशेखर रेड्डी हे काँग्रेसमध्ये होते. अत्यंत लोकप्रिय होते. 2004 आणि 2009 अशा दोन वेळा ते मुख्यमंत्री राहिले. त्यांच्यासाठी निवडणुकीवेळी प्रचार करीतच जगनमोहन रेड्डींचा राजकारणात प्रवेश झाला. दुर्दैवाने 2009 साली वडील राजशेखर रेड्डी यांचे अपघाती निधन झाले. त्यांची जागा त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांना दिली जाईल असे सर्वांना वाटत होते. पण काँग्रसने त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारले. 2010 साली जगमोहन रेड्डी यांनी ‘सहानुभूती दौरा’ आयोजित केला. त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक निधनाचा धक्का बसल्याने काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली होती. या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हा दौरा होता. पण खरे तर हा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना हा दौरा काढण्यास मनाई केली.


या सर्वाचा अपेक्षित परिणाम होऊन जगनमोहन रेड्डींनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि 2011 साली स्वतःचा वायएसआर काँग्रेस पक्ष काढला. या पक्षाने पहिल्याच संधीत सर्व पोटनिवडणुका जिंकल्या. जगनमोहन रेड्डीचा ताकद वाढत असतानाच सीबीआयने संपत्तीच्या भ्रष्टाचाराबाबत धाडी टाकल्या आणि जगमोहन रेड्डींना अटक करून न्यायालयीन कोठडीत टाकले. याविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल अपील फेटाळण्यात आले. जगनमोहन रेड्डी जेलमध्ये असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमात झळकू लागल्या. त्यांची प्रतिमा मलीन झाली.
अशा या विपरित परिस्थितीत त्यांना आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या विभाजनाच्या मुद्याने साथ दिली. तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करीत जगनमोहन रेड्डींनी कारागृहात बेमुदत उपोषण सुरू केली. त्यांची आई आमदार विजयाम्मा यांनी कारागृहाबाहेर उपोषण सुरू केले. अखेर जगनमोहन रेड्डींना कारागृहात सोडण्यात आले. पण या सर्वाचा चांगला परिणाम झाला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसचा दणकून पराभव झाला. यानंतर मात्र जगनमोहन रेड्डींनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली. त्यांनी 2017 साली तीन हजार किलोमीटरची संकल्प यात्रा काढून जवळजवळ प्रत्येक विधानसभा मतदारसंघ गाठला. ‘रावली जगन, कावली जगन’ (जगन यायला हवा, आम्हाला जगत हवा) ही घोषणा दुमदुमू लागली आणि पुन्हा जगनमोहन रेड्डी लोकप्रिय ठरू लागले. त्यांच्या या पदयात्रेचा परिणाम होऊन नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तेलगू देसम आणि चंद्राबाबू नायडूंना चितपट केले.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...